नागपूर : महावितरणने वीजचोरीविरुद्ध विशेष मोहीम राबवून गत महिनाभरात १० कोटींच्या वीजचोरी पकडल्याची माहिती पुढे आली आहे. माहिती सूत्रानुसार महावितरणने गत मे महिन्यात राज्यातील १४ परिमंडलात ही मोहीम राबविली. दरम्यान १ हजार ७ वीजचोऱ्या उघडकीस आल्या. यात १६ लाख २५ हजार ८४० युनिट विजेची चोरी झाली असून, त्याची अनुमानित रक्कम १० कोटी २८ लाख ५८ हजार रुपये एवढी आहे. त्यानुसार १ हजार ५६६ वीजचोर ग्राहकांविरुद्ध कारवाई करण्यात आली. या मोहिमेत सिंगल व थ्री फेजचा वीज पुरवठा असलेल्या घरगुती, व्यापारी व औद्योगिक अशा ३ हजार २९२ ग्राहकांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी विद्युत अधिनियम २००३ च्या कलम १३५ नुसार १ हजार ७ ग्राहकांविरुद्ध कलम १२६ नुसार ५१ ग्राहकांविरुद्ध कारवाई करण्यात आली. शिवाय ४१० ग्राहकांविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात गुन्हेही दाखल करण्यात आले. तसेच उर्वरित लोकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती महावितरणने दिली. या मोहिमेत सर्वांधिक कल्याण येथे २४४, भांडुप येथे १९३, नागपूर ग्रामीण १८६, अमरावती १६७, नाशिक ११८, पुणे ११०, लातूर ११०, नांदेड ८५, कोल्हापूर ७९, बारामती ७०, रत्नागिरी ७१, जळगाव ६२, औरंगाबाद ४६ आणि नागपूर शहरात २५ वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आली. महावितरणच्या दक्षता व सुरक्षा विभागाचे प्रभारी संचालक शिवाजी इंदलकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या मोहिमेत महावितरणचे सर्व उपसंचालक, सहायक संचालक व ४२ भरारी पथकांचे अभियंता आणि कर्मचाऱ्यांनी भाग घेतला होता. (प्रतिनिधी)
महिनाभरात १० कोटींच्या वीजचोऱ्या पकडल्या
By admin | Updated: June 17, 2014 00:46 IST