नीरीचा अहवाल : हिरवळीची गरज १२ घनमीटरची, उपलब्ध २.३२ घनमीटर
निशांत वानखेडे
नागपूर : केंद्र शासनाच्या गृहनिर्माण व शहरी विभाग मंत्रालयाच्या निर्देशांकानुसार शहरात १० ते १२ घनमीटर प्रतिव्यक्ती हिरवळीची जागा (ग्रीन स्पेस) म्हणजे १००० लाेकसंख्येमागे १.२ ते १.४ हेक्टर हिरवळ असणे आवश्यक आहे. मात्र, अभ्यासानुसार नागपूर शहरात केवळ २.३२ घनमीटर ग्रीन स्पेस उपलब्ध आहे. परिस्थितीनुसार यामध्ये आणखी घट हाेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशाेधन संस्था (नीरी) यांच्या २०१९-२० च्या पर्यावरण स्थिती अहवालातून (ईएसआर) ही बाब समाेर येत आहे. या अहवालानुसार शहरात पार्क, उद्याने, शहरी जंगल मिळून ६५ सार्वजनिक ग्रीन स्पेसेस आहेत. त्यापैकी बऱ्याच उद्यानांची अवस्था व्यवस्थापनाअभावी वाईट हाेत आहे. ही स्थिती भविष्यात नागरिकांची हिरवळीची गरज परिपूर्ण करू शकणार नाही. सर्वेक्षणानुसार शहरातील ५० वाॅर्ड हिरवळीच्या बाबत ग्रीन झाेनमध्ये आहेत. मात्र, ४४ वाॅर्ड ऑरेंज झाेन तर १९ वाॅर्ड रेड झाेन म्हणजे चिंताजनक स्थितीत आहेत. निरीचे संचालक डाॅ. राकेश कुमार यांच्या मार्गदर्शनात आणि रिसर्च सेलच्या संचालिका डाॅ. अत्या कपले व वरिष्ठ वैज्ञानिक डाॅ. शालिनी ध्यानी यांच्या नेतृत्वात २०२० च्या सुरुवातीला १०० वाॅर्डांमध्ये १०५० कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले. शहरात उपलब्ध ग्रीन स्पेसबाबत नागरिक समाधानी आहेत का, याबाबत त्यांचे मत जाणून घेण्यात आले. यामध्ये सर्व वयाेगट, शिक्षण गटातील नागरिकांचा समावेश हाेता.
काेण समाधानी, काेण असमाधानी
- ५१ टक्के मानतात पुरेशी हिरवळ आहे. २२ टक्क्यांना मान्य नाही. २७ टक्क्यांना सांगता येत नाही.
- ५० टक्के उद्यान व्यवस्थापनाबाबत समाधानी, ५० टक्के असमाधानी.
- ३४.६ टक्के लाेकांना वाटते वायुप्रदूषण व हीट आयलॅण्ड इफेक्ट कमी करण्यास उपलब्ध हिरवळ पुरेशी नाही. ३४ टक्के म्हणतात पुरेशी आहे.
- ४२ टक्के लाेकांना ५०० मीटरपेक्षा अधिक दूर जावे लागते.
- २८ टक्के नागरिकांसाठी २०० ते ५०० मीटरवर, २०.५ टक्क्यांसाठी ५० ते २०० मीटरवर तर ९ टक्के लाेकांसाठी ५० मीटरपेक्षा कमी अंतरावर.
उद्यानात जाण्याची कारणे काेणती
- ८२ टक्के नागरिक म्हणतात शुद्ध हवेची गरज. ६३ टक्के आराेग्यासाठी, ३३ टक्के मानसिक तणाव घालविण्यासाठी जातात.
- ४४ टक्के दरराेज उद्यानात जातात. ३५ टक्के आठवड्यातून एकदा, १५ टक्के महिन्यातून एकदा तर ७ टक्के जवळ नसल्याने क्वचितच.
- महामारीच्या काळात हिरवळीकडे जाणाऱ्यांचे प्रमाण प्रचंड वाढले.
- ७७.५ टक्के सांगतात थेट उपयाेग घेतला नाही. २०.५ टक्के फुले, फळे, पत्ते आदींसाठी, ३८ टक्के इतर उपयाेग, २ टक्के इंधन, १.२ टक्के चारा.
- ७७.५ टक्के नागरिकांनी कधीही झाड लावले नाही. २० टक्के म्हणतात कधीकधी लावले.
पेंडामिकमुळे लाेकांमध्ये ग्रीन स्पेसबाबत जागृती वाढत आहे. मात्र, हिरवळीमध्ये वाढ करण्याची गरज आहे. ग्रीन झाेनमध्ये असलेले वाॅर्ड ५ वर्षांत रेड झाेनमध्ये येऊ नये म्हणून लक्ष देण्याची आणि ऑरेंज व रेड झाेनमध्ये सुधारणांसाठी उपाययाेजना करण्याची गरज आहे. भविष्यात हिरवळीच्या जागांची प्रचंड गरज वाढणार आहे. त्यामुळे प्राधान्यक्रमाने वाॅर्डनिहाय ॲक्शन प्लॅन तयार करण्याची गरज आहे.
- डाॅ. अत्या कपले, संचालिका, रिसर्च सेल, नीरी.