लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेचे आयुक्त असलेले शुभम गुप्ता यांची विदर्भ वैधानिक विकास मंडळाच्या सदस्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात झालेल्या गायवाटप घोटाळ्याप्रकरणी तत्कालीन प्रकल्प अधिकारी असलेले शुभम गुप्ता दोषी आढळले होते. प्रशिक्षण कालावधीतच आरोप झाल्याने ते वादग्रस्त ठरले होते.
राज्यात अतिदुर्गम आणि आदिवासीबहुल समजल्या जाणाऱ्या भामरागड व एटापल्ली येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत असताना शुभम गुप्ता यांनी दुधाळ गायवाटप योजनेत लाखोंचा घोटाळा केला होता.
याप्रकरणी आदिवासी विभागाने केलेल्या चौकशीत ते दोषी आढळले. त्यानंतर गुप्ता यांच्या कारनाम्यांची राज्यभरात चर्चा झाली. काही महिन्यांपूर्वी गडचिरोली येथे पीडित आदिवासींनी एकत्र येत आंदोलनही केले होते. आता त्यांच्याकडे फक्त कागदावरच सुरू असलेल्या विदर्भ वैधानिक विकास मंडळाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एच. पालवे यांची महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ, मुंबईच्या व्यवस्थापकीय संचालकपदी बदली करण्यात आली आहे. तर मनोज रानडे यांच्याकडे पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
चंद्रपूर, वरोऱ्याचे सहायक जिल्हाधिकारी जेनीथ चंद्र देवंथुला यांची नांदेडच्या किनवट येथील आयटीडीपीमध्ये कार्यक्रम अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. मध्य प्रदेश कॅडरमध्ये असलेल्या अंजली रमेश यांची महाराष्ट्र कॅडरमध्ये बदली करून त्यांना हिंगोली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.