नागपूर विद्यापीठ : शंभराव्या दीक्षांत समारंभाबाबत संभ्रम कायमनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शंभराव्या दीक्षांत समारंभामागील शुक्लकाष्ट संपण्याचे नावच घेत नसल्याचे दिसून येत आहे. सप्टेंबर महिन्यात हा समारंभ घेण्यात येईल, असा दावा प्रभारी कुलगुरू अनुपकुमार यांनी केला होता. परंतु मंगळवारी झालेल्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत यावर कुठलीही सकारात्मक चर्चा होऊ शकली नाही. त्यामुळे या मुद्यावरील संभ्रमाचे ढग अजूनही कायमच आहेत. दुसरीकडे प्रवेशबंदीच्या यादीतील ६३ महाविद्यालयांतील नियमबाह्य प्रवेशित विद्यार्थ्यांच्या विशेष परीक्षेचे प्रारूप तयार करण्यास परीक्षा मंडळाने नकार दिला.११७ महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यांकनाच्या गुणांच्या वैधतेवरून प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. यासंदर्भात गठित करण्यात आलेल्या डॉ.खडक्कार यांच्या अध्यक्षतेखालील समितीचा अहवाल अद्यापही राज्यपाल कार्यालयाकडे पाठविण्यात आलेला नाही. विद्यार्थ्यांना देण्यात आलेले प्रात्यक्षिक व अंतर्गत मूल्यांकनाचे गुण हे नियमानुसार योग्य आहेत की नाही, याचा निर्वाळा विद्यापीठाला द्यायचा होता. मंगळवारी झालेल्या विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत यासंदर्भात चर्चा झाली. डॉ.संजय खडक्कार समितीचा अहवाल अपूर्ण असल्याची बाब यादरम्यान समोर आली. हा अहवाल जोपर्यंत पूर्ण करण्यात येत नाही तोपर्यंत याला राज्यपालांकडे पाठविण्यात येऊ शकत नाही, असे मत मांडण्यात आले. यासंदर्भात बराच वेळ चर्चा झाल्यानंतर या अहवालासंदर्भात आणखी एक समिती बनविण्याचा निर्णय घेण्यात आला. ही समिती तयार करण्याचे सर्व अधिकार प्रभारी कुलगुरूंना देण्यात आले आहेत. या समितीत नवीन सदस्यांचा समावेश असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. अहवाल अपूर्ण का?११७ महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसंदर्भात उभ्या झालेल्या वादानंतर गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात डॉ.खडक्कार यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली होती. विद्यार्थ्यांना देण्यात आलेले गुण नियमानुसार आहेत की नाही हे निश्चित सांगता येणार नाही, असे समितीच्या चौकशीच्या अगोदरच तत्कालीन कुलगुरू डॉ.विलास सपकाळ यांनी राज्यपाल कार्यालयाला कळविले होते. यानंतर डॉ.खडक्कार यांनी चौकशी थांबविली होती व त्यामुळे अहवाल अद्यापही अपूर्ण आहे.(प्रतिनिधी)
आसमान से गिरा, खजूर पे अटका
By admin | Updated: July 2, 2014 00:59 IST