नागपूर - एअर इंडियाच्याअहमदाबाद-लंडन एआय-१७१ विमानाचा झालेला अपघात हा पक्षी धडकल्याचा प्रकार वाटत नाही. वैमानिकाने विमान ज्या पद्धतीने खाली आणले, ते पाहता विमान अखेरपर्यंत सुरक्षित ठिकाणी नेण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो. हा प्रयत्न अनुभवी वैमानिकच करू शकतो, असे मत या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले. परंतु, ब्लॅक बॉक्समधून प्राप्त होणाऱ्या रेकॉर्डिंगच्या आधारे संपूर्ण सत्य समोर येईल.
या घटनेनंतर काहींना १५ जानेवारी २००९ रोजीच्या यूएस एअरवेजच्या विमानाच्या अपघाताची आठवण झाली. यूएस एअरवेजच्या या ए३२० विमानाला पक्षी धडकल्यानंतर, वैमानिकाने ते हडसन नदीत उतरवले होते. या घटनेत कोणत्याही प्रवाशाचा मृत्यू झाला नव्हता. एअर इंडियाचे विमान-१७१ पुढे जाऊ शकले असते, तर ते साबरमती नदीत उतरवण्याचा प्रयत्न करता आला असता आणि प्रवाशांचे जीव वाचण्याची शक्यता वाढली असती. आपत्कालीन परिस्थितीत, जर विमान योग्यरीत्या उतरले तर ते काही काळ पाण्यात तरंगू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.