पासपोर्ट विरुद्ध रेशनकार्ड..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2020 06:04 AM2020-04-05T06:04:00+5:302020-04-05T06:05:12+5:30

शहरांनी दाणापाणी थांबवले तेव्हा अन्नपाण्याची खात्री वाटेना म्हणून  आपापल्या गावी परतणे भाग पडलेले ‘रेशनकार्डवाले’  आणि परदेशातून येताना  अजाणता संसर्ग/ संसर्गाची शक्यता घेऊन परतलेले ‘पासपोर्टवाले’  या दोघांचेही आर्थिक वर्ग वेगळे असले  तरी कोरोना विषाणूने त्यांची हतबलता मात्र  एकाच पातळीवर आणून ठेवलेली आहे.  ज्याच्या डोक्यावर दोष ढकलता येईल असा  यापैकी कुणी ‘एक’ शोधून त्याला झोडपत सुटण्याने   ‘घर-बंद’ लोकांचा टाईम्पास याहून दुसरे काही साधणार नाही.

Passports verses ration cards.. How the new device emerges with Covid-19 ! | पासपोर्ट विरुद्ध रेशनकार्ड..

पासपोर्ट विरुद्ध रेशनकार्ड..

Next
ठळक मुद्देसंसर्गाच्या साथी गट-तट जाणत नाहीत. या संसर्गातून सुटून जाण्याचे स्वातंत्र्य अधिकाराने हिसकावता येईल  किंवा पैशाच्या बळावर ‘विकत’ घेता येऊ शकेलच असे नाही. - तेव्हा शहरांनी गावांकडे भुवया आक्रसून पाहणे आणि गावांनी शहरातल्यांना मुजोर म्हणणे हे सारेच फोल आहे.

- अपर्णा वेलणकर

कोकणातलं विजयदुर्ग हे माझं मूळ गाव.
हल्ली गावातून शहरात / देश-विदेशात गेलेल्या माजी-गावकर्‍यांचा गावागणिक एक व्हॉट्सअँप ग्रुप असतो, तसा तो आमच्याही गावाचा आहे. 
भारतातली गावे पूर्वी असत, तशीच अजूनही असतात असा गोड गैरसमज ज्यांचा असेल, त्यांनी ‘अपडेशन’ची सवय नसल्यास आपल्या मूळ गावाचा व्हॉट्सअँप ग्रुप शोधून त्यात तरी निदान शिरावे. 
गावांचा भूगोल बदललेला नाही हे खरे; पण जगाच्या नकाशावरल्या रेषा पुसणारी साधने आता गावकर्‍यांच्याही हाती आहेत, त्यामुळे कोरोनाच्या संसर्गाची माहिती न्यू यॉर्कच्या बरोबरीनेच नवेगाव खुर्दमध्येही वेळीच पोहोचली होती. या नव्या विषाणूचे गांभीर्य जाणवेपर्यंत थोडा वेळ गेला खरा; पण महानगरे आणि शहरांमध्ये लॉकडाउन घडवायला प्रशासनाने कंबर कसण्यापूर्वी अनेक गावांनी आपापल्या परीने आपापल्या पातळीवर हालचाल सुरू केली होती. आमचे विजयदुर्गही त्यातच होते. गावाच्या सीमेवर आपण गस्त सुरू केली आहे, गावात येणार्‍या  प्रत्येक नव्या माणसाची चौकशी केली जाते आहे, परदेशी प्रवास करून आलेल्या दोन गावकर्‍यांना होम क्वॉरण्टाइनमध्ये ठेवलेले आहे वगैरे माहिती ग्रामपंचायतीचे तरुण सरपंच आमच्या ग्रुपवर अपडेट करत होते.
- अशातच ग्रुपवर एक निनावी आणि फॉरवर्डेड पोस्ट पडली. 
एरव्ही मुंबईवाल्यांवर सतत अवलंबून असणार्‍या गावाने, वेळोवेळी मुंबईवाल्यांची मदत मागणार्‍या-प्रत्येक सार्वजनिक कामात निधी जमवायची वेळ आली की मुंबईकरांच्या नावांची यादी आधी करणार्‍या गावाने या संकटाच्या काळात मात्र त्याच मुंबईकरांसाठी गावाच्या सीमा बंद केल्याबद्दल तीव्र संताप त्यात तडतडत होता. ‘गाववाल्यांच्या मुलाला जॉब हवा असला की हे आम्हाला गळ घालणार, मुंबई-पुण्यात काम असले तर तुमच्याकडे राहायला येतो चार दिवस म्हणून हक्काने सांगणार, आम्ही गावी गेलो की पार्टी मागणार आणि आता वेळ आली तर हेच गाववाले आम्हाला सांगतात, मुंबई-पुण्याच्या लोकांनी गावात येऊ नये.? किती हा कृतघ्नपणा? ’- असे संतापाने विचारणारी ती पोस्ट होती! आज आम्हाला गावाच्या सीमा बंद करता आहात आणि आम्ही गावात येऊ नये म्हणून गस्ती घालता आहात; उद्या गरज पडेल तेव्हा आमच्या पायाशी येऊ नका. वेळ बदलायला वेळ लागत नाही’- अशी धमकीची भाषाही त्यात होती.
