संजय जोशी यांचे मत : सत्तापक्षातील नेत्यांनी संयमाने बोलावेकमलेश वानखेडे नागपूरबिहारमध्ये भाजपचा पराभव झाला असला तरी मते कमी झाली नाहीत. गेल्या निवडणुकीत भाजपला १६ टक्के मते मिळाली होती. या वेळी ती २४ टक्क्यांवर गेली. बिहारमध्ये काँग्रेस, नितीश कुमार व लालूप्रसाद यादव हे तीन विरोध एकत्र येऊन लढले. त्यामुळे त्यांची ताकद वाढली व भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले. यापासून धडा घेत भाजपला भविष्यात रणनीती बदलावी लागेल, असे मत भाजपचे माजी केंद्रीय सरचिटणीस व ज्येष्ठ नेते संजय जोशी यांनी व्यक्त केले.सौंसर येथे एका कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी जोशी नागपुरात आले. या वेळी ‘लोकमत’शी बोलताना ते म्हणाले, देशाच्या राजकारणात काँग्रेसविरोधी जेव्हा जेव्हा एकत्रित आले तेव्हा काँग्रेसचा दारुण पराभव झाला. १९९७ मध्ये तसेच झाले. १९८९ मध्ये व्ही.पी. सिंग यांच्या नेतृत्वात, ११९६ मध्ये एनडीएच्या नेतृत्वातही असाच बदल घडला. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, लालूप्रसाद यादव, नितीश कुमार, समाजवादी पार्टी, बसपा वेगवेगळे लढली. याचा फायदा भाजपला झाला. याउलट दिल्ली व बिहारमध्ये झाले. दिल्लीत मात्र, काँग्रेसवर नाराज असलेला मतदार ‘आप’कडे गेला. तेथे ‘आप’ व काँग्रेसचे मतदार एकत्र आले. त्यामुळे भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले. बिहारमध्येही तसेच झाले. तेथे भाजप विरोधी असलेले नेते एकत्र आले. त्यांच्या संघटित शक्तीचा अंदाज घेण्यात भाजप कमी पडला. त्यामुळे भाजपच्या मतांची टक्केवारी वाढूनही अपेक्षित जागा जिंकता आल्या नाहीत. हेच बिहार निवडणुकीचे तर्कशुद्ध विश्लेषण असल्याचा दावा त्यांनी केला. सोबतच या निवडणुकीपासून धडा घेत भाजपला भविष्यात आपली रणनीती बदलावी लागेल, असेही त्यांनी सुचवले. २०१६ मध्ये आसाम, बंगाल, केरळ, तामिळनाडू, पाँडेचरी या राज्यांच्या निवडणुका आहेत. ही राज्याही तेवढीच महत्त्वाची आहेत. येथे भाजपला प्रादेशिक पार्श्वभूमी असलेल्यांना सोबत घेऊन काँग्रेसविरोधी लढा उभारावा लागेल. तसे नियोजन करावे लागेल. केरळमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपच्या मतांची टक्केवारी वाढली आहे. हे चांगले चिन्ह आहे. व्यवस्थित नियोजन केले तर या राज्यांमध्येही भाजपचे संख्याबळ वाढू शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.बिहारच्या पराभवानंतर ज्येष्ठ नेत्यांनी पक्ष नेतृत्वावर नेम साधला, याबाबत विचारणा केली असता हा पक्षाचा आंतरिक विषय असल्याचे सांगत त्यांनी अधिक भाष्य करणे टाळले. सरकारमधील काही खासदार व मंत्री बेताल वक्तव्ये करून नवनवे वाद निर्माण करतात. याबाबत विचारणा केली असता त्यांनी सत्तापक्षातील नेत्यांना संयमाने बोलण्याचा सल्ला दिला. कोणतेही वक्तव्य करताना आपण सरकारचे घटक आहोत, याचे भान राखले पाहिजे. संयमी बोलणे हे नेहमी श्रेयस्कर असते, असा सल्लाही त्यांनी दिला. पक्षाची जबाबदारी स्वीकारण्यास तयार मी पक्षाचा कार्यकर्ता आहे व कार्यकर्ता राहील. मात्र, पक्षाने कोणतीही जबाबदारी सोपविली तर ती स्वीकारण्यासाठी आपण यापूर्वीही तयार होतो, सध्याही आहोत व भविष्यातही राहू, असेही त्यांनी स्पष्ट केले. असहिष्णुतेचा मुद्दा राजकीय विरोधातूनकाँग्रेसने केवळ राजकीय विरोधासाठी असहिष्णुतेचा मुद्दा पुढे केला आहे. भारतात विविध जाती, धर्म, पंथ, भाषा बोलणारे लोक राहतात. मात्र, कुठेही सांप्रदायिक किंवा राज्यांच्या सीमांवर तणाव नाही. व्यक्तीने हिंसक बनावे अशी परिस्थिती देशात नाही. असे असतानाही कलबुर्गींची हत्या असो की दादरीची घटना अशी कारणे समोर करून काँग्रेस गदारोळ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. विशेष म्हणजे या दोन्ही घटना भाजपशासित राज्यात घडलेल्या नसतानाही याचे खापर केंद्र सरकारवर फोडण्याचा प्रयत्न होत आहे. हे शुद्ध राजकारण आहे, अशी टीका करीत त्यांनी केंद्र सरकारचा बचाव केला.
बि‘हार’मुळे भाजपने भविष्यात रणनीती बदलावी
By admin | Updated: November 28, 2015 03:30 IST