नागपूर : वाघ, इतर वन्यजीव आणि वन संवर्धनाबाबत महाराष्ट्राने याेग्य नियाेजन केले आहे. वन व वन्यजीव संवर्धनासाठी देशातील इतर राज्यांनी महाराष्ट्राचे आणि विशेषत: पेंच, मेळघाट व ताडाेबातील नियाेजनाचे अनुकरण करावे, अशा स्पष्ट सूचना राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या (एनटीसीए) प्रतिनिधींनी वेगवेगळ्या व्याघ्र प्रकल्पाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या.
प्राधिकरणाद्वारे दाेन दिवसांपासून नागपूर येथे देशातील सर्व व्याघ्र प्रकल्पांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची आढावा बैठक सुरू हाेती. या वेळी एनटीसीएचे सदस्य डाॅ. एस.पी. यादव, उप महासंचालक मेहरा व सहायक महासंचालक हेमंत कामडी प्रामुख्याने उपस्थित हाेते. गुरुवारी महाराष्ट्रातील ६ व्याघ्र प्रकल्पांच्या प्रकल्प संचालकांनी त्यांच्या क्षेत्राचे सादरीकरण केले. विदर्भातून पेंचचे प्रकल्प संचालक रविकिरण गाेवेकर, मेळघाटचे रेड्डी, नवेगाव-नागझिराचे रामानुजम व ताडाेबाचे जितेंद्र रामगावकर यांनी सादरीकरण केले. एनटीसीएचे उप महासंचालक मेहरा यांनी महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पांच्या नियाेजनाचे काैतुक केले. विशेषत: पेंचमध्ये सुरू असलेल्या कार्बन प्राेजेक्टचा उल्लेख करीत इतर प्रकल्पामध्ये अशा प्रकारे नियाेजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. पेंचमध्ये ताेतलाडाेह भागातील एमएसईबी काॅलनीतील सिमेंटचे बांधकाम व गावातील मलबा व कचऱ्याची विल्हेवाट लावून ग्रीन कव्हर वाढविण्यात आले. अशा प्रकारचा हा देशातील एकमेव प्रकल्प आहे.
दरम्यान, बैठकीमध्ये २०१८ च्या मूल्यांकनाबाबत केलेल्या सूचनांची पूर्तता झाली की नाही, याबाबत आढावा घेण्यात आला. शिवाय २०२२ मध्ये हाेणारी मूल्यांकन बैठक आणि व्याघ्र गणनेच्या तयारीचाही आढावा या वेळी घेण्यात आला.
प्रतिनिधींची पेंच, गाेरेवाड्याला भेट
गुरुवारी बैठकीची सांगता झाल्यानंतर देशभरातील प्रतिनिधींनी आधी गाेरेवाडा येथे आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालय व सफारी प्रकल्पाला भेट दिली. त्यानंतर पेंच व्याघ्र प्रकल्पालाही भेट देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
निधीबाबत कुचराई
व्याघ्र प्रकल्पांचा आढावा घेताना विविध याेजनांच्या निधीबाबत हात आखडता घेण्यात येत असल्याचे दिसून आले. काेराेनाच्या कारणाने आधीच व्याघ्र प्रकल्पाच्या निधीला कट मारण्यात आला आहे. मात्र चांगल्या याेजना राबविणाऱ्या प्रकल्पांना अतिरिक्त निधी देण्याची ग्वाही एनटीसीएच्या सदस्यांनी दिली.