नागपूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत खाते असणार्या गारपीटग्रस्त शेतकर्यांना राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडून देण्यात येणार असून तेथे शासकीय मदतीची रक्कम जमा करण्यात येणार आहे. यासाठी लवकरच विशेष मोहीम जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून हाती घेण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांनी ही माहिती दिली. अतिवृष्टी आणि गारपीटग्रस्त शेतकर्यांना राज्य शासनाकडून जाहीर केलेल्या मदतीचे वाटप जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून केले जाते. गारपीटग्रस्त शेतकर्यांच्या मदतीसाठी नागपूर जिल्ह्याला आतापर्यंत १८० कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून मदतीचे वाटप टप्प्या टप्प्याने सुरू आहे. ही रक्कम शेतकर्यांच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील शेतकर्यांच्या खात्यात जमा करण्यात येत आहे. मात्र सध्या जिल्हा बँक आर्थिक अडचणीत आहे. रिझर्व्ह बँकेने त्यावर निर्बंध घातले आहे. त्यामुळे शेतकर्यांना त्याची रक्कम काढता येत नाही. त्यामुळे त्यांच्यात नाराजी आहे. दुसरीकडे सहकारी बँकेकडून शेतकर्यांच्या खात्यातील शासकीय मदत कर्जाच्या मोबदल्यात परस्पर वळती केली जात आहे, अशाही तक्रारी आहेत. सहकार खात्याने मात्र तो आरोप फेटाळून लावला आहे. ही कोंडी फोडण्यासाठीच शेतकर्यांना राष्ट्रीयकृत बँकेत खाती उघडून देण्यात येणार असून तेथे शासकीय मदतीची रक्कम जमा केली जाईल. जेणेकरून शेतकर्यांना ती काढता येईल. ज्यांनी पूर्वीच राष्ट्रीयकृत बँकेत खाती उघडली असेल त्यांच्या त्या बँकेच्या खात्यात शासकीय मदतीची रक्कम जमा केली जाणार आहे. खरीप हंगाम तोंडावर आहे आणि शेतकर्यांना पैशाची गरज आहे. अद्यापही काही गारपीटग्रस्त शेतकर्यांना शासकीय मदतीचे वाटप झाले नाही. यासंदर्भात गुरुवारी झालेल्या खरीप हंगाम आढावा बैठकीतही प्रश्न उपस्थित झाला होता व पालकमंत्र्यांनी यासंदर्भात उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले होते. शुक्रवारी जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांनी सहकार खात्याच्या अधिकार्यांची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला, असे कृष्णा यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. एक महिन्यात युद्धपातळीवर ही योजना राबवून शेतकर्यांना मदत केली जाईल. जिल्हा बँकेच्या वाट्याचे पीक कर्ज राष्ट्रीयकृत बँकेच्या माध्यमातून केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
गारपीटग्रस्त शेतकर्यांची खाती राष्ट्रीयीकृत बँकेत उघडणार
By admin | Updated: May 24, 2014 01:01 IST