संजय गांधी निराधार योजना : २ कोटी १६ लाख पडून अमोल सोटे - आष्टी (श़)(वर्धा)वृद्धापकाळात सन्मानाने जगता यावे, यासाठी केंद्र व राज्य शासनाने ६५ वर्षांवरील नागरिकांसाठी संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना आणली; मात्र सदर योजना राबविणारी यंत्रणाच कुचकामी असल्याने वर्धा जिल्ह्यात योजनेची पुरती वाट लागली आहे़ एकट्या आष्टी तालुक्यात सुमारे ७ हजार ५०० लाभार्थ्यांना मानधनाची प्रतीक्षा आहे़या योजनेत ६ हजार नियमित लाभार्थी आहेत. त्यांना प्रति महिना ६०० रुपये प्रमाणे तीन महिन्याचे मानधन मिळाले नाही़ त्यापोटी शासनाकडून १ कोटी ८ लाख रुपये येणे आहे, असे तहसील कार्यालयाकडून सांगितले जाते; पण शासनाने लाभार्थ्यांचा पैसा केव्हाच पाठविला आहे़ त्याचे वाटप करणारी यंत्रणा चालढकल करीत आहे़ यामुळे शासनाचे काम अन् बारा महिने थांब, असे म्हणण्याची वेळ निराधारांवर आली आहे़ तहसीलदारांनी यादीतील १ हजार ५०० जुने लाभार्थी बाद केले होते़ त्यांचे १२ महिन्यांचे प्रति महिना ६०० रुपये प्रमाणे १ कोटी ८ लाख रुपयांचे अनुदान वाटप थांबले आहे़ दोन्ही मिळून २ कोटी १६ लाख रुपये होतात़ एवढा मोठा निधी अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित धोरणामुळे वितरित झाला नाही़ लाभार्थी तहसील कार्यालयाच्या चकरा मारून थकलेत़ जिल्ह्यात इतर ठिकाणी या योजनेचे अनुदान वाटप करण्यात आले असले तरी काही लाभार्थ्यांना अद्यापही भटकंती करावी लागत असल्याचे दिसते़ आष्टी तालुक्यातील लाभार्थ्यांनाही प्रतीक्षाच करावी लागत आहे़
७,५०० लाभार्थ्यांना मानधनाची प्रतीक्षा
By admin | Updated: June 11, 2014 01:20 IST