एकाला कोठडी : दुसऱ्याची सुधारगृहात रवानगीनागपूर : नंदनवनमधील गोपाळनगरात शुक्रवारी दिवसाढवळ्या झालेल्या रमाबाई आनंदराव मडावी (वय ५२) या महिलेची हत्या करणाऱ्या एका अल्पवयीन आरोपींसह दोघांना पोलिसांनी अटक केली. सर्वेश धर्मेंद्र गौर (वय २०, रा. मोतीबाग रेल्वे कॉलनी) हा यातील मुख्य आरोपी आहे. त्याचा २५ नोव्हेंबरपर्यंत पोलिसांनी पीसीआर मिळवला तर, दुसरा आरोपी अल्पवयीन (वय १७) असल्यामुळे त्याची सुधारगृहात रवानगी करण्यात आली.रमाबाईच्या पतीचे निधन झाले असून, दोन मुलींचे विवाह झाल्यामुळे त्या मुलगा सुभाषसोबत राहात होत्या. सुभाष महापालिकेच्या पाण्याचा टँकर चालवतो. रमाबार्इंकडे भाडेकरूसुद्धा आहेत. सुभाष शुक्रवारी कामावर गेला होता. दुपारी ३.३० च्या सुमारास रमाबाईच्या किंकाळ्या ऐकून बाहेर आलेल्या भाडेकरू योगिता सोनटक्के यांना गंभीर अवस्थेतील रमाबाई दिसल्या. दोघांनी शस्त्राचे घाव घातल्याचे सांगून रमाबाई खाली कोसळल्या. योगिताने शेजाऱ्यांच्या मदतीने रमाबार्इंना रुग्णालयात नेले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला. रमाबाईची हत्या कुणी आणि कशासाठी केली, त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस उपायुक्त ईशू सिंधू यांच्या मार्गदर्शनाखाली नंदनवनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम, सहायक निरीक्षक प्रशांत भरते, उपनिरीक्षक मनीष वाकोडे आणि योगेश इंगळे, एस.एन. यावले यांनी दिवभर धावपळ केली. आरोपींना रमाबार्इंनी नाश्ता दिल्याचे तेथे ठेवलेल्या प्लेटवरून दिसल्याने आरोपी ओळखीचे असावे, असा निष्कर्ष पोलिसांनी काढला. त्याआधारे चौकशी केली असता मोतीबागमधील धर्मेश गौर याचे रमाबार्इंकडे नेहमी येणे जाणे होते, अशी माहिती पोलिसांना कळली. पोलिसांनी धर्मेशला ताब्यात घेत चौकशी केली. त्याचा मुलगा सर्वेश (वय २०) गायब होता, तो फोनही उचलत नसल्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. त्यावरून त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याने रमाबाईच्या हत्येची कबुली देतानाच हत्येचे कारणही स्पष्ट केले.सर्वेश आणि त्याच्या साथीदारासाठी रमाबाईने नाश्ता आणला. मात्र, सर्वेशचे समाधान झाले नाही. ‘तू माझ्या आईचा बळी घेतला आता वडिलांना कंगाल करून आमचे भविष्य अंधकारमय करीत आहे‘, असा आरोप सर्वेशने लावला. त्यामुळे रमाबाई संतप्त झाली. त्यांच्यात बाचाबाची झाली. तेवढ्यात सर्वेशने लपवून ठेवलेली गुप्ती बाहेर काढून रमाबाईच्या छातीवर वार केले आणि साथीदारासह पळून गेला.(प्रतिनिधी)आईच्या आत्महत्येचा सूड उगवलाधर्मेश गौर नोकरीत आहे. तो नेहमीच रमाबार्इंकडे जायचा. तिला पैसेही द्यायचा. त्याचे हे वर्तन पत्नीला (सर्वेशच्या आईला) कळले. त्यामुळे तिने समजूत काढण्याचे प्रयत्न केले. मात्र, धर्मेश पत्नीशी भांडू लागला. त्यामुळे तिने गेल्या फेब्रुवारी महिन्यात आत्महत्या केली. आपल्या आईच्या मृत्यूला पित्याचे वर्तन आणि रमाबाईच कारणीभूत असल्याची भावना झाल्यामुळे सर्वेश कमालीचा संतापला होता. त्यात गेल्या काही महिन्यात रमाबाईला धर्मेशने मोठी रक्कम दिल्याचे कळल्याने त्याचा राग अनावर झाला. याचमुळे तो शुक्रवारी दुपारी रमाबार्इंचा घरी गेला. वडिलाने दिलेले पैसे परत मागू लागला. हे पैसे एका व्यक्तीला दिले तो २८ तारखेला परत करणार आहे, असे रमाबाईने त्याला सांगितले. ‘तो’ नाहकच फसलाया हत्याकांडात सर्वेशचा मित्र नाहकच अडकला. सर्वेश अनेकदा नापास झाला. त्यामुळे तो अकरावीत आहे तर, त्याचा अल्पवयीन मित्र सुद्धा अकरावीतच आहे. एका जणाकडून पैसे घ्यायचे आहे, असे सांगितल्यामुळे मित्र सर्वेशसोबत रमाबार्इंच्या घरी गेला. त्याला सर्वेशच्या मनात भलतेच काही आहे, त्याच्या जवळ गुप्ती आहे, याची मित्राला कल्पनाच नव्हती. एकाएकी सर्वेशने गुप्ती काढून रमाबाईला भोसकल्यानंतर मित्राला सर्वेश कटानुसारच रमाबाईकडे गेला होता, त्याची कल्पना आली. या प्रकरणात तो नाहकच आरोपी झाला आहे.
नंदनवन हत्या प्रकरणातील आरोपी गजाआड
By admin | Updated: November 22, 2015 03:01 IST