‘आयएएस’ नंतर ‘आयपीएस’ला पसंती नागपूर : भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) ही सर्वांत महत्त्वाची व प्रतिष्ठेची सेवा मानल्या जाते. प्रशासकीय अधिकाऱ्याचा रुबाब, सामाजातील मानाचे स्थान व कायद्याने दिलेले अधिकार कुणालाही मोहात टाकणारे आहेत. त्यामुळेच गत काही वर्षांत या सेवेबद्दल तरुणाईमध्ये मोठ्या प्रमाणात ‘फॅड’ निर्माण झाले आहे. यूपीएससी परीक्षेच्या माध्यमातून ‘आयएएस’ सह भारतीय पोलीस सेवा (आयपीएस), भारतीय परराष्ट्र सेवा (आयएफएस), भारतीय टपाल सेवा, भारतीय सीमाशुल्क व अबकारी सेवा, भारतीय प्राप्तीकर सेवा, भारतीय लेखा व लेखापरीक्षण सेवा, भारतीय वन सेवा व भारतीय राजस्व सेवेसाठी निवड केल्या जाते. पण तरुणांमध्ये ‘आयएएस’ व ‘आयपीएस’ ला सर्वांधिक पसंती दिली जात असल्याचे दिसून येत आहे. यातून दरवर्षी ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. यंदा देशभरातून सुमारे सात लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यात अलीकडे नागपुरातील तरुणांचा फार मोठा सहभाग आहे. देशात सर्वप्रथम १९३५ च्या कायद्यानुसार १९३७ मध्ये ‘केंद्रीय लोकसेवा आयोगा’ ची स्थापना करण्यात आली. त्यानुसार गत ७७ वर्षांपासून हा आयोग ‘आयएएस’ ची निवड करीत आहे. (प्रतिनिधी)
प्रशासकीय सेवेचे ‘फॅड’
By admin | Updated: June 16, 2014 01:15 IST