राज्यपालांच्या निर्देशांचे पालन करण्यास शासन कटिबद्ध
By Admin | Updated: August 27, 2016 02:06 IST2016-08-27T02:06:21+5:302016-08-27T02:06:21+5:30
राज्यपालांच्या निर्देशांचे तंतोतंत पालन करण्यास आम्ही (शासन) कटिबद्ध आहोत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

राज्यपालांच्या निर्देशांचे पालन करण्यास शासन कटिबद्ध
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर : राज्यपालांच्या निर्देशांचे तंतोतंत पालन करण्यास आम्ही (शासन) कटिबद्ध आहोत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.
अमरावती महसूल विभागात सिंचन खात्यातील सर्व रिक्त जागा चार महिन्यात भरा आणि मागील तीन वर्षात विकास निधीचे वाटप ज्या प्रमाणात झाले, त्या प्रमाणात खर्च झाला किंवा नाही, याची माहिती जुलै २०१६ पर्यंत सादर करा. त्याची पुस्तिका काढा, असे राज्यपालांनी ११ मार्च २०१६ रोजी सरकारला सांगितले होते.
आता पाच महिने होत आहेत. परंतु अमरावती विभागातील सिंचन विभागात अजूनही ३३ टक्के पदे रिक्त आहेत आणि विकास निधी खर्च झाल्याबाबतची माहिती सरकारने अजूनही दिलेली नाही. त्यामुळे फडणवीस सरकारही राज्यपालांच्या निर्देशांबाबत उदासीन असल्याची टीका विदर्भाच्या अनुशेषाचे गाढे अभ्यासक आणि विदर्भ विकास महामंडळाचे तज्ज्ञ सदस्य अॅड. मधुकरराव उपाख्य मामा किंमतकर यांनी केली होती. तसेच तेलंगणासोबत झालेल्या करारासंदर्भात महाराष्ट्रातील कामे तेलंगणाप्रमाणे तीन वर्षात होतील का असा प्रश्न सुद्धा उपस्थित केला होता.
त्यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यपालांच्या निर्देशांचे पालन करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत, असे सांगत नागपूरच्या माझ्या पुढील भेटीत मी मामा किंमतकर यांची भेट घेईन आणि प्रश्न समजून घेऊन तो तत्काळ सोडविन, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.(प्रतिनिधी)