लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पंढरपूरला जाणाऱ्या वारीसंदर्भात समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे समाजातील विविध पातळ्यांतून संतापाचा सूर व्यक्त करण्यात येत आहे. विश्व हिंदू परिषदेनेदेखील आझमी यांच्या वक्तव्याचा निषेध करत जोरदार टीका केली आहे.
महाराष्ट्र आणि गोवा राज्याचे मंत्री गोविंद शेंडे यांनी अबू आझमी यांनी देशातील सर्व हिंदूंचा अपमान केल्याचा आरोप लावला आहे. महाराष्ट्रातील गौरवशाली उत्सव आणि परंपरा श्रद्धेने पाळण्यात येतात. आषाढी एकादशी निमित्त निघणाऱ्या वारीत मोठ्या संख्येने वारकरी सहभागी होतात. हा उत्सव भक्ती आणि श्रद्धेसोबतच सामजिक बांधिलकी आणि एकोपा जपणारा आहे. लाखो भाविक अनुशासन आणि संयमाने या वारीत सहभागी होतात. या विरोधात समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी या वारी मुळे वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत असल्याचे विधान केले आणि त्याची तुलना विना परवानगी रस्त्यावर वाहतूक कोंडी करून नमाज पठण कारणाऱ्यांसोबत केली.
हिंदू समाज हा सहिष्णू असल्यामुळे सर्व धर्मांना त्यांची उपासना आणि प्रार्थना मोकळेपणाने करणे शक्य आहे. वारी वर्षातून एकदा निघते आणि त्या निमित्त वाहतूक व्यवस्थेचे अतिशय कुशल नियोजन सामाजिक संस्थांसहित पोलीस प्रशासनाकडून तत्परतेने करण्यात येते. मोठी परंपरा लाभलेल्या वारीबाबत अशा पद्धतीने वक्तव्य करून आझमी यांनी हिंदूंच्या आस्थेला अपमानित केले आहे, असे शेंडे म्हणाले.