नागपूर : एखाद्या संपाचा फटका बसावा, तसा फटका सध्या शहरातील सर्व व्यापारपेठांना बसतो आहे. एरवी ज्या ओळीत पाय ठेवायला जागा नसायची, त्या ओळीत गेल्या काही दिवसांपासून शुकशुकाट जाणवतो आहे. इतवारी परिसरातील किराणा ओळीतही हीच अवस्था आहे. नोटाबंदीमुळे किराणा व्यवसायावर मंदी येईल, अशी अपेक्षा व्यापाऱ्यांनी केली नव्हती. परंतु नोटाबंदीमुळे किराणा ओळीत सलग सहा दिवसांपासून ग्राहकी नसल्याचा अनुभव येथील व्यापाऱ्यांना अनेक वर्षानंतर आला आहे. केंद्र सरकारने ९ नोव्हेंबरपासून देशभरात ५०० आणि १००० रुपयांची नोट चलनातून बंद केली. त्याचा परिणाम थेट व्यापारावर झाला. किराणासारखे व्यवसाय, जे दैनंदिन गरजेचे असतात. लग्नकार्याच्या सिझनमध्ये जिथे सातत्याने लगबग असते, अशा इतवारी परिसरातील किराणा ओळीत नोटाबंदीमुळे ग्राहकच फिरकत नसल्याचे चित्र आहे. सरकारने ११ नोव्हेंबरपासून बँकेतून पैशाची देवाण-घेवाण सुरू केली. मात्र मिळणारा पैसाही तोकडाच असल्याने, लोकांनी त्यात आपल्या गरजा पूर्ण केल्या. किराणा व्यवसाय साधारणत: महिन्याच्या ५ ते १५ या तारखांमध्ये तेजीत असतो. ग्राहकांचे वेतन या काळात होत असल्याने, इतवारी किराणा ओळीत लोकांची गर्दी असते. सध्या तर लग्नाचा सिझन आहे. या काळात तर मार्केटमध्ये व्यापाऱ्यांना वेळ नसतो. परंतु गेल्या ९ तारखेपासून सर्व व्यापारी सुस्त बसले आहेत. पहिल्या दिवशी ग्राहक आलेत. मात्र सामान कमी आणि चिल्लर अधिक घेण्यासाठी. त्यात व्यापाऱ्यांजवळील बहुतांश चिल्लर संपून गेली. बँका सुद्धा बंद होत्या. व्यापाराला अपेक्षित पैसा बँकेतून मिळाला नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांनी दुसऱ्या दिवशीपासून ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा घेणे बंद केले. तेव्हापासून किराणा ओळीतून ग्राहकांनीही पाय काढला. सलग सहा दिवसांपासून व्यापारी दुकान उघडून बसले आहे. काही व्यवहार चेकद्वारे सुरू आहे. किराणा व्यवसाय रोखीचा असल्याने किमान ८० टक्के परिणाम व्यवसायावर झाल्याचे व्यापारी सांगतात. (प्रतिनिधी) सोमवारी अपेक्षा होती सरकारच्या या निर्णयाचा असा परिणाम होईल, अशी अपेक्षा नव्हती. सलग सहा दिवसांपासून बाजारपेठेत असलेला शुकशुकाट पहिल्यांदाच अनुभवत आहे. सोमवारपासून बाजारपेठ सुरळीत होईल, अशी अपेक्षा होती. परंतु आजही परिस्थितीत काहीच बदल झाला नाही. मनोहर गोखले, किराणा व्यवसायिक व्यवसायाला ७० ते ८० फटका नोव्हेंबरच्या काळात आम्हाला श्वास घ्यायला वेळ नसते. लग्नाचा सिझन असल्याने, किराणा ओळीत पाय ठेवायला जागा नसते. परंतु नोटाबंदीमुळे ग्राहकी कमी झाली आहे. या आठवडाभरात किमान ७० ते ८० टक्के व्यवसायाला फटका बसला आहे. भरत वाधवानी, किराणा व्यापारी
नोटाबंदीमुळे ग्राहक मंदी!
By admin | Updated: November 15, 2016 02:22 IST