कसबेगव्हाणनजीकची घटना : हत्या करुन पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल खल्लार (अमरावती) : अंजनगाव सुर्जी मार्गावरील साखरी ते कसबेगव्हाण रस्त्यावर एका युवकाचा कोळसा झालेला मृतदेह आढळून आला. शनिवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास ही बाब उघडकीस आली. मृतदेहाच्या अवती-भोवती पसरलेल्या राखेमुळे खून करुन मृतदेह पेटवून दिल्याची चर्चा परिसरात होती. सायंकाळी खल्लार पोलिसांनी हत्या करणे आणि पुरावा नष्ट करण्याचा गुन्हा नोंदविला. मृताचे वय २0 ते २५ वयोगटातील असल्याचा अंदाज आहे. साखरी व कसबेगव्हाण गावातील मजुरांना शनिवारी सकाळी हा मृतदेह ज्ञानेश्वर काळे यांच्या शेतालगतच्या रस्त्याच्या कडेला आढळून आला. त्यांनी घटनेची माहिती गावातील पोलीस पाटलांना दिली. पोलीस पाटलाने ही माहिती खल्लार पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेहाच्या शेजारी दारुची बाटली व दाळवा आढळून आला. मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही. या युवकाची आधी हत्या करण्यात आली व नंतर चारचाकी वाहनाने मृतदेह साखरी गावानजीक आणून तुराट्याच्या गंजीवर ठेऊन पेटवून दिल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक एस. वीरेश प्रभू व उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल गायकवाड यांनी भेट दिली. घटनास्थळी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले; परंतु श्वान पथक घटनास्थळाच्या अवती-भोवतीच फिरले. ते तपासाची दिशा देऊ शकले नाही. तीन वर्षांपूर्वी साखरी गावालगतच अशीच घटना घडली होती. साखरी येथील सुयश डवले याची हत्या करुन याच मार्गावर त्याचा मृतदेह फेकून देण्यात आला होता. आज शनिवारी पुन्हा याच मार्गावर युवकाची हत्या करुन त्याला पेटवून दिल्याचे उघड झाले आहे.(वार्ताहर)
जळालेला मृतदेह आढळला
By admin | Updated: May 25, 2014 00:47 IST