देशव्यापी संपाला नागपुरात संमिश्र प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 04:00 AM2020-11-28T04:00:04+5:302020-11-28T04:00:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणाविरुद्ध गुरुवारी कामगार व कर्मचारी संघटनांनी देशव्यापी संप पुकारला होता. नागपुरात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणाविरुद्ध गुरुवारी कामगार व कर्मचारी संघटनांनी देशव्यापी संप पुकारला होता. नागपुरात या संपाला संमिश्र प्रतिसाद मिळाला. संपावर असलेल्या संघटनांनी संप यशस्वी झाल्याचा दावा केला असून जे संपात सहभागी नव्हते त्यांनी मात्र संपाचा फज्जा उडाल्याचा दावा केला आहे.
राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनांचे अध्यक्ष अशोक दगडे यांनी हा संप १०० टक्के यशस्वी झाल्याचा दावा केला आहे. आजच्या संपामुळे जिल्हाधिकारी कार्यालय, संपूर्ण जिल्ह्यातील तहसील कार्यालय व पशुसंवर्धन विभाग आदींसह सर्वच विभागातील कर्मचारी संपावर होते. त्यामुळे संपामुळे शासकीय कामकाज प्रभावित राहिले. संप यशस्वी होऊ नये म्हणून राज्य सरकारने कर्मचाऱ्यांवर प्रचंड दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु कर्मचारी मात्र कुठल्याही दबावाला बळी पडले नाही. संविधान चौकात जाहीर सभेला मंजुरी मिळाली नाही. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांनी आपापल्या कार्यालयासमोर धरणे-निदर्शने केली. कुणीही मस्टरवर स्वाक्षरी केली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दुसरीकडे कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष कृष्णा इंगळे यांनी कास्ट्राईब कर्मचारी कामावर असल्याने संपाचा फज्जा उडाल्याचा दावा केला आहे. इंगळे यांनी म्हटले आहे की, आज २६ नोव्हेंबर हा भारतासाठी अतिशय महत्त्वाचा दिवस. याच दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९४९ साली भारताचे राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांना भारतीय राज्यघटना अर्पण केली. २६ नोव्हेंबर १९४९ पासून प्रजासत्ताक राज्य सुरु झाले. त्यामुळे हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. त्याचप्रमाणे २६ नोव्हेंबर रोजी पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईवर हल्ला केला होता. त्यात भारतीय सुपुत्रांना वीरमरण आले. अशा या दिवशी भारताच्या कामगारांनी संप घडवून आणणे हे दुर्दैवी आहे. त्यामुळे या कामगारांना काय मिळाले. भारताचे पंतप्रधान भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकेचे वाचन करीत असताना या दिवशी संप करणे हे देशद्रोहाचे लक्षण आहे. इतकेच नव्हे तर भारतीय कामगार संघटनांनी कास्ट्राईबला विश्वासात घेतले नाही आणि संप पुकारला. या संपात कास्ट्राईबचे महाराष्ट्रातील ७ लाख कामगार संपावर नव्हते. त्यामुळे संपाचा फज्जा उडाला. ८० टक्के कर्मचारी कामावर होते. मंत्रालय पूर्णपणे उघडे होते. त्यामुळे संप अपयशी ठरला, असे त्यांनी स्पष्ट केले.