योगेश पांडे नागपूर सामाजिक जीवनातील भाग असतानादेखील तृतीयपंथीयांना अनेक अधिकारांपासून वंचित रहावे लागते. विशेषत: शिक्षण घेत असताना एखादा अर्ज भरत असताना स्वत:ची ओळख नेमकी काय सांगावी हा प्रश्न त्यांच्यासमोर नेहमीच पडतो. परंतु विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशांनुसार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात लवकरच तृतीयपंथीयांना स्वत:ची वेगळी ओळख मिळणार आहे. विविध अर्जांमध्ये लिंगओळख सांगणारा ‘तृतीयपंथी’ हा एक वेगळा रकाना ठेवण्याबाबत शनिवारी होणाऱ्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे. विद्यापीठाच्या विद्वत परिषदेने याला अगोदरच मान्यता दिली आहे.साधारणत: परीक्षा किंवा शिष्यवृत्ती अर्जावर तृतीयपंथी विद्यार्थ्यांना स्वत:ची ओळख केवळ ह्यस्त्रीह्ण अथवा ह्यपुरुषह्ण या दोन रकान्यांपैकी एकामध्ये ह्ययोग्यह्णची खूण करून करून द्यावी लागते. त्यामुळे ‘तृतीयपंथी’ उमेदवारांसमोर अडचण निर्माण होते. स्वत:ची नेमकी ओळख सांगता येत नसल्यामुळे मनातल्या मनात घुसमटदेखील होते. संविधानानुसार तृतीयपंथीयांना त्यांची ओळख सांगण्याचा अधिकार आहे व यासाठी पावले उचलण्यात यावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. याचा आधार घेत विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे नागपूर विद्यापीठासह देशातील सर्वच विद्यापीठांना पत्र पाठविण्यात आले होते. यूजीसीच्या निर्देशांमुळे या विद्यार्थ्यांना स्वतंत्र रकाना उपलब्ध करून द्यावा लागणार आहे. तृतीयपंथी विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालय व विद्यापीठात स्वतंत्र स्वच्छतागृहे, कॉमनरुम इत्यादी सुविधा देण्याचे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाने दिले आहेत. शिवाय तृतीयपंथीयांबाबत असलेले गैरसमज दूर करण्यासाठी अभ्यासक्रमातदेखील त्यांच्याबाबत योग्य माहितीचा समावेश करण्यात यावा. तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विद्यार्थी, शिक्षक, पालक यांच्यासाठी विशेष कार्यशाळा आयोजित करण्याची गरज असल्याच्या सूचनादेखील आयोगाने केल्या आहेत. या पत्रावर २७ नोव्हेंबर रोजी झालेल्या विद्वत परिषदेच्या बैठकीत चर्चा करण्यात आली होती. सखोल चर्चेनंतर या बदलांना मान्यता देण्यात आली होती व पुढील मान्यतेसाठी व्यवस्थापन परिषदेकडे हा मुद्दा वर्ग करण्यात आला होता. त्यानुसार शनिवारी होणाऱ्या विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीच्या कार्यक्रम पत्रिकेत या मुद्द्याचा समावेश करण्यात आला असून यावर चर्चा होणे अपेक्षित आहे. व्यवस्थापन परिषदेने जर हिरवी झेंडी दाखवली तर यापुढे स्वत:ची स्वतंत्र ओळख सांगण्याची संधी तृतीयपंथीयांना विद्यापीठात मिळणार आहे.
तृतीयपंथीयांना मिळणार स्वत:ची ‘ओळख’?
By admin | Updated: January 31, 2015 02:16 IST