अधिकार्यांची टोलवाटोलवी : लाभार्थींचा न्यायासाठी संघर्ष
जीवन रामावत - नागपूर
भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (जीएसआय) कार्यालयात अनुकंपावरील भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात गोलमाल झाल्याची माहिती पुढे आली आहे. यात अनुकंपा भरती समितीने गत दहा वर्षांपूर्वी निवड केलेल्या लाभार्थींना अजूनपर्यंत नोकरी मिळालेली नाही. शिवाय त्यांच्या जागी इतर लोकांच्या अवैध नियुक्त्या केल्याचा आरोप केला जात आहे. माहिती सूत्रानुसार गत १८ मे २००४ रोजी अनुकंपा निवड समितीने रामकली कोल, भूषण लहरे, स्मिता पेलागडे, कैलास दांडगे, आशिष डे व कलावती मदनकर या सहा उमेद्वारांची वेगवेगळ्या पदासाठी निवड केली होती. मात्र त्यांना पुढील आठ वर्षांपर्यंत नियुक्ती पत्र देण्यात आले नाही. त्यासाठी लाभार्थींनी वरिष्ठांना निवेदने दिली. तक्रारी केल्या. मात्र त्याचा काहीही फायदा झाला नाही. शेवटी २८ डिसेंबर २०११ रोजी पुन्हा निवड समितीने या सर्व लाभार्थींच्या नियुक्तीची शिफारस केली. परंतु त्यानंतरही त्यांना रुजू करून घेण्यात आले नाही. विशेष म्हणजे, यापैकी रामकली यांच्यासह काही विधवा महिलांचा समावेश आहेत. त्यामुळे पतीच्या निधनानंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्याच खांद्यावर आली आहे. असे असताना, जीएसआय विभाग गत दहा वर्षांपासून त्यांच्याशी खेळ करीत आहे. त्यांना न्यायापासून वंचित ठेवले जात आहे. एवढेच नव्हे, तर गत एप्रिल २०१२ मध्ये त्यांच्या जागी ए. एस. महल्ले, एन. एस. रामटेके, एस. एस. मदने, एस. एन. वाळके, ए. पी. परेकर, पी. एल. शिंगणे व एस. एल. कोटे यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे अन्याय झालेल्या रामकली या विधवा महिलेसह सर्व सहा उमेद्वार गत दहा वर्षांपासून न्यायासाठी संघर्ष करीत आहे. रामकली यांनी उपोषण केले. दिल्लीपासून तर कोलकातापर्यंत भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाच्या कार्यालयांसह मंत्रालयांना निवेदन दिले. सीबीआयपर्यंत तक्रारी केल्या. परंतु त्याचा काहीही फायदा झाला नाही.