हळदीचं वास्तव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2022 06:02 AM2022-01-02T06:02:00+5:302022-01-02T06:05:06+5:30

हळद आपण अगदी रोज वापरत असलो, तरी त्याबाबतच्या अनेक गोष्टी आपल्याला माहीतच नाहीत..

The reality of turmeric! | हळदीचं वास्तव!

हळदीचं वास्तव!

Next
ठळक मुद्देएकावेळी दोन-अडीचशे किलो हळकुंडे अर्ध्या तासात शिजविली जातात. हळकुंडात बारीक काडी टाकायची. ती सहज गेली, की हळद शिजली समजायची!

- श्रीनिवास नागे

हळकुंड शिजवा, वाळवा... मग दळा!

1. हळद हे नऊ महिन्यांचे पीक. ते जमिनीखाली येते. आल्यासारखे गड्ड्याच्या रूपात. जमिनीवर देठ-पाने. पाने कर्दळीसारखी.

2. सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात राजापुरी हळद प्रसिद्ध आहे. त्यासोबत सेलम, इरोड, निझामाबाद या जाती सर्वत्र चालतात. सगळ्याच जातींची एप्रिलच्या दरम्यान लागवड, तर डिसेंबरला काढणी होते.

3. पाने कापून घेऊन नंतर उकरून हळदीचे गड्डे काढले जातात. हा गड्डा सरीच्या वरंब्यावर उलटे आपटल्यावर हळकुंडे आणि गड्डे वेगवेगळे होतात. त्यातली जेठे गड्डे, बगल गड्डे, हळकुंड, सोरा गड्डा, कुजकी हळकुंड अशी प्रतवारी करून वेगवेगळ्या ठिकाणी साठवून ठेवतात.

4. त्यानंतर असते हळद शिजविण्याची प्रक्रिया. पूर्वी मोठ्या लोखंडी काहिलीत पाणी घालून हळकुंडं-गड्डे शिजविले जात. मग ड्रममध्ये वाफेवर शिजविण्याचे तंत्र आले. हळूहळू चार-चार ड्रमचे कूकर आले. हे तंत्रज्ञान व्यापारी आणि शेतकऱ्यांनीच विकसित केले.

5. एकावेळी दोन-अडीचशे किलो हळकुंडे अर्ध्या तासात शिजविली जातात. हळकुंडात बारीक काडी टाकायची. ती सहज गेली, की हळद शिजली समजायची!

6. या शिजवलेल्या हळकुंडांना आठ-दहा दिवस ऊन द्यायचं. वाळलेल्या हळकुंडांवर टरफले येतात, काळपट रंगाची. त्यांना पिवळा रंग येण्यासाठी पॉलिश करावे लागते.

7. त्यासाठी भोके पाडलेल्या खरबरीत बॅरेलचा वापर करतात. घर्षणासाठी आत अणकुचीदार दगड टाकून बॅरेल फिरविला की, पॉलिश होते. पॉलिश केलेल्या हळकुंडांची लहान-मोठी-कणी अशी प्रतवारी करून पोती भरली जातात.

8. हळकुंडांची पोती मग बाजार समित्यांत जातात. मालाचा दर्जा, रंग, जाडी, लांबी, चकाकी, आकर्षकपणा यावर लिलावात दर ठरतो. शेतकऱ्यांनी बाजार समितीत अडत्यांमार्फत हळद विकायची. ती खरेदीदार व्यापाऱ्यांनी घ्यायची आणि पैसे भागवायचे. असा व्यवहार.

9. गोदामं, शीतगृहांत साठवलेली हळकुंडे गरजेनुसार प्रक्रिया कारखान्यांत जातात आणि चक्कीवजा यंत्रातून बाहेर येते हळद पावडर! तीच मग आपल्या स्वयंपाकघरात येते.

--------------------------------

हळदीपासूनच कुंकू बनवितात .. कसे?

1. हिंदूंच्या धार्मिक विधीत हळदीला अंमळ जादाच महत्त्व.

2. हळदीच्या गड्ड्यात टॅपिओका किंवा पांढऱ्या मातीचे खडे मिसळतात आणि त्यावर सल्फ्युरिक ॲसिड, बोरिक ॲसिडची प्रक्रिया करतात. हे मिश्रण वाळवून दळले की तेच कुंकू.

3. हळदीच्या धुळीपासून भंडारा आणि बुक्का तयार केला जातो.

------------------------------------------------

महापूर आला, हळदीची पेवं फुटली!

