योगेश पांडेनागपूर : रविवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच भाजपच्या विदर्भातील नेत्यांची रविवारी समन्वय बैठक पार पडली. रेशीमबाग येथील डॉ.हेडगेवार स्मृतिमंदिर परिसरात ही बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत भाजपचे विदर्भातील आमदार उपस्थित होते. यावेळी भाजप नेत्यांनी संघासमोर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीचा रोडमॅपच मांडला. तसेच संघाकडून भाजप नेत्यांना सामाजिक समन्वय साधण्याचा सल्लादेखील देण्यात आला.
भाजप-संघादरम्यान नियमितपणे समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात येते. रविवारी झालेली भाजपची बैठक विदर्भ प्रांत स्तरीय असली, तरी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता या बैठकीत भाजपच्या विदर्भातील सर्व आमदारांना बोलावण्यात आले होते. यावेळी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री पंकज भोयर, अशोक उईके, आकाश फुंडकर, राजू तोडसाम, समीर कुणावार, डॉ नरोटी, सुमित वानखेडे, संजय कुटे, किशोर जोरगेवार, सुधीर मुनगंटीवार, हंसराज अहीर प्रामुख्याने उपस्थित होते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपा- संघ समन्वय बैठक अतिशय महत्त्वाची मानण्यात येते आहे. संघाकडून विदर्भ प्रांत संघचालक दीपक तामशेट्टीवार, राम हरकरे, कार्यवाह अतुल मोघे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
भाजप नेत्यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर झालेल्या या समन्वय बैठकीत भाजप कार्यकर्त्यांच्या अपूर्ण टास्कवरून कानपिचक्या देण्यात आल्या. गडकरी आणि फडणवीसांकडून कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांनी त्रुटी व उणिवांची जाणीव करून देण्यात आली. तसेच येत्या ३ महिन्यात काय-काय करायचे आहे यावर प्रकाश टाकण्यात आला. एकीकडे भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी नियोजनाबाबत माहिती दिली. तर संघाकडून समाजातील कोणत्या घटकापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या बैठीकत संघाने गेल्या काही कालावधीतील राजकीय व सामाजिक स्थितीच्या केलेले सूक्ष्म निरीक्षण भाजप नेत्यांसमोर मांडले.
सकाळपासून मॅरेथॉन बैठक
सकाळी ८.३० वाजतापासून बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री फडणवीस हे जवळपास चार तास बैठकीत उपस्थित होते. तर गडकरी जवळपास दीड तास बैठकीत सहभागी झाले होते. मुख्यमंत्री व गडकरी यांनी यावेळी भाजपच्या लोकप्रतिनिधींना मार्गदर्शन केले व नेमकी काय पावले उचलावी याबाबत सूचना केल्या. सायंकाळी ४.५० वाजेपर्यंत बैठक सुरू होती.
सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याची सूचना
संघाने यावेळी भाजपच्या नेत्यांना सामाजिक समरसतेच्या दिशेने काम करण्याची सूचना केली. तसेच सरकारच्या योजना तळागाळापर्यंत कशा पोहोचतील यावर भर देण्यास सांगितले. त्याचप्रमाणे प्रत्येक विभागाचे व्हिजन लक्षात घेऊन त्या दिशेनेच काम करण्यासदेखील संघाकडून सांगण्यात आले.