त्या मागोमाग ‘रागावलेल्या मुंबईवाल्यांना गाववाल्यांचे उत्तर’ अशा शीर्षकाची आणखी एक पोस्ट या ग्रुपवर पडली. तीही फॉरवर्डेड आणि व्हायरल झालेली. त्यात त्या निनावी पोस्टकर्त्याने बदलत्या वर्तमानाची अजिबात जाणीव नसलेल्या दीडशहाण्या मुंबईवाल्यांचे कान पिळले होते. स्वत:च्या ढुंगणावर फाटका पंचा असला तरी गौरी-गणपतीत, शिमग्या-दिवाळीत बर्म्युडा घालून गावभर उणाडणार्‍या मुंबईकराचे चोचले पुरवणार्‍या  गाववाल्यांना मूर्ख समजू नका, असा दम भरला होता आणि वर लिहिले होते,  ‘कुणीतरी कमीपणा घेऊन म्हातार्‍या आईबापाला सांभाळायला आणि गुरे वळायला गावात राहिले म्हणून तुम्ही मुंबईत जाऊन चाकरमानी झालात, हे विसरू नका!’
- वरून ‘आता गाव तुमच्यावर अवलंबून नाही, तेव्हा जाता-येता तुमच्या खिशात खुळखुळणार्‍या पैशाचा आणि शहरातल्या दीड खोलीच्या घराचा माज दाखवू नका’ असेही स्पष्ट सुनावले होते.
कोरोनाचा प्रकोप किती भयावह आहे आणि सर्वदूर पसरतो आहे, याची जाणीव पुरेशी स्पष्ट होण्यापूर्वीचे हे व्हर्चुअल भांडण. त्यात दोन्ही बाजूंनी खुमखुमी समानच होती. 
***
त्यानंतर देशात पूर्ण लॉक-डाउनचे दिवस सुरू झाले. जिथे आहात, तिथेच राहा अशी सक्ती अपरिहार्य झाली. काय चालले आहे, हे कुणालाच नीटसे उमगत नव्हते. हळूहळू प्रशासनाने आपली पकड मजबूत करत आणली आणि होता होईल तितक्या लोकांना घरात कोंडले. गेल्या शेकडो वर्षांत कधी आली नव्हती, अशी वेळ आलेली, सगळ्यांनाच सगळेच अनपेक्षित होते.
पण कधी नव्हे तो जिवाच्या धास्तीने हबकलेल्या आणि जगभरात कोरोनाच्या संसर्गाने होत असलेल्या मृत्यूंचे तासागणिक जगभरातले वाढते आकडे पाहून जिवाचा ठाव सुटत चाललेल्या विचारी मनांना डागण्या देणारी दृश्ये अचानक आदळू लागली :
शहरातले दाणापाणी बंद झाल्याने रातोरात शहरे सोडून रानोमाळ झाल्यासारख्या आपापल्या गावांच्या दिशेने चालू लागलेल्या झुंडी! उपाशीपोटी शेकडो किलोमीटर्सचे अंतर पायी तुडवणे नशिबी आलेल्यांचे हताश हतबल घोळके!!
हातावरचे पोट असलेले हे कष्टकरी कामगार, मजूर. या लोकांना भावनावश होऊन आसवे गाळायला वेळ नसतो. अवघड परिस्थितीशी सततचाच सामना असल्याने त्यांचे मन दगडावर आपटले तरी उभे राहील असे खरखरीत खमके घडत जाते त्यामुळे या झुंडींनी ना सरकारकडून अपेक्षा ठेवली, ना आपल्या ‘शहरी’ धन्यांकडे आशेने पाहिले. वाहने बंद झाल्याचे कळल्यावर त्यांनी बोचकीबाचकी उचलली आणि आपापल्या गावाची दिशा धरून सरळ चालायला सुरुवात केली. ‘माझी आई गेली आहे, तिच्या अंत्यदर्शनाला तरी मला जाऊ द्या’ म्हणून दिल्लीच्या सीमेवर धाय मोकलून रडणारा एक बिहारी मजूर आणि उपाशीपोटी पायपीट चालू असताना अचानकच कुण्या दात्याने जेवायला वाढले म्हणून डोळे पाणावलेला कुणी हतबल मुसाफीर सोडला, तर या झुंडींनी संताप-रडारड-आदळआपट सोडा, साधा त्रागा केल्याचेही दिसले नाही. 
