पत्रिकेत आमुलाग्र बदल : मेघेंच्या प्रवेशासाठी आता जिल्हा पदाधिकारीही सरसावले राजेश भोजेकर - वर्धाविदर्भातील ज्येष्ठ नेते माजी खासदार दत्ता मेघे आणि त्यांचे चिरंजीव माजी आमदार सागर मेघे व समीर मेघे यांच्या प्रवेशासाठी आता जिल्हा भाजपचे पदाधिकारीही सरसावले आहेत. ‘जिल्हा भाजपचा श्रेष्ठींना घरचा अहेर’ या ‘लोकमत’ वृत्तानंतर अंतर्गत हालचाली होऊन प्रवेश मेळाव्याच्या पत्रिकेत भाजपाच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला असून विनितमध्येही भाजपचा उल्लेख झाला आहे. अचानक झालेल्या या घडामोडींमुळे जिल्हा भाजपपुढे श्रेष्ठींचे नमो नमो झाल्याचा सूर ऐकू येतो आहे.काँग्रेस सोडलेले तमाम पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह दत्ता मेघे ५ जुलै रोजी भाजपात प्रवेश करणार आहेत. त्यानिमित्त सावंगी(मेघे) येथील क्रीडा संकुलावर प्रवेश मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यासाठी भव्य शामियाना उभारला जात आहे. मात्र मेळाव्याच्या पत्रिकेत भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचा कुठेच उल्लेख नव्हता. गंभीर बाब म्हणजे, मेळाव्याबाबत काहीही माहिती नसल्याचे सांगून जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे यांनी पक्षश्रेष्ठींनाच बुचकाळ्यात टाकले होते. मेघे यांच्या भाजप प्रवेशावरुन भाजपमधील अंतर्गत कुजबूज ‘लोकमत’ ने २८ जून रोजीच्या वृत्तातून चव्हाट्यावर आणली होती. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. इतकेच नव्हे, तर पक्षश्रेष्ठींकडून ही बाब गांभिर्याने घेतली गेली.त्यानंतर भाजप नेते खा. नितीन गडकरी यांनी जिल्हाध्यक्षांसह काही पदाधिकाऱ्यांना नागपुरात वाड्यावर बोलावून घेतले आणि मेघे यांना भाजपात प्रवेश द्यायचा आहेच; मात्र ही बाब जिल्हा भाजपला कळविणे अगत्याचे होते. तशा सूचना प्रदेशाध्यक्षांना दिल्या होत्या, याकडे ना. गडकरी यांनी पदाधिकाऱ्यांचे लक्ष वेधल्याची विश्वसनीय माहिती आहे. या घडामोडींनंतर प्रवेश मेळाव्याच्या पत्रिकेत मोठा बदल करण्यात आला. प्रमुख अतिथींमध्ये जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे, आ. दादाराव केचे, माजी खासदार सुरेश वाघमारे, सुधीर दिवे यांना स्थान देण्यात आले. विनितमध्येही भाजपचा उल्लेख करण्यात आला. ‘लोकमत’ वृत्ताने न्याय मिळाल्याची भावना भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.
अखेर जिल्हा भाजपपुढे पक्षश्रेष्ठी नरमले
By admin | Updated: July 4, 2014 01:05 IST