निशांत वानखेडेनागपूर : काळ बदलतोय, मुली प्रत्येक क्षेत्रात मुलांच्या बरोबरीने कार्य करीत आहेत. मात्र त्यांची सुरक्षा आजही समाजाला भेडसावणारा प्रश्न आहे. यावर उपाय शोधण्यासाठी अनेकांकडून प्रयत्न सुरू आहेत. असाच एक प्रयोग नागपूरच्या प्राध्यापकाने केला आहे. त्यांनी मुलींच्या जुती किंवा सँडल्सच्या सोलमध्ये जीपीएस व जीएसएम तंत्र बसविले आहे. कोणत्याही आपत्तीच्या वेळी सोलमधल्या 'प्रेशर सेन्सर'द्वारे पोलिस, अॅम्ब्युलन्स व घरच्यांनाही ताबडतोब मदतीसाठी संदेश जाईल.
एस. बी. जैन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अॅण्ड मॅनेजमेंटचे प्रा. डॉ. राहुल पेठे यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांच्या सहकार्याने हे तंत्र विकसित केले आहे. त्यांनी जुतीच्या सोलमध्ये जीपीएस लोकेशन सिस्टीम व जीएएसएम सिस्टीम फिट केले आहे. शिवाय अंगठ्याच्या खाली प्रेशर सेन्सर लावला आहे.
रात्री-बेरात्री बाहेर असताना किंवा दिवसाही कधी महिला, मुलींसोबत अनुचित घटना घडत असेल, तर प्रेशर पॉइंटद्वारे जुळलेल्या क्रमांकावर जीएसएम सिस्टीमने ताबडतोब संदेश जाईल. हा संदेश घरच्यांसोबत पोलिसांना आणि रुग्णवाहिकेलासुद्धा पोहचेल. जीपीएस सिस्टीमने मुलीचे लोकेशन पटकन कळेल आणि मदत पोहचविण्यास मदत होईल, असा दावा प्रा. पेठे यांनी केला आहे.
डॉ. पेठे यांच्या संकल्पनेतून हे तंत्र विकसित करण्यात व्यंकट रेड्डी, आर्यन सिंह, ईशा मानवटकर व विशाल टिकले या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यांचे हे संशोधन प्रकाशित झाले आहे. पेटंट मंजूर झाल्यावर कंपन्यांशी करार करून व्यावसायिक उपयोगासाठी तयार करण्यात येईल, असे डॉ. पेठे यांनी सांगितले.
हेल्मेटमध्ये हवेच्या पिशव्या
- डॉ. पेठे यांच्या टीमने रस्ते सुरक्षेवरही प्रयोग केला आहे. त्यांनी सेन्सरयुक्त हेल्मेटमध्ये एअर बॅग्स बसविल्या आहेत. बाइक चालविताना अपघाताची स्थिती निर्माण झाल्यावर जोराचा धक्का बसताच हेल्मेटमधील एअर बॅग्स खुलतील.
- या बॅग्स चेहऱ्यावर येणार नाहीत, तर दोन्ही भुजा आणि छातीच्या भागाला सुरक्षित करतील. यामुळे बाइक चालक पडला तरी त्याला अधिक मार लागणार नाही, असा दावा डॉ. पेठे यांनी केला. पेटंट मंजूर होताच ते महाराष्ट्र सरकारला सुपूर्द करू, अशी माहिती डॉ. पेठे यांनी दिली.
समृद्धीवर अपघात टाळण्यासाठीही 'फास्टॅग'मध्येच प्रयोग
- समृद्धी महामार्गावर नेहमी अपघात होत असतात. हा सिमेंटचा रस्ता सरळ व पूर्णपणे पांढरा आहे. त्यावरून सूर्यकिरणांचे परावर्तन होत असून त्यामुळे वाहनचालकांच्या डोळ्यांवर परिणाम होतो. चालकांना थकवा व झोप येते. यामुळे वाहनचालकांनी ठराविक अंतरावर थांबणे गरजेचे आहे. त्यासाठी 'फास्टॅग'मध्येच अंतर मोजण्याचे तंत्र फिट करण्यात येईल.
- हे तंत्र दर ५० किमीवर अलर्ट देईल. १५० किमी चालल्यावर वाहन थांबविणे आवश्यक असेल. चालक थांबला नाही तर त्यांच्या फास्टॅगमधूनच दंड वसूल करण्यात येईल. यासाठी महामार्गावर दर ५० किमीला रेस्ट रूम, हॉटेलची व्यवस्था आणि पोलिस यंत्रणा सज्ज ठेवणे गरजेचे असल्याचे डॉ. पेठे यांनी सांगितले. याचा प्रस्तावही केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना दिल्याचे त्यांनी सांगितले.