या झुंडी पाहून खरा त्रागा सुरू केला तो शहरी विचारी जणांनी.
ते स्वाभाविकही होते. कुणाही विचारी माणसाचे मन संतापून उठेल असेच काहीतरी आसपास घडत होते.
सध्या एकूणातच व्यक्त होण्याला लाख पाय फुटलेले असल्याने त्यातून उत्पन्न होणार्‍या भांडणांना, वाद-विवादांना कोणती दिशा मिळेल, हे हल्ली सांगता येत नाही.
तसेच झाले.
कोरोनाचे आक्रमण झाले, तेव्हा परदेशात अडकले होते त्या र्शीमंत पासपोर्टवाल्यांना सुखरूप आपल्या देशात परतता यावे, म्हणून सरकारने विमाने पाठवली.. आणि हे पाहा गरीब रेशनकार्डवाले! त्यांना मुंबईने हाकलून लावले, दिल्लीने झिडकारून लावले आणि रस्त्यावर उपाशी पायपीट करायला धाडले; यावरून सुरुवातीला संताप व्यक्त झाला तो स्वाभाविकच होता. 
कोरोनाचा संसर्ग देशात आणला तो पासपोर्टवाल्यांनी आणि त्याचा त्रास भोगतात हे गरीब रेशनकार्डवाले, हा कुठला न्याय, असे प्रश्नही संतापून विचारले गेले.
या संतापाला आणखी एक पार्श्वभूमी होती, ती कनिका कपूरसारख्या बेफिकीर उच्चभ्रूंनी घातलेल्या अश्लाघ्य गोंधळाची! अनेक सरकारी अधिकार्‍यांनी आपली वजने वापरून परदेशातून परतणार्‍या आपल्या लाडक्या बाळांना ‘क्वॉरण्टाईन’च्या सक्तीतून सोडवून अलगद घरी नेल्याचे उघडकीस आले, हातावर होम क्वॉरण्टाईनचे शिक्के मारलेल्या अनेक बेमुर्वत ‘फॉरीन रिटण्ड’ र्शीमंतांनी बिनदिक्कत घराबाहेर पडून पाटर्य़ा केल्या!! - हे सगळे मोकळे सुटणार आणि शहरातला रोजगार ठप्प झाल्याने गावाच्या आर्शयाला निघालेला गरीब मजूर मात्र पोलिसांच्या काठय़ा खाणार?- हे गणित चीड आणणारेच होते!
- इथवर जे झाले ते तसे स्वाभाविकच म्हणायचे.
पण आता मात्र एक नवे वर्गयुद्धच सुरू झालेले दिसते आहे : पासपोर्टवाले विरुद्ध रेशनकार्डवाले!
गावात राहिलेल्यांनी शहरी लोकांच्या मुजोरीला दुषणे द्यायची आणि शहरी लोकांनी गाववाले कसे भोंगळ, ते कसे संसर्ग वाहून नेत आहेत, त्यांना कशी कसलीच पर्वा नाही म्हणून तोंड वाजवायचे असे सुरू झाले आहे. आणि हे दोघे मिळून एका समान शत्रूला झोडण्यात मश्गूल आहेत : पासपोर्टवाले!
- सध्या कोरोना नावाच्या विषाणूला जन्माला घालून (?) अख्ख्या जगाला संकटात लोटणार्‍या चिन्यांच्या खालोखाल भारतीय विचारविश्वात निशाण्यावर कोण असेल तर ते पासपोर्टवाले. कारण ते र्शीमंत. त्यांना सारखे ऊठसूट परदेशी जाणे परवडते. त्यांनीच हे कोरोना नावाचे झेंगट देशात आणले, म्हणून त्यांच्यावर दात!
‘लॉकडाउन’ झालेल्या निर्मम शहरांनी आपल्या पोटातून बाहेर लोटलेल्या  ‘रेशनकार्डवाल्यां’च्या झुंडी आपापल्या गावांच्या दिशेने उपाशीपोटी पायी चालू पडल्याची दृश्ये दिसू लागल्यावर तर पासपोर्टवाल्यांना सरसकट शिव्या घालणार्‍यांची लाटच आली.
