लोकमत न्यूज नेटवर्ककाटोल : पावसाळ्यात रेशनकार्ड धारकांना अन्नपुरवठा करण्यात अडथळा येऊ नये, त्यामुळे एकाच वेळी तीन महिन्यांचे रेशन जून महिन्यात कार्डधारकांना देण्याचा निर्णय शासनाने घेतला. याची अंमलबजावणी सध्या काटोल तालुक्यात सुरू आहे. परंतु, तालुक्यातील माळेगाव येथील रेशन विक्रेत्याकडून एका कार्डधारकाकडून एका महिन्याच्या रेशनवर एक किलोचा कट अशाप्रमाणे तीन महिन्यांचा तीन किलोचा कट लावण्याचा प्रकार समोर आल्याने गोंधळ उडालेला आहे.
पूरबाधित गावांना धान्य पुरवठा करण्यात प्राधान्य दिले जात आहे. दरवर्षी नदी व नाल्यांमुळे रेशनकार्ड धारकांना रेशन पुरवठा करण्यात बाधा निर्माण होतात. तालुका व जिल्हा मुख्यालयाशी नागरिकांचा संपर्क तुटतो. त्यामुळे नागरिकांना कधी कधी आठवडाभर गावातच राहावे लागते.
काही लोकांना सुरक्षित स्थळी हलविले जाते. हा धोका ओळखून ग्रामीण भागात पावसाळ्यातील तीन महिन्यांचे रेशन जून महिन्यातच पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार तालुक्यात धान्य पोहोचविण्याचे काम सुरूही झालेले आहे. अशात मात्र माळेगाव गावांतर्गत येणाऱ्या रेशन दुकानदाराकडून रेशनधारकांना एका कार्डामागे एक किलो प्रति महिना कट अशाप्रमाणे तीन महिन्यांचे तीन किलो धान्य कट करून वितरित केले जात असल्याने गावातील रेशनधारकांत मोठा रोष व्यक्त केला जात आहे. शासनाने तसे आदेश दिले आहेत का? आणि जर ते असतील तर ते लेखी स्वरूपात आहेत का? नसतील तर रेशन विक्रेता कोणत्या अधिकाराने हा कट लावून कमी धान्य कार्डधारकांना देत आहे, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
"ज्याच्या कार्डावर जेवढं रेशन ऑनलाईन आहे तेवढे रेशन विक्रेता दुकानदाराला वितरित करण्यात आले आहे. तेवढेच त्यांना द्यायचे आहे. यात एक किलो कमी वगैरे असा कुठेही सांगण्यात आलेले नाही. रेशन कमी देण्याचा प्रकार कुठे होत असेल तर तहसीलदारांकडे लेखी तक्रार करावी."- मोनिका गजभिये, पुरवठा निरीक्षक, काटोल
"सध्या गावांमध्ये रेशन कार्डवर तीन महिन्यांचे वाटप सुरू आहे. काल माझी आई प्रभाबाई विनायक रेवस्कर ही रेशन घेण्याकरिता दुकानात गेली असता तिला तीन महिन्यांचे तीन किलो याप्रमाणे रेशन कमी देण्यात आले. विचारणा केली असता आम्हाला समोरूनच रेशन कमी आल्याचे विक्रेत्याने सांगितले."- सचिन रेवस्कर, माळेगाव, ता. काटोल