दोन्हीकडे वाढणार बंडखोर : जातीच्या राजकारणात कोण ठरणार वरचढ?गणेश खवसे - नागपूरकामठी शहर आणि ग्रामीण भागाचा विचार केला असता कामठी विधानसभा क्षेत्रात जातीपातीचे राजकारण होण्याची शक्यता आहे. त्यात कोण आपल्याकडे मते वळविण्यात यशस्वी होतो, तोच येथील आमदार होतो, हे एक सूत्र येथे निश्चित झाले आहे. कामठी विधानसभा हा १९६२ ते १९९० पर्यंत काँग्रेसचा गड होता. १९६२ मध्ये अनंतराम चौधरी, १९६७ मध्ये एस. ए. पठाण, १९७२ मध्ये पुन्हा एस. ए. पठाण, १९७८ मध्ये तेजसिंहराव भोसले, १९८० मध्ये सुरेश देवतळे, १९८५ आणि १९९० मध्ये यादवराव भोयर हे काँग्रेसच्या तिकिटवर विजयी झाले. या विजयी परंपरेला १९९५ च्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार देवराव रडके यांनी खिंडार पाडले. त्यानंतर पुढच्याच अर्थात १९९९ च्या निवडणुकीत रिपाइंकडून लढलेल्या अॅड. सुलेखा कुंभारे येथून विजयी झाल्या. २००४ आणि २००९ मध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांच्या रूपाने भाजपने हा गड आपल्या ताब्यात घेतला. तेली, कुणबी, मुस्लिम आणि अनुसूचित जाती अशी साधारणत: या मतदारसंघाची एकगठ्ठा मते आहे. या समाजातील मतदारांशी जुळवून घेतले, तो उमेदवार विजयी होतो हे आतापर्यंतच्या प्रत्येक निवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट होते. २००९ च्या निवडणुकीत कामठी विधानसभेने पुन्हा भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रतिनिधित्व मान्य केले. त्यांनी येथून ३१ हजार ९३ मतांनी काँग्रेसच्या सुनीता गावंडे यांचा पराभव केला. बावनकुळे यांना ९४ हजार ९९५ तर गावंडे यांना ६३ हजार ९२९ मते पडली. तिसऱ्या क्रमांकावर बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या अॅड. सुलेखा कुंभारे (२४ हजार २३६) होत्या. आगामी निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून पुन्हा चंद्रशेखर बावनकुळे यांनाच उमेदवारी मिळणार असल्याचे निश्चित आहे. त्यांचा हा ‘हॅट्ट्रिक चान्स’ आहे. त्यांच्यासोबतच भाजपकडून नागपूर पंचायत समितीचे सभापती अजय बोढारे, जिल्हा परिषद सदस्य रुपराव शिंगणे, माजी सदस्य टेकचंद सावरकर हेसुद्धा इच्छुक आहेत.काँग्रेसची यादी बरीच मोठी आहे. येथून प्रमुख दावेदार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश भोयर मानले जातात. तर हुकूमचंद आमधरे, प्रसन्ना तिडके, शकूर नागाणी, नाना कंभाले हे सुद्धा काँग्रेसकडून इच्छुक उमेदवार आहेत. दुसरीकडे राजेंद्र मुळक यांना येथून लढविण्यासाठी काँग्रेसच्या गोटात प्रयत्न केले जात आहे. काँग्रेसची यादी बरीच मोठी असल्याने ऐनवेळी बंडखोरी होण्याची शक्यता अधिक आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत युतीचे उमेदवार कृपाल तुमाने यांना कामठी विधानसभा मतदारसंघातून ३५ हजार ४२३ मतांची आघाडी मिळाली. एवढी मोठी ‘लीड’ पाहून भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्याची लाट पसरली. त्यामुळेच अनेकांनी निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. मात्र बावनकुळे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वीपासूनच केल्याने त्यांना भाजपची उमेदवारी निश्चित मिळणार असल्याचे बोलले जाते. बावनकुळे यांनी पाचही वर्षे प्रत्येक गावातील मतदारांशी ठेवलेला जनसंपर्क ही त्यांच्या जमेची बाजू आहे. त्याचवेळी वेळेवर कोणाला तिकीट मिळेल, याबाबत काँग्रेस नेते साशंक आहेत. ऐनवेळी तिकीट जाहीर केल्याने काँग्रेसमध्ये बंडखोरांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. ऐनवेळी बंडखोरांना कशाप्रकारे शांत केले जाते, त्यावर येथून कोण उमदेवार विजयी होईल, हे अवलंबून आहे. सुलेखातार्इंना उमेदवारी?लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा देताना कामठी विधानसभा मतदारसंघातून अॅड. सुलेखा कुंभारे यांना उमेदवारी देण्याचा किंवा त्यांच्या उमेदवारीला समर्थन देण्याचा शब्द काँग्रेस पक्षाने त्यांना दिल्याचे समजते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत काँग्रेस त्यांच्यासोबत राहील. स्वाभाविकच इतर काँग्रेस उमेदवारांचे आव्हान त्यामुळे दुय्यम ठरते.
भाजपसमोर काँग्रेसचे आव्हान
By admin | Updated: June 12, 2014 01:10 IST