अवैध वृक्षतोड प्रकरण : चौकशी थंडबस्त्यात, बुंध्यांवर बोगस हॅमरचे निशाणकैलास निघोट देवलापार रामटेक तालुक्यातील पवनी वन परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या सवंदनी शिवारात सागवानाची ५८ झाडे अवैधरीत्या तोडण्यात आली. या झाडांच्या बुंंध्यांवर मारण्यात आलेले हॅमर हे बोगस असल्याचा आरोप जाणकारांनी केला आहे. यात सहायक वन संरक्षक वीरेसन यांच्यासह अन्य काही अधिकारी व कर्मचारी समाविष्ट असल्याने सदर प्रकरणाची चौकशी ही थंडबस्त्यात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. रामटेक तालुक्यातील सवंदनी शिवारातील वरघाट नाल्याच्या काठावरील सागवानाची ५८ झाडे तोडण्यात आली. ही सर्व झाडे झनक सोनवणे यांच्या शेतालगत असल्याने ती सोनवणे यांनी विकली होती. विक्रीचा व्यवहार पूर्ण होताच ही झाडे लगेच तोडून त्यांची विल्हेवाट लावण्यात आली. विशेष म्हणजे, ही झाडे तोडण्यासाठी महसूल अथवा वन विभागाची कुठलीही परवानगी घेण्यात आली नव्हती. ही सर्व झाडे तीन दिवसांत तोडण्यात आली असून, त्यासाठी इलेक्ट्रिॉनिक मशीनचा वापर करण्यात आल्याचे जाणकारांनी सांगितले. तोडण्यात आलेली झाडे वन विभागाच्या प्रतिबंधित क्षेत्रात येत असून, ती तोडण्याचा कुणालाही अधिकार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. तरीही ही झाडे विकण्यात व तोडण्यात आली. सोनवणे यांनी ही झाडे कुणाला विकली, ती कुणी कापली, याबाबत वन विभागाकडे माहिती उपलब्ध नाही. या झाडांचा सौदा करतेवेळी बोगस वन कर्मचारी सोनवणे यांच्याकडे गेले होते. या कर्मचाऱ्यांनी ठेकेदाराशी हा सौदा करून दिला. त्यावेळी झाडे तोडण्याच्या परवानगीची हमी घेण्यात आली होती. सदर प्रकरण चव्हाट्यावर येताच वन विभागाने कारवाई करायला सुरुवात केली. यातील काही झाडांच्या बुंध्यावर हॅमरने मारण्यात आले. या हॅमरच्या निशाणाकडे बारकाईने बघितले असता, ते बोगस असल्याचा आरोप काही जाणकारांनी केला आहे. या झाडांच्या लाकडांची टीपी (ट्रॉन्सपोर्ट परमिट) वन विभागाच्या देवलापार कार्यालयातून देण्यात आले. या टीपीच्या आधारे ही लाकडं नागपूरकडे नेण्यात आली.सदर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सहायक वनसंरक्षक वीरसेन यांची नियुक्ती करण्यात आली. वास्तवात वीरसेन यांची कार्यप्रणाली व वागणूक वादग्रस्त राहिली आहे. ते या प्रकरणाची चौकशी करण्यास मुद्दाम दिरंगाई करीत असल्याचे सूत्रांनी सांगितले. दुसरीकडे या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी आ. डी. एम. रेड्डी व भाजयुमोचे सचिव मूलचंद यादव यांनी मुख्य वनसंरक्षक यांच्याकडे केली आहे. वृक्षतोडीची परवानगी नाकारली होतीसागवान झाडे तोडण्यासाठी यापूर्वीही प्रयत्न करण्यात आला होता. त्यावेळी झाडे कापण्यासाठी वन विभागाकडे रीतसर परवानगी मागण्यात आली होती. यासाठी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यामार्फत प्रस्ताव पाठवावा लागतो. या नाल्याकाठी असलेली झाडे कुणाच्या खासगी मालकीची नसून ती वनविभागाची असल्याचे सांगून वन विभागाने ती झाडे तोडण्याची परवानगी त्यावेळी नाकारली होती. सध्या याच झाडांचा सौदा घाईघाईत करण्यात आला आणि या झाडांची क्षणाचाही विलंब न करता विल्हेवाट लावण्यात आली. या बाबीकडे वन अधिकाऱ्यांनी यावेळी दुर्लक्ष केले आहे. ती झाडे वन विभागाचीतोडण्यात आलेली नाल्याकाठची झाडे ही वन विभागाच्या मालकीची असून, ती संरक्षित वन क्षेत्रातील असल्याची माहिती सूत्रांनी दिली. परंतु, या झाडांच्या कटाईकडे वन अधिकाऱ्यांनी हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले आहे. ही झाडे तीन दिवस तोडण्यात आली. त्याच्या बुंध्यांवर रोज हॅमर मारण्यात आले. काही वन कर्मचाऱ्यांनी स्वत:च्या बचावासाठी त्यांना हवे तसे पंचनामे तयार करवून घेतले. विशेष म्हणजे, संपूर्ण लाकडांची योग्य विल्हेवाट लावण्यात आल्यानंतर पंचनामे करण्यात आले. या संदर्भात नेमकी कोणती कारवाई करण्यात आली, याबाबत कमालीची गुप्तता बाळगली जात आहे.
वन विभागाचे आरोपींना अभय
By admin | Updated: November 15, 2015 02:13 IST