चालकांना केले मार्गदर्शन : सुरक्षितता मोहिमेचा शुभारंभ
नागपूर : रस्ता सुरक्षितता हा महत्त्वाचा विषय असून अपघात टाळण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यासाठी चालकांनी वाहन चालविताना समयसूचकता दाखवून अपघात टाळावेत, असा सल्ला मान्यवर वक्त्यांनी दिला.
एसटी महामंडळाच्या नागपूर विभागातील गणेशपेठ, वर्धमाननगर, घाट रोड आणि इमामवाडा आगारात रस्ता सुरक्षितता मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. त्यानिमित्त इमामवाडा आगाराच्या प्रबोधिनी सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मोहिमेचे उद्घाटन पोलीस निरीक्षक संजय जाधव यांनी केले. अध्यक्षस्थानी विभागीय वाहतूक अधिकारी तनुजा काळमेघ होत्या. यावेळी बोलताना निरीक्षक संजय जाधव म्हणाले, अपघातात मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. योग्य पद्धतीने रस्ता तयार झाल्यास अपघात टाळता येऊ शकतात. दोनपेक्षा अधिक अपघात झाल्यास त्या ठिकाणी जाऊन पाहणी करणे गरजेचे आहे. अपघात टाळण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. ज्योती उके यांनी अपघात टाळण्यासाठी स्पीड लॉक करण्यात येत असून अपघात होऊ नये यासाठी सर्वांनी काळजी घेण्याचे आवाहन केले. विभागीय सांख्यिकी अधिकारी किशोर आदमने यांनी अपघात सुरक्षितता मोहीम ही एसटी महामंडळाची सामाजिक बांधीलकी असल्याचे मत व्यक्त केले. तनुजा काळमेघ यांनी अपघात होऊ नयेत यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक स्वाती तांबे यांनी केले. संचालन माधुरी वालदे यांनी केले. आभार अनिल आमनेरकर यांनी मानले.
..............