नागरिक संतप्त : एसएनडीएलमधील दोषींवर कारवाईची मागणी नागपूर : विजेची तार पडून असल्याची वारंवार माहिती देऊनही एसएनडीएलच्या अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही. एसएनडीएलच्या हलगर्जीपणामुळे एका सात वर्षांच्या बालकाचा करुण अंत झाला. आदित्य धर्मपाल यादव असे मृत बालकाचे नाव आहे. या घटनेमुळे एसएनडीएल विरोधात नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. दूध विक्रेता धर्मपाल यादव यांचा परिवार आरबीआय अधिकारी वसाहतीजवळ राहातो. त्यांना सात वर्षांचा आदित्य आणि नऊ वर्षांची मिनू ही मुले. धर्मपाल यांचे नातेवाईक बाजूलाच काही अंतरावर राहतात. चुणचुणीत आदित्य यादव परिवारातील सर्वांचाच लाडका. त्यामुळे तो आपल्या सर्वच नातेवाईकांकडे जात येत होता. रविवारी सायंकाळी ६.४५ च्या सुमारास आदित्य आपल्या आजीकडून चॉकलेट घेऊन घराकडे निघाला. अधिकारी वसाहतीजवळ विजेची तार (अर्थिंग केबल) दोन दिवसांपासून तुटून पडली होती. त्याची एसएनडीएलच्या कार्यालयात सूचनाही देण्यात आली होती. मात्र, नागरिकांच्या तक्रारी, गाऱ्हाणे दुर्लक्षित करणाऱ्या एसएनडीएलच्या अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबींकडेही दुर्लक्ष केले. परिणामी ती केबल तशीच पडून राहिली. निरागस आदित्यला त्याची जाण नसल्यामुळे तो तारेच्या जवळून गेला. संपर्क होताच आदित्यला जोरदार करंट लागल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरातील नागरिक मोठ्या संख्येत घटनास्थळी जमले. त्यांनी एसएनडीएलच्या कार्यालयात घटनेची माहिती कळवली. मात्र, बऱ्याच विलंबानंतर एसएनडीएलची मंडळी घटनास्थळी पोहचली. त्यामुळे शोकसंतप्त जमावाने एसएनडीएलच्या अधिकाऱ्यांच्या नावाने शिमगा केला. शोकाकूल वातावरणात आदित्यवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळीही शोकसंतप्त जमावाने आदित्यच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या एसएनडीएलच्या संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी केली. सदर पोलिसांनी तूर्त आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, प्रकरणाचा तपास सुरू आहे. (प्रतिनिधी)
हलगर्जीपणामुळे बालकाचा मृत्यू
By admin | Updated: June 17, 2014 00:45 IST