कोरोना विषाणूच्या संसर्गाची साथ जीवघेण्या वेगाने फैलावत असताना आलेल्या आवर्ताने  ‘समाज’ म्हणून असलेल्या आपल्या जुन्या ठणकत्या जखमा तर उघड्या पाडल्याच आहेत; पण नव्याने नवे ओरखडे उठवून अत्यंत अस्वस्थ अशा या काळात नवे गटतट आणि नव्या फाटाफुटीही घडवल्या आहेत.
त्यातलीच नवी ‘वर्ग’वारी म्हणजे ‘पासपोर्टवाले’आणि ‘रेशनकार्डवाले’!
सध्या कामे-धामे थांबल्यामुळे बरेच लोक घरी रिकामे बसून आहेत आणि अशा जागतिक आपत्तीच्या प्रसंगी आपली संवेदनशीलता ‘दाखवणे’ हे राष्ट्रीय कर्तव्य असल्याने जो तो सोशल मीडियावर मिनिटागणिक पोस्टी पाडण्यात व्यग्र आहे. डोक्यावर छप्पर, पुढची दोनेक वर्षे आर्थिक आणीबाणीची असली तरी निभावून जाता येईल इतपत गाठीशी पुंजी, लॉकडाउन असले तरीही जाता-येता खायला पुरेल इतके घरात साठवलेले अन्न, दूध आणि भाजी वैगेरे मिळेल तेव्हा विकत घेण्याची ऐपत, सतत हात धुण्यासाठी घरातल्या नळाला वाहते पाणी, मनरंजनासाठी नेटफ्लिक्सपासून हॉटस्टारपर्यंतचे तमाम ओटीटी फलाट आणि एवढे असूनही मनाची अस्वस्थता वगैरे मांडण्यासाठी सोशल मीडिया असा सगळा तामझाम दिमतीला असल्याने अनेकांना विमनस्कतेचे झटके येत आहेत आणि घरात बसून दहा-पंधरा दिवस नाही झाले तोच ‘डिप्रेस्ड’ वगैरे वाटू लागले आहे. भारतातली मानसिक आरोग्याची स्थिती ही काळजी करण्याजोगी आहे, असे अनेक तज्ज्ञ कोरोना-पूर्व काळापासून सांगत होतेच. पण भारतीयांची (आणि त्यातही मूलभूत गरजांसाठीचा संघर्ष संपलेल्यांची प्राधान्याने) अवस्था ही इतकी बिकट असेल, असे त्या तज्ज्ञांनाही वाटले नसावे. वास्तव नीट समजावून घेऊन आवश्यक ती काळजी कसोशीने घेणे आणि भविष्यातल्या संकटांचा अदमास घेऊन त्यांना सामोरे जाण्याच्या पूर्वतयारीला/ नियोजनाला खंबीर मनाने नेटकी सुरुवात करणे हे ज्या वर्गाकडून अपेक्षित होते, तो वर्गच सध्या फार खचलेल्या विमनस्क मन:स्थितीत गेल्याचे निदान सोशल मीडियावर तरी दिसते. 
- आणि हीच भिरभिरलेली मन:स्थिती या नव्या वर्गयुद्धाला कारण ठरते आहे.
हे वर्गयुद्ध फक्त घर-बंद उच्चभ्रूंनीच चालवलेले नाही, खेडोपाडीच्या सोशल मीडिया वापरणार्‍यांनीही आता त्यात तेल ओतणे सुरू केलेले आहे. त्यांचा संताप निदान समजण्यासारखा तरी आहे, कारण या मंडळींना ‘वर्क फ्रॉम होम’ची सुविधा नाही. सक्तीच्या सुट्टय़ा वजा जाता निम्म्याअधिक का असेना, पगार मिळेल याची शाश्वती नाही. सगळे अर्थचक्र ठप्प झाल्याने शेतमाल डोळ्यादेखत वाया चालला आहे आणि इतर बारीक बारीक उद्योगवाल्यांच्या हाताला आधीच तुटपुंजे असलेले कामही आता उरलेले नाही. त्यात पुढे काय होणार, ते कधी होणार हे माहीत नाही. त्यामुळे हे दोघे मिळून त्यांच्या डोक्यावरच्या स्तरातल्या पासपोर्टवाल्यांना झोडत सुटले आहेत. का? कारण कोरोना त्यांनीच देशात आणला!! आणि त्या उद्दाम र्शीमंतांच्या या पापकृत्यांची शिक्षा मात्र गरिबांच्या माथी आली.
