शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
2
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
3
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
4
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
5
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
6
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
7
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
8
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
9
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
10
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
11
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
12
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
13
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
14
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
15
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
16
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
17
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
18
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
19
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
20
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा

वेदनेचे शब्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 06:41 IST

विद्रोही सांस्कृतिक चळवळीतर्फे नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे ‘विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन’ सुरू आहे. त्यानिमित्त संमेलनाध्यक्ष नजूबाई गावित यांच्याशी एक संवाद.

- मुलाखत : शर्मिष्ठा मीना शशांक भोसले

मराठी साहित्य आजही ‘ब्राह्मणी’ आहे. मुख्य साहित्यिक प्रवाहात कंपूशाही आहे. पुरोगामी चळवळी क्षीण झाल्या आहेत. बहुजन, स्त्रियांचे प्रश्न सर्वार्थानं बेदखल आहेत. मानवी दु:खाला कुठेच स्थान नाही. जात-वर्ग-स्त्रीदास्यअंताशी तर कोणालाच काही देणंघेणं उरलेलं नाही. ज्या माणसांसाठी लढायचं त्यांच्या कहाण्या इतर समाजापर्यंत कधी पोहचतच नाहीत. त्या पोहचवण्याच्या हेतूनंच मी लिहिती झाले. ते मला माझं कर्तव्य वाटतं.

विद्रोही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या सन्मानासाठी मनापासून अभिनंदन. आदिवासी आणि शोषित समूहासाठीचे लढे तुम्ही दीर्घकाळ लढत आहात. चळवळीत कार्यरत असतानाच लिहितं राहण्याचं महत्त्व तुमच्यासाठी नेमकं काय आहे?

लिहितं राहणं हे तर मला माझं कर्तव्यच वाटतं. कारण आजचं वास्तव प्रचंड बोचणारं आहे. एक गाव, एक पाणवठा, भूमिहीनांचे संघर्ष, नामांतर, बाबरी मशीद पाडल्यानंतर उभारलेला लढा असं सगळं मी अनुभवलं. मला दलित-ग्रामीण साहित्याने कधी स्वीकारलं नाही. पुरस्कार मिळाले; पण समीक्षा वाट्याला आली नाही. ते असो. ज्या माणसांसाठी लढायचं त्यांच्या कहाण्या उरलेल्या समाजसमूहापर्यंत कधी पोहचतच नाहीत. त्या पोहचवण्याच्या हेतूनं मी लिहिती झाले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय स्त्रीच्या सबलीकरणासाठी मांडलेल्या हिंदू कोड बिलाला विरोध झाला. बिल हाणून पाडण्यात आलं. त्यातल्या काही गोष्टी कायद्यात रूपांतरित झाल्या. मात्र आदिवासी स्त्रीला त्याही कायद्याचं संरक्षण नाही. कारण तिला ‘हिंदू स्त्री’ म्हणून मान्यता नाही. आदिवासी स्त्रीला हिंदू कोड बिल लागू करावं यासाठीचा आम्ही दिलेला लढा अपयशी झाला. ती स्त्री आज सर्वार्थाने बेदखल आहे. आदिवासी महिला सुखी-स्वतंत्र आहे असाच समज नागरी समाजात लोकप्रिय आहे. प्रत्यक्षात आदिवासी समाजातल्या अनेक प्रथा-परंपरा स्त्रीविरोधी आहेत. अमानुषतेची परिसीमा असलेल्या डाकीण प्रथेला ही स्त्री बळी पडतेय.डाव्या-पुरोगामी स्त्री संघटनांपुढे मी हे प्रश्न मांडले. मात्र त्यांच्या लेखी ते महत्त्वाचे नव्हते. त्या वेदनेतून मी लिहिती झाले, इतकंच.

कॉ. शरद पाटील यांच्यासोबतचं तुमचं सहजीवन खूप समृद्ध राहिलं. तुमच्या लिहितं होण्यात त्यांचा वाटा नेमका काय होता?

मला तर साहित्यातलं काही कळत नव्हतं. कॉ. शरद पाटील सतत लिहिण्याचा तगादा माझ्यामागे लावायचे. मला कुणाकुणाचं कसदार लिखाण आवर्जून वाचायला द्यायचे. त्यातूनच मी आनंद यादवांचं ‘झोंबी’ वाचलं. वाचून वाटलं, हे ग्रामीण जगणं इतकं कष्टाचं असेल तर आदिवासीचं अजूनच भेगाळलेलं आहे. मी लिहिती झाले. कॉम्रेडनं लिखाणात वेळोवेळी सुधारणा केल्या. माझी ‘तृष्णा’ कादंबरी आल्यावर टीका झाली. हे मी लिहिलं नसावं अशी शंकाही घेतली गेली. मग मी माझं हस्तलिखित दाखवलं लोकांना. पुढं ‘भिवा फरारी’ ही दुसरी कादंबरी आणि ‘नवसा भिलिणीचा एल्गार’ हा कथासंग्रह आला. आता लवकरच भूमिहीनांची उगवती चळवळ आणि शेतकºयांची मावळती चळवळ या विषयावरची नवी कादंबरी येणार आहे. एक कथासंग्रहसुद्धा लवकरच येईल.

आज लिहित्या असणाऱ्या स्त्रियांविषयी काय वाटतं? महिला पुरवण्या-नियतकालिकं कितपत आश्वासक वाटतात?

महिलांच्या प्रश्नावर अनेक मासिकं, पुरवण्या निघतात. पण बराचसा मजकूर वरवरचा असतो. बहुसंख्य स्त्रियांचे प्रश्न, संघर्ष यांना आवाज देण्यात हे मंच कमी पडतात. स्त्रियाच काय, आज सगळीच माणसं उद्ध्वस्त होण्याच्या कड्यावर उभी आहेत