नागपूर होतेय ‘अपघात’पूर : वर्षभरात रस्ते अपघातात ३७२ बळी योगेश पांडे ल्ल नागपूरसाधारणत: मुंबई-पुणे येथील नागरिक निष्काळजीपणे वाहन चालवितात, असा समज आहे. परंतु वस्तुस्थिती ही आहे की, २०१४ या वर्षात निष्काळजीपणे वाहन चालविल्यामुळे राज्यातील सर्वात जास्त मृत्यू नागपुरात झाले आहेत. वर्षभरात शहरात विविध रस्ते अपघातांत ३७२ नागरिकांचा मृत्यू झाला. यापैकी निष्काळजीपणाने वाहन चालविल्यामुळे झालेल्या अपघातांत जीव गमवाव्या लागलेल्या नागरिकांची संख्या चक्क ३५५ इतकी आहे. ‘एनसीआरबी’च्या (नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो) आकडेवारीतून ही बाब समोर आली आहे.२०१३ मध्ये रस्ते अपघातांचे बळी जाणाऱ्यांची संख्या २४१ इतकी होती. वर्षभरात वाढलेले हे प्रमाण नागपूरकरांच्या डोळ्यात झणझणीत अंजन टाकणारे आहे.नागपूर शहरात १३४४ अपघात झाले. यात ३७२ नागरिकांचा बळी गेला तर १०९७ जण जखमी झाले. जर सरासरी काढली तर दिवसाला ३ हून अधिक अपघात झाले असून, यात दररोज एकाचा मृत्यू झाला आहे. यातील सर्वात जास्त ३५५ मृत्यू हे निष्काळजीपणाने वाहन चालविणे किंवा ‘ओव्हरटेकिंग’च्या नादात झाले आहेत. मुंबई, पुणे, नाशिक या शहरांच्या तुलनेत या कारणामुळे झालेले मृत्यू हे सर्वाधिक आहेत. अतिवेगाने वाहन चालविण्याच्या उन्मादात ८४ अपघात झाले व यात १५ जणांचा बळी गेला. जर आकडेवारीकडे नजर टाकली तर अपघातास कारणीभूत असलेल्या ८७ जणांना जीव गमवावा लागला, तर काहीही चूक नसलेल्या २८५ जणांचे प्राण गेले.सायंकाळची घाई नडतेय‘एनसीआरबी’च्या आकडेवारीनुसार शहरात सर्वात जास्त अपघात हे दुपारी ३ ते रात्री ९ या वेळेत झाले आहे. सायंकाळच्या काळात शहरातील विविध कार्यालये सुटतात. घरी जाण्याच्या घाईत अनेकदा निष्काळजीपणे वाहन चालविण्यात येते व यातूनच अपघात घडतात. या वेळेदरम्यान वर्षभरामध्ये ४९२ अपघात झाले. दुचाकीस्वार ‘रेड झोन’मध्येशहरातील अपघातांमध्ये सर्वात जास्त बळी दुचाकीस्वारांचे गेले आहेत. वर्षभरात १८६ दुचाकीस्वारांना आपला जीव गमवावा लागला. ट्रकमुळे ६८ तर कारमुळे ३८ जणांचा बळी गेला. वर्षभरात ३३ पादचारी मृत्युमुखी पडले. यातील २२ जणांची काहीच चूक नव्हती. २०१४ वर्षातील सर्वात जास्त अपघात हे नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान झाले आहेत. या महिन्यामध्ये १ हजार ३४४ पैकी ४७० अपघात झालेत. यातील अनेक अपघात हे प्राणांतिक होते
अपघात की आत्मघात!
By admin | Updated: July 21, 2015 03:06 IST