कुणी म्हणेल, हे तात्कालिक आहे. असेलही; पण यात दडलेली एका नव्या  ‘फाटाफुटी’ची शक्यता मात्रा दूरगामी ठरू शकते. शहरे विरुद्ध खेडी असे नवे मानसिक विभाजन!!
खरे तर या  ‘कोरोना’ने कधी नव्हे तो एक लघुत्तम साधारण विभाजक अख्ख्या जगाला पुरवला आहे. तुम्ही कोणीही असा, विकसित-विकसनशील अगर थर्ड वल्र्डवाले, कितीही शबल असा अगर निर्बल, कोणत्याही वंशाचे-देशाचे-धर्माचे-जातीचे असा, डावे-उजवे-मधले असा; सगळ्यांना धोका सारखाच! प्रतिकाराच्या शारीरिक आणि सामाजिक-वैद्यकीय क्षमतांवर ज्याचे त्याचे जगणे-मरणे सध्या टांगलेले आहे.
सर्वांनाच आतून आपल्या ‘एकत्वा’ची जाणीव व्हावी, अशी परिस्थिती ओढवलेली असताना आपण मात्र आपल्यातच नवनवे गट पाडून ‘विष-अमृत’चे नवे डाव मांडायला घेतले आहेत. अजून तरी राजकीय नेत्यांनी दोषारोपांचे खेळ सुरू केलेले नाहीत, हे नशीब! पण एरव्ही शिव्याशापांचे धनी होणार्‍या राजकीय नेत्यांचे सांप्रतचे शहाणपण घेण्यास सामान्यजण तयार नाहीत.
शहरांनी दाणापाणी थांबवले तेव्हा अन्नपाण्याची खात्री वाटेना म्हणून आपापल्या गावी परतणे भाग पडलेले ‘रेशनकार्डवाले’ आणि परदेशातून येताना अजाणता संसर्ग/ संसर्गाची शक्यता घेऊन परतलेले ‘पासपोर्टवाले’ या दोघांचेही आर्थिक वर्ग वेगळे असले तरी कोरोना विषाणूने त्यांची हतबलता मात्र एकाच पातळीवर आणून ठेवलेली आहे. प्राप्त परिस्थितीत सर्वांनीच उच्चतम जबाबदारीने वागणे, हे निकडीचे. ज्याच्या डोक्यावर दोष ढकलता येईल असा कुणी ‘एक’ शोधून त्याला झोडपत सुटण्याने ‘घर-बंद’ लोकांचा टाईम्पास याहून दुसरे काही साधणार नाही.
ज्यांनी आपला घाम गाळून शहरे उभारली, त्या कष्टकरी माणसांना शहरांनी संकटकाळी निर्ममतेने बाहेर लोटून देणे हे अनुचितच आहे. या माणसांना गुराढोरांसारखे एकत्र बसवून त्यांच्यावर जंतुनाशके फवारणे हे नीच कृत्य आहे, हेही मान्य!
- पण हेही खरे की शहरी, उच्चभ्रू असणे आणि परदेशी प्रवास करण्याइतपत ऐपत कमावणे हाही काही गुन्हा नव्हे.
संसर्गाच्या साथी हे असले गट-तट जाणत नाहीत. या संसर्गातून सुटून जाण्याचे स्वातंत्र्य   अधिकाराने हिसकावता येईल किंवा पैशाच्या बळावर ‘विकत’ घेता येऊ शकेलच असे नाही. अन्यथा दूरदेशीच्या राजकुमारांना, राण्यांना आणि पंतप्रधानांना कोरोना गाठता ना!
- तेव्हा शहरांनी गावांकडे भुवया आक्रसून पाहणे आणि गावांनी शहरातल्यांना मुजोर म्हणणे हे सारेच आता फोल आहे. तेव्हा ते थांबवू या.
कोरोनाच्या संसर्ग-भयाने जगणे थांबले आहे ते फक्त माणसाचे.
बाकी पृथ्वीतलावरील सर्व जीवसृष्टीचे उत्तम चालले आहे.
आपल्याविना इथे कुणाचे काही अडत नाही, एवढे माणसाला उमगले तरी पुष्कळ! आपण माणसे या ग्रहावरचे पाहुणे आहोत. इथले मालक नव्हे.
aparna.velankar@lokmat.com
(लेखिका लोकमत वृत्तसमूहात फीचर एडिटर आहेत.)

Web Title: Passports verses ration cards.. How the new device emerges with Covid-19 !

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.