शरद मिरे
भिवापूर: काहीशी खंडित झालेली संसर्गाची साखळी दिवाळीनंतर पुन्हा जुळताना दिसत आहे. संसर्ग वाढतोय. रुग्णही आढळत आहे. शासनाने त्यासाठी नव्या मार्गदर्शक सूचनाही आखल्या आहे. मात्र लॉकडाऊनच्या काळात बाहेर जिल्ह्यातून आवागमन करणाऱ्या प्रवाशांची होणारी तपासणी आता मात्र होताना दिसत नाही. त्यामुळे शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय मार्गावरून प्रवाशांसह आता संसर्ग सुद्धा बिनधास्त प्रवास करत असल्याचे चित्र आहे. मास्क, थर्मल टेस्ट, पथक, तपासणी नाका पूर्णता गायब आहे. जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेला भिवापूर तालुका हा भंडारा, चंद्रपूर, वर्धा या तीन जिल्ह्यांना खेटून असून पाच ते दहा किमी अंतरानंतर त्यांच्या सीमा प्रारंभ होतात. त्यामुळे या तीन जिल्ह्यांसह गोंदिया, गडचिरोली व तेलंगाणा, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश अशी आंतरराज्यीय प्रवासी वाहतूक या राष्ट्रीय मार्गाने होते. कोरोनाचा शिरकाव होताच मार्च महिन्यात अवघा देश लॉकडाऊन झाला. राष्ट्रीय, राज्य व जिल्हा मार्गावर सीमाबंदी नाका उभारत प्रवाशांची थर्मल टेस्ट, मास्क आदीची तपासणी मोहीम २४ तास सक्रिय होती. जून महिन्यापासून लॉकडाऊन शिथिल होताच इतर बाबींसह हळूहळू सीमा बंदी नाके सुद्धा हटविण्यात आले. मात्र दिवाळीनंतर संसर्ग वाढीस असून तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अशात प्रशासनाने फिजिकल डिस्टन्सिंगसह मास्कचा वापर बंधनकारक केला आहे. शहरात त्यादृष्टीने प्रशासनाकडून कठोर पावले उचलल्या जात असून कारवाईचे सत्र सुरू आहे. मात्र चंद्रपूर, भंडारा, वर्धा या बाहेर जिल्ह्यातून नागपूर जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या प्रवाशांची स्थानिक राष्ट्रीय व राज्यमार्गावर कुठलीच तपासणी होतांना दिसत नाही. प्रवाशांच्या तपासणीसाठी नाका, पथक अशी कुठलीच यंत्रणा येथे तैनात नाही.
भिवापूर व सालेभट्टी (चोर) फाटा
लॉकडाऊनच्या काळात भिवापूर शहरातून जाणाऱ्या नागपूर-गडचिरोली राष्ट्रीय मार्गावर व सालेभट्टी (चोर) फाट्यावर जिल्हा सीमाबंदी नाके उभारून प्रवाशांची तपासणी केल्या गेली. आता मात्र या दोन्ही ठिकाणी कुठल्याही पध्दतीचे नाके अथवा तपासणी सुरू नाही. दोन्ही मार्गावरून बिनधास्त वाहतूक सुरू आहे.