शरिरात रक्त गाेठणे हे तरुणांमधील हृदयघाताचे माेठे कारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 10:38 AM2021-04-24T10:38:25+5:302021-04-24T10:38:47+5:30

Nagpur News काेराेना विषाणूचा संसर्ग हा प्रतिकार शक्तीवर परिणाम करणारा असून, यामुळे रुग्णाच्या शरिरात रक्त गाेठण्याचे प्रकार वाढले आहेत. या प्रकारामुळे काेराेना रुग्णांमध्ये हृद्यघाताची शक्यता बळावली आहे.

Blood clots are the leading cause of heart attack in young people | शरिरात रक्त गाेठणे हे तरुणांमधील हृदयघाताचे माेठे कारण

शरिरात रक्त गाेठणे हे तरुणांमधील हृदयघाताचे माेठे कारण

Next
ठळक मुद्दे काेराेनातून बरे झाल्यानंतरही काळजी घेण्याची गरज


मेहा शर्मा

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : काेराेना विषाणूचा संसर्ग हा प्रतिकार शक्तीवर परिणाम करणारा असून, यामुळे रुग्णाच्या शरिरात रक्त गाेठण्याचे प्रकार वाढले आहेत. या प्रकारामुळे काेराेना रुग्णांमध्ये हृद्यघाताची शक्यता बळावली आहे. आजारातून बरे झाल्यानंतरही महिन्याभराच्या कालावधीत पाेट किंवा पायामध्ये रक्ताच्या गाठी हाेण्याची शक्यता असते. तरुण रुग्णांमध्येही हृदयघाताचे हे प्रमुख कारण असल्याची माहिती प्रसिद्ध हृदयराेगतज्ज्ञ डाॅ. जसपाल अर्नेजा यांनी दिली. ‘लाेकमत’शी बाेलताना त्यांनी काेराेना महामारी, बरे झाल्यानंतर घेण्याची काळजी व इतर महत्त्वपूर्ण विषयांवर प्रकाश टाकला.

काेराेनाच्या औषधामुळे भविष्यात हृदयावर रिॲक्शन हाेण्याची शक्यता काय?

डाॅक्टर उपचारासाठी तीन प्रकारचे औषध वापरतात. पहिले म्हणजे विषाणूराेधी ‘फॅबिपिरावल’ हे एक ॲन्टिव्हायरल औषध आहे, जे गृह अलगीकरणात असलेल्या रुग्णांना दिले जाते. हाच प्रकार ‘रेमडेसिविर’बाबतही आहे. डब्ल्यूएचओ आणि एम्सनुसार प्रत्येक रुग्णाला ही औषधे देण्याची गरज नाही. ‘एम्स’ने रेमडेसिविरला आरक्षित ड्रग म्हणून ठेवले आहे. हे चमत्कार घडविणारे किंवा सिद्धता असलेले औषध नाही, हे नागरिकांना पटवून देणे गरजेचे आहे. अतिसंसर्ग झालेल्या रुग्णांना पहिल्या ३ ते ५ दिवसात हे औषध दिले तरच त्याचा फायदा मिळू शकताे. या औषधाचे अधिक साईड इफेक्टही नाहीत. दुसरे औषध म्हणजे स्टेराईड पण ते प्रत्येक रुग्णाला देणे शक्य नाही. स्टेराईड त्याच रुग्णांना दिले जाते, जे रुग्णालयात भरती आहेत व ज्यांचा ऑक्सिजन स्तर ९२च्या खाली घसरला आहे. या औषधाने रुग्ण बचावाचा दर वाढवला आहे आणि गुंतागुंतही कमी केली आहे. स्टेराईडमुळे साईड इफेक्ट हाेतात पण एक किंवा दाेन आठवडे या अत्यंत कमी कालावधीसाठी दिले जात असल्याने साईड इफेक्ट हाेण्याची शक्यता कमी आहे. स्टेराईडमुळे मधुमेही असलेले किंवा नसलेल्या रुग्णांचीही शुगर लेव्हल वाढण्याची शक्यता आहे. ते महत्त्वाचे औषध आहे. तिसरे महत्त्वाचे औषध आहे जे रुक्ताच्या गाठी हाेण्यापासून राेखू शकते. रक्तगाठी विरघळवणाऱ्या या औषधाने मृत्यूदरही कमी केला आहे. आम्ही रुग्णाचा ‘डि-डायमर’ स्तर तपासताे. तो वाढला असेल तर रुग्णाला किमान महिनाभरासाठी गाठी विरघळवणारे हे औषध दिले जाते.

रेमडेसिविरवरून घबराट का निर्माण झाली आहे?

साेशल मीडिया आणि वृत्त वाहिन्यांनी विनाकारण गवगवा केल्यानेच रुग्णांकडून रेमडेसिविरची मागणी वाढली आहे. पहिली लाट ओसरताच औषध कंपन्यांनी त्याचे उत्पादन बंद केले. मात्र, पुन्हा एवढ्या माेठ्या प्रमाणात रुग्णवाढ हाेईल, याची अपेक्षाही कुणी केली नव्हती. मात्र, आता उत्पादन वाढविण्यात आले आहे आणि येत्या एक-दाेन आठवड्यात परिस्थिती सुधारेल, असा विश्वास आहे.

नागरिकांचे चक्कर येऊन पडण्याचे व मृत्यू ओढवण्याचे प्रकार का वाढले?

अशा नागरिकांमध्ये रक्तगाठी येण्याचे प्रमाण अधिक असते. वाॅशरुममध्ये ताण दिल्यामुळे पायातील गाठी फुप्फुसाच्या नलिकांमध्ये जातात व अकस्मात मृत्यू येण्याचीही शक्यता असते. याला ‘पल्माेनरी एम्बाॅलिझम’ असे म्हटले जाते. गाठींमुळे हार्ट ॲटॅक येण्याचीही शक्यता आहे.

ऑक्सिजनसाठी एवढा संघर्ष का करावा लागत आहे?

काेराेनाची दुसरी लाट ही त्सुनामीप्रमाणे आली आणि तिच्या प्रभावाचे आकलन करण्यात आपण कमी पडलाे. ऑक्सिजनची गरज एवढ्या माेठ्या प्रमाणात वाढेल, याची अपेक्षाही केली नव्हती. ऑक्सिजनचा पुरवठा वाढविण्यासाठी स्थानिक प्रशासन खूप चांगले काम करत आहे व प्रत्येक रुग्णालयाची गरज भागवली जात आहे.

सध्या आपण काेराेनाच्या काेणत्या परिस्थितीत आहाेत?

सध्या देशात साडेतीन लाख रुग्णसंख्या आहे आणि मेच्या मध्यापर्यंत ५ ते ६ लाखांवर जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर हा ग्राफ खाली येईल.

समस्त लाेकसंख्येचे लसीकरण शक्य आहे?

पुढील वर्षापर्यंत काेराेना जाण्याची शक्यता नाही आणि यावर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरण हाच प्रभावी उपाय आहे. सरकारनेही लसीच्या आयातीला परवानगी दिली आहे. दर महिन्याला १० काेटी लस मिळतील आणि देशात ४५ ते ५० काेटी नागरिकांचे लसीकरण शक्य हाेईल. पाेलिओप्रमाणे ही माेहीम राबवावी लागेल.

Web Title: Blood clots are the leading cause of heart attack in young people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.