ठगबाजांच्या विळख्यात उपराजधानी; सहा दिवसात १३५ कोटींची फसवणूक उघडकीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2020 07:00 AM2020-11-21T07:00:00+5:302020-11-21T07:00:12+5:30

Nagpur News fraud कागदोपत्री घोटाळा करून सामान्यांच्या परिश्रमाच्या कमाईवर हात साफ करणारे ठगबाज नागपूरसाठी धोकादायक ठरत आहेत. नित्य नवे घोटाळे करून हे ठगबाज सामान्यांना कंगाल करत आहेत.

Fraud of Rs 135 crore exposed in six days in Nagpur | ठगबाजांच्या विळख्यात उपराजधानी; सहा दिवसात १३५ कोटींची फसवणूक उघडकीस

ठगबाजांच्या विळख्यात उपराजधानी; सहा दिवसात १३५ कोटींची फसवणूक उघडकीस

googlenewsNext
ठळक मुद्दे कंगाल झाल्यावरच पुढे आल्या घटना


जगदीश जोशी

 लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कागदोपत्री घोटाळा करून सामान्यांच्या परिश्रमाच्या कमाईवर हात साफ करणारे ठगबाज नागपूरसाठी धोकादायक ठरत आहेत. नित्य नवे घोटाळे करून हे ठगबाज सामान्यांना कंगाल करत आहेत. गेल्या सहा दिवसात नोंद झालेल्या दोन प्रकरणात १३५ कोटी रुपयांचा घोटाळा पुढे आला आहे. हा आकडा आर्थिक गुन्हेगारीचे गांभीर्य विषद करणारा आहे.

आर्थिक घोटाळ्यांसाठी नागपूरचे नाव आधीपासूनच चर्चेत आहे. कळमना अर्बन, वासनकर, श्री सूर्या, समीर जोशी, रवी जोशी, झामरे, झाम, नवाेदय बँक, मैत्रेय पत संस्था, चिमणकर यांच्यासारख्यांनी यापूर्वी गरीब व मध्यमवर्गीयांचे हजारो-लाखो रुपये हडप केले आहेत. गुंतवणुकीत भक्कम नफा मिळविण्याच्या लालसेने परिश्रमपूर्वक मिळवलेले धन नागरिकांनी या ठगबाजांच्या हाती सोपवले. कोणी अचल संपत्ती विकून तर कुणी मुलांच्या शिक्षणाचा किंवा मुला-मुलीच्या लग्नासाठी बचत केलेली रक्कम अशा प्रकरणात गमावली. विशेष म्हणजे, हे सगळे प्रकरण गुंतवणूकदार रस्त्यावर उतरल्यावरच उघडकीस आले आहेत. पोलिसांनी स्वत:हून अशा घोटाळेबाजांवर अंकुश लावला, असे एकही प्रकरण गेल्या दोन दशकात दिसून आले नाही, हे विशेष. गेल्या सहा दिवसात नोंद झालेले दोन प्रकरण अशाच स्वरूपाचे आहेत.

यातील पहिले प्रकरण सीताबर्डी येथील आहे. गुंतवणुकीवर तीन टक्के मासिक व्याज आणि बोनस देण्याची लालूच दाखवून सुशिल कोल्हे, त्याचा भाऊ पंकज कोल्हे आणि साथीदार भरत साहू यांनी नागरिकांना ३५ कोटी रुपयांनी ठगवले आहे. कोल्हे बंधूंनी सुरुवातीला इंदोरा येथे कार्यालय थाटले. तीन वर्षे येथे एमएलएम कंपनी चालवली. त्यानंतर २०१८मध्ये सिव्हील लाईन्स येथील उत्कर्ष अपार्टमेंटमध्ये एजीएम कार्पोरेशन चालवत होते. प्रारंभी त्यांनी स्थानिक गुंतवणूकदारांना कंपनीशी जोडले आणि हळूहळू अन्य राज्यातही आपले जाळे पसरवले. डिजिटल मार्केटिंगमध्ये गुंतवणूक करण्याच्या नावावर अनेकांना यात सहभागी करून घेतले. तारांकित हॉटेलमध्ये सेमिनार आयोजित करून आपले नेटवर्क महाराष्ट्रापासून ते हिमाचल, बिहार, छत्तीसगड, मध्य प्रदेश, तेलंगणा, पंजाब आदी राज्यात वाढवले. नागपूरच्या धर्तीवर त्यांनी सर्वच राज्यांमधील गुंतवणूकदारांना प्रारंभावस्थेत लाभ दिला आणि नंतर व्यवसाय गुंडाळला. गेल्या एक वर्षापासून गुंतवणूकदार पोलिसांकडू चकरा मारत होते. मात्र, त्यांना आश्वासनापलिकडे काहीच प्राप्त झाले नाही. अखेर त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख व पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे विनवणी केली तेव्हा ७ नोव्हेंबरला सीताबर्डी ठाण्यात ३५ कोटी रुपयांच्या ठगवणुकीचे प्रकरण नोंदवले गेले. प्रकरण तापले असल्याचे कळताच कोल्हे बंधू फरार झाले.

अशाच प्रकारचे प्रकरण विजय गुरुनुले याचे आहे. याने ऑनलाईन ट्रेडिंगच्या नावावर जवळपास १०० कोटी रुपयांनी सामान्यांना गंडवले आहे. जवळपास पाच वर्षापासून गुरुनुले सामान्यांना विविध योजनांच्या नावाखाली आपल्या सापळ्यात अडकवत होता. प्रतापनगर ठाण्याजवळ मंगलमूर्ती चौकात त्याचे कार्यालय होते. गुरुनुले व त्याचे सहकारी बोगस योजना राबवून जोरदार प्रचार-प्रसार करत होते. यात अनेक लोक अडकले. पोलिसांनाही याचा अंदाजा आला नाही. विशेष म्हणजे गुरुनुले सर्वात आधी गुंतवणूकदारांना सुरक्षा म्हणून दुसऱ्याच्या मालकीच्या फ्लॅटची नोटरी करून देत होता. दरम्यान काही पीडित प्रतापनगर ठाण्यात पोहोचले. पोलिसांच्या सुस्तीची जाणिव असल्याने या पीडितांना मोठ्या अधिकाऱ्यांकडे मदत मागण्यासाठी जावे लागले. त्यांनी अपर आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांना हकीकत सांगितली. रेड्डी आणि नुरूल हसन यांच्या निर्देशानुसार सीताबर्डी, अंबाझरी, प्रतापनगर ठाण्यातील पोलीस दलाने गुरुनुलेच्या कार्यालयावर छापा मारला. एवढे सगळे झाल्यावरही गुरुनुलेची माणसे तक्रारकर्त्यांना रक्कम परत करण्यासोबतच अनेक प्रकारची प्रलोभने देत होते. परंतु, पोलीस अधिकाऱ्यांच्या कठोर भूमिकेमुळे आणि तक्रारकर्ता गणेश चाफले यांच्या हिमतीमुळे प्रकरण उघडकीस आले. १३ नोव्हेंबरला चाफले यांच्या तक्रारीवर केवळ १९.३५ लाख रुपयाच्या ठगवणुकीचा गुन्हा नोंदवला गेला. सहा दिवसाच्या तपासानंतर ७० कोटीचा आकडा पुढे आला असून, १०० कोटीपर्यंत हा आकडा जाण्याची शक्यता आहे. आतापर्यंत या प्रकरणात नऊ आरोपींना अटक झाली आहे.

 

Web Title: Fraud of Rs 135 crore exposed in six days in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.