सोन्या चांदीचे दागिने लंपास : कळमन्यातील घटना नागपूर : सराफा व्यापार्याच्या हातातील सोन्याचांदीच्या दागिन्यांची पिशवी हिसकावून दोन भामटे पळून गेले. आज रात्री ८ ते ८.१५ च्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे नागपुरात कडक बंदोबस्त असल्याचा पोलिसांचा दावा पोकळ असल्याचे स्पष्ट झाले आहे. नंदनवनमधील विजय आनंदराव दिवे (वय ५१, रा. नंदनवन) यांचे पारडी (कळमना) येथील रामभूमी सोसायटीत चंद्रकांत ज्वेलर्स आहे. नेहमीप्रमाणे आज रात्री ८ वाजता दिवे यांनी आपले दुकान बंद करण्यापुर्वी दुकानातील सोन्याचांदीचे दागिने पिशवीत घातले. दुकान बंद केल्यानंतर ही पिशवी घेऊन दिवे महाजन वाडीतून बसस्थानकाकडे निघाले. धांदे सलून समोर एक भामटा आला. त्याने दिवे यांच्या हातातील दागिने असलेली पिशवी हिसकावून पळ काढला. काही अंतरावर असलेल्या साथीदाराच्या मोटरसायकलवर बसून हा भामटा पळून गेला. दिवे यांनी मदतीसाठी आरडाओरड केली. काहींनी लुटारूंचा पाठलागही करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते पळून गेले. पोलिसांच्या माहितीनुसार, लुटारूंनी पळविलेल्या पिशवीत ४२ ग्राम सोने आणि २५0 ग्राम चांदीचे दागिने असा एकूण १ लाख, ३६ हजारांचा ऐवज होता. दिवे यांनी फोनवरून नियंत्रण कक्षाला ही माहिती दिली. कळमना पोलिसांना कळताच ते लगेच घटनास्थळी दाखल झाले. दिवे यांच्याकडून लुटारूंचे वर्णन ऐकल्यानंतर आरोपींची शोधाशोध सुरू केली.(प्रतिनिधी)
सराफा व्यापार्याला लुटले; दहशत
By admin | Updated: May 16, 2014 00:52 IST