सांगलीतल्या २००५ मधल्या महापुरानं हळद साठवणुकीची नैसर्गिक गोदामे म्हणजे हरिपूरची पेवं नष्ट केली. त्यामुळे साठवणुकीचा प्रश्न उभा ठाकला. काही व्यापाऱ्यांनी मग मोठ्ठाली गोदामं बांधली. पण पेवं नष्ट बसल्याने व्यापार पाच-सहा वर्ष मागं गेला. बाजारपेठ निस्तेज बनली.

नंतर हळद हंगामासाठी कामगार कायदा लागू झाला. त्यानं कामाच्या वेळेवर आणि पर्यायानं हळदीची सत्वर उलाढाल, ने-आण यावर बंधने आली. हळद पॉलिश, पावडर करण्याची गती मंदावली. मालाचा सत्वर पुरवठा करणे जिकिरीचे बनले.

ऊस, द्राक्षे या नगदी पिकांकडे कल वाढल्याने शेतकरी हळद पिकाला काहीसे बाजूला करू लागले. हळदीचा पीक कालावधी नऊ महिन्यांचा असल्याचाही परिणाम झाला.

-----------------------

आधी म्हणे, हळद शेतीमाल नाही!

आता म्हणे, अडत्यांनीच भरावा जीएसटी!!

1. केंद्र सरकारनं २०१७ मध्ये हळदीवर जीएसटी लागू केला. हळदीवर वाळवण्याची, दळण्याची प्रक्रिया केली जाते, पण जणू ती शेतीमालच नसल्याचे शासकीय यंत्रणेने या निर्णयातून स्पष्ट केले. खरेदीदार व्यापाऱ्यांनी जीएसटी भरायला सुरुवात केली.

2. आता वाळवलेली व पॉलिश केलेली हळद शेतीमाल नसल्याचे पुन्हा एकदा सांगत महाराष्ट्र अग्रीम अधिनिर्णय प्राधिकरणाने अडत्यांनीच जीएसटी भरावा, असा निर्णय जाहीर केलाय.

3. शेतकरी हळद पिकवतो, स्वत:च शिजवतो, वाळवतो, पॉलिश करतो आणि बाजार समितीत विकायला आणतो. तिथं अडत्यांमार्फत लिलाव होतात आणि खरेदीदार व्यापारी ती हळद खरेदी करतात.

4. आतापर्यंत खरेदीदार व्यापारी जीएसटी लावूनच दुकानदारांना किंवा मसाले प्रक्रिया उद्योगांना विकत होते. पण आता अडत्यांनीच जीएसटी लावून बिलं देण्याचा प्रकार सुरू होईल.

-----------------------------------------------------

कोट : 1

सध्या खरेदीददार माल विकताना जीएसटी भरतो. रिटर्न भरण्याची यंत्रणा अडत्यांकडे कुठे असणार? अडत्याला आता जीएसटीच्या नोंदी व तत्पर भरणा करावा लागेल. भरणा न केल्यास खरेदीदाराला भुर्दंड सोसावा लागेल. यामुळे बाजार समिती आणि अडते ही संकल्पनाच संपून जाईल. जीएसटीची रक्कम आधीच द्यावी लागणार असल्याने खरेदीदाराची गुंतवणूक विनाकारण वाढेल. हळद विकली जाईपर्यंत त्याचे जीएसटी भरलेले पैसे गुंतून पडतील. बाजार समितीतले खरेदीदार कमी होतील. शेतकऱ्यांकडून थेट खरेदी होईल आणि त्यात अपप्रवृत्ती शिरतील. मनमानी दराने खरेदी होईल!

- मनोहरलाल सारडा, माजी अध्यक्ष,सांगली चेंबर ऑफ काॅमर्स

------------------------------------------------

कोट : 2

अडते स्वत: खरेदी करत नाहीत, त्यामुळे त्यांच्यावर जीएसटी आकारणीचा प्रश्न येत नाही. खरेदीदारांनाही तो लागू होत नाही. त्यांच्याकडून पुढे प्रक्रियेसाठी खरेदी करणाऱ्यांना तो भरावा लागेल. हळदीवर प्रक्रियेनंतर जीएसटी लागू करावा. बाहेरच्या पेठांमध्ये शेतकऱ्यांकडून आलेल्या हळदीवर जीएसटी आकारला जात नाही. सांगलीत अडत्यांकडून तशी आकारणी सुरू झाल्यास इथला व्यापार बाहेर जाईल.

- दिनकर पाटील, सभापती, सांगली बाजार समिती

----------------------------------------------------

(वृत्तसंपादक, लोकमत, सांगली)

(छायाचित्रे : नंदकिशोर वाघमारे)

Web Title: The reality of turmeric!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.