खबरदारी गरजेची : प्रवासात चुकाल तर जीवनाला मुकाल
दयानंद पाईकराव - नागपूर
कोचच्या दारावर उभे राहून मोबाईलवर गप्पा मारणारे अनेक प्रवासी बोलण्याच्या ओघात कोचखाली पडतात. गंभीर जखमी झाल्याने रुग्णालयात जाण्याची पाळी येते. अनेकदा अवैध व्हेंडर्सकडून घेतलेले गुंगीचे खाद्यपदार्थ खाल्ल्यामुळे दोन दिवस शुद्धीवरही येत नाहीत. हा निष्काळजीपणा अनेक प्रवाशांच्या जीवितावरही बेततो. तर अनेकदा उशिरा रेल्वेस्थानकावर पोहोचलेले प्रवासी धावत्या गाडीत चढण्याचा प्रयत्न करून थेट मृत्यूलाच आव्हान देतात. अशा प्रकारच्या असंख्य घटना घडूनही प्रवासी त्याबाबत कुठलीच सावधानी बाळगताना दिसत नाहीत. याबाबत जागृती करूनही प्रवासी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्यामुळे या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसते. रेल्वे प्रवासात दररोज प्रवाशांसोबत अनेक प्रकारच्या घटना घडतात. प्रवासात प्रवाशांना लुटणारी टोळी अनेक रेल्वेगाड्यात प्रवाशांच्या भोळेपणाचा फायदा घेते. त्यांना खाद्यपदार्थातून गुंगीचे औषध देऊन त्यांची लूट करते. अनेकदा प्रवाशांच्या झोपेचा फायदा घेऊन त्यांचे सोन्या-चांदीचे दागिने पळविण्याचे प्रकार घडतात. रेल्वेत प्रवास करताना रेल्वे प्रशासनाने काही नियम घालून दिलेले आहेत. परंतू त्या नियमाकडे डोळेझाक केल्यामुळे प्रवाशांच्या जीवितावर बेतते. यामुळे प्रवासाला निघताना प्रवाशांनी काळजी घेऊन आपला बचाव करण्याची गरज आहे. अवैध व्हेंडरला म्हणा ‘नो’ रेल्वेगाडीत खाद्यपदार्थांची विक्री करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने व्हेंडर्सची नियुक्ती केलेली असते. यासाठी त्यांना रीतसर खाद्यपदार्थ विकण्याचा परवाना आणि ओळखपत्र रेल्वेकडून देण्यात येते. परंतु अनेकदा रेल्वेगाड्यात कुठलाही परवाना नसताना अनेक अवैध व्हेंडर्स खाद्यपदार्थ विकताना दिसतात. त्यांच्याकडील चटपटीत खाद्यपदार्थ दिसले की प्रवाशांच्या जीभेला पाणी सुटते. कुठलाही विचार न करता प्रवासी खाद्यपदार्थ विकत घेऊन खातात. परंतु अशा प्रकारे विकत घेतलेल्या खाद्यपदार्थात गुंगीचे औषध असण्याची शक्यता नाकारता येत नाही. संबंधित प्रवाशाने असे खाद्यपदार्थ खाल्ल्यानंतर ते बेशुद्ध होतात. त्याचा फायदा घेऊन त्यांचे महागडे साहित्य, पैसे चोरीला जाण्याच्या घटना घडतात. त्यामुळे अधिकृत व्हेंडर्सकडून खाद्यपदार्थ विकत घेणे गरजेचे आहे. बर्थचे आमिष दाखवून लूट अनेकदा प्रवाशांचे तिकीट कन्फर्म नसल्यामुळे त्यांना बर्थ मिळत नाही. परंतू असे प्रवासी हेरून रेल्वेस्थानकावर भामटे त्यांना हेरतात. बर्थ पाहिजे का अशी विचारणा करतात. प्रवाशाने होय म्हटले की त्यांच्याकडून पैसे उकळतात, बर्थ क्रमांक घेऊन येतो म्हणून त्यांना एका ठिकाणी बसवतात. मात्र त्यानंतर त्या प्रवाशाचे तिकीट रद्द करून आणि बर्थ मिळवून देण्याचे पैसे घेऊन पळ काढतात. अशा प्रकारे अनेक प्रवाशांची लूट झाल्याची उदाहरणे आहेत. रेल्वेगाडीचा चार्ट तयार झाल्यानंतर टीसीशिवाय कुणीही बर्थ मिळवून देऊ शकत नाही. परंतू ही साधी बाब प्रवाशांच्या लक्षात येत नसल्यामुळे त्यांची फसवणूक होते. चालत्या गाडीत चढणे-उतरणे टाळा चालत्या गाडीत चढणे, उतरणे किंवा गाडीच्या पायदानावर बसून प्रवास करणे हा रेल्वे अॅक्ट १५६ नुसार गुन्हा आहे. अनेकदा रेल्वेगाडी सुटल्यानंतर प्रवासी धावत जाऊन गाडी पकडतात. अशा वेळी एखाद्या प्रसंगी प्रवाशाचा पाय घसरून तो कोचखाली आल्यास त्याच्या चिंधड्या उडण्याची शक्यता राहते. परंतु प्रवासी त्याकडे दुर्लक्ष करून साक्षात मृत्यूलाच आमंत्रण देतात. त्यामुळे रेल्वेगाडी सुटण्याच्या दहा मिनिटे आधी रेल्वेस्थानकावर पोहोचून गाडीत चढण्याची गरज आहे. प्रवाशांनी रेल्वेच्या नियमांचे पालन करून आपल्या जीविताचे रक्षण करण्याची गरज आहे.