वन कर्मचार्यांच्या क्वॉर्टरची दुरवस्था : अनेक वर्षांपासून दुरुस्ती नाही
नागपूर : वन विभागाची इंदोरा परिसरातील फॉरेस्ट कॉलनी सध्या विविध समस्यांचा सामना करीत आहे. वन विभागाने गत अनेक वर्षांपूर्वी या कॉलनीचे निर्माण करून, येथे वन कर्मचार्यांसाठी राहण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. परंतु या कॉलनीची योग्य देखभाल व दुरुस्ती होत नसल्याने, येथील क्वॉर्टरची वाईट स्थिती झाली आहे. दुसरीकडे काही वन अधिकारी राजकीय नेत्यांच्या दबावात येथील क्वॉर्टर आरटीओला (ग्रामीण) देण्याचे षड्यंत्र रचत असल्याचा आरोप केला जात आहे. यावर काही वन कर्मचार्यांनी न्यायालयात जाण्याची तयारी सुरू केली आहे. ‘लोकमत’ प्रतिनिधीने या कॉलनीला प्रत्यक्ष भेट देऊ न येथील समस्यांचा आढावा घेतल्यावर, या कॉलनीची योग्य देखभाल न झाल्यामुळे क्वॉर्टरची स्थिती वाईट झाल्याचे दिसून आले. असे असताना, अनेक वन कर्मचारी या कॉलनीत राहत आहे. कॉलनीतील रस्ता पूर्णत: खराब झाला आहे. शिवाय त्यावर कुठेही पथदिवे दिसून येत नाही. येथील नागरिकांच्या मते, गत २५ वर्षांत येथील क्वॉर्टरची कोणतीही दुरुस्ती झालेली नाही. मात्र प्रत्येक महिन्याला वन कर्मचार्यांच्या वेतनातून देखभाल खर्च वसूल केला जातो. येथील महिलांच्या मते, पावसाळ्यात येथील बहुतांश क्वॉर्टरच्या छतातून पाण्याची गळती होते. त्यामुळे घरात ठिकठिकाणी भांडी ठेवावी लागतात. शिवाय परिसरातील डीपी उघड्यावर पडली आहे. त्यामुळे अनेकदा वीजपुरवठा खंडित होतो. क्वॉर्टरच्या अनेक खिडक्यांची तावदाने फुटलेली आहेत. अनेकांच्या घरातील बाथरूमचे दरवाजे तुटले आहेत. याविषयी वन विभागाला अनेकदा तक्रारी करूनही दुरुस्ती केली जात नसल्याचे महिलांनी सांगितले. येथील इमारत क्रमांक २ मधील एका महिलेच्या मते, या कॉलनीत एक पंप हाऊ स तयार करण्यात आले आहे. त्या पंप हाऊ सपर्यंत मनपाचे नळ कनेक्शन जोडण्यात आले आहे. मात्र पिण्याच्या पाण्यासाठी कोणतीही व्यवस्था केलेली नाही.