लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उकाड्याने नागपूरकर त्रस्त झाले असून, खंडित वीजपुरवठ्याने त्यात भर घातली आहे. रात्री कधी बत्ती गुल होईल. हे सांगता येत नाही. त्यामुळे एसी, कूलर आणि पंखे बंद पडतात व उकाड्याने नागरिकांना घामाघूम व्हावे लागते. त्यात डासांचा उपद्रव वाढल्याने नागरिकांची रात्रीची झोप उडाली आहे.
वीज व्यवस्थेतील वितरण तांत्रिक त्रुटीमुळे ट्रान्सफॉर्मर सतत बंद पडत असल्याची माहिती आहे. यंदाच्या उन्हाळ्यात आतापर्यंत ७४ ट्रान्सफॉर्मर बंद पडले आहेत. दुसरीकडे महावितरणचा दावा आहे की ट्रान्सफॉर्मर बंद पडण्याचे प्रमाण १.७ टक्के आहे. हे इतर विभागांपेक्षा कमी आहे. पण, प्रत्यक्षात ७४ ट्रान्सफॉर्मर बंद पडणे होणे ही गंभीर बाब आहे.
ओव्हरलोडमुळे ट्रान्सफॉर्मर योग्य दाबाने वीज पुरवठा करू शकत नाहीत. नुकतेच नारी-नारा परिसरात कमी दाबामुळे नागरिक आक्रमक झाले आणि रात्री महावितरणच्या कार्यालयात धडकले. ट्रिपिंगचं मुख्य कारण ओव्हरलोड ट्रान्सफॉर्मरच असल्याचे सांगितले जात आहे. शहरातील बहुतांश ट्रान्सफॉर्मर सध्या ८० टक्क्यांहून अधिक क्षमतेवर चालत आहेत. त्यामुळे मागणी वाढल्यास ते कधीही बंद पडण्याची शक्यता आहे. मात्र, महावितरणच्या म्हणण्यानुसार, ही समस्या पूर्वीपेक्षा कमी झाली आहे. प्रत्येक विभागामध्ये दोन एजन्सी तैनात असून, ट्रान्सफॉर्मर बंद पडल्यास तत्काळ बदलण्यात येत आहेत. ट्रान्सफॉर्मरचीही कमतरता नाही.
लोड बॅलन्स करत नाहीत लाइनमनप्रत्येक ट्रान्सफॉर्मरवर समान लोड असणे आवश्यक असते. हा लोड बॅलन्स करण्याची जबाबदारी लाइनमनवर असते. मात्र, बहुतांश लाइनमन आपले काम नीट करत नाहीत. त्यामुळे काही ट्रान्सफॉर्मर ओव्हरलोड आहेत, तर काहींवर किमान भारही नाही. यामुळेच वीज जाण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
विकसित होत असलेल्या भागांत अधिक त्रासबेसा, गोरेवाडा, हुडकेश्वर आणि रिंग रोड परिसरात ट्रान्सफॉर्मरवर जास्त ओव्हरलोड आहे. शहराच्या दाट वस्तीत मात्र ट्रान्सफॉर्मर चांगले कार्यरत आहेत. स्पेशल प्रोजेक्ट अंतर्गत या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात नवीन ट्रान्सफॉर्मर बसवले गेले आहेत.