नागपूर : चिमूर येथील अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय ब्रह्मपुरी येथे स्थानांतरित करण्याच्या आदेशाविरुद्ध विनोद चोखारे व इतर पाच नागरिकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. त्यात न्यायालयाने मंगळवारी राज्य सरकारला नोटीस बजावून यावर दोन आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.
याचिकेवर न्यायमूर्तीद्वय नितीन जामदार व अनिल किलोर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. विविध प्रशासकीय व विकासकामे प्रलंबित असल्यामुळे ९ सप्टेंबर २०१९ रोजी चिमूर येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर या कार्यालयाकरिता ६ पदे मंजूर करण्यात आली होती. तसेच, निधीही वाटप करण्यात आला होता. असे असताना नवीन मागणीचे कारण देऊन चिमूर येथील अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय ब्रह्मपुरी येथे स्थानांतरित करण्यासाठी २६ ऑगस्ट २०२० रोजी आदेश जारी करण्यात आला आहे. हा आदेश अवैध असल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यांच्या वतीने ॲड. श्रीरंग भांडारकर यांनी कामकाज पाहिले.