मोवाड : स्थानिक मोवाड येथे बुधवारी रात्री अवकाळी पावसाने हजेरी लावली. वातावरणात अचानक झालेला बदल आणि गारपिटीच्या भीतीमुळे शेतकरी चिंतित आहेत. सध्या शेतकऱ्यांचे तूर काढणे सुरू आहे. हरभरा पूर्णत: भरायचा आहे. अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात आल्यास तूर व हरभरा पिकाचे नुकसान होण्याची शक्यता दिसत आहे. जिल्ह्यात या आठवड्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. खरीप हंगामात पावसाने कापूस, सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यात आंब्याबहाराची संत्री शेतकऱ्यांना कवडीमोल भावात विकावी लागली आहे. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. आता मृगबहारच्या संत्र्याला फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकऱ्यांना तूर व हरभरा पिकाकडून अपेक्षा होती. मात्र अवकाळी पावसाने त्यांच्या अपेक्षेवर पाणी फेरले आहे. यावर्षी शहरात मृगबहाराची संत्री नसल्याने शेतकरी चिंतित आहेत. अवकाळी पावसामुळे संत्र्यावरील आंब्याबहाराच्या फुटेवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
अवकाळी पावसाने शेतकरी चिंतित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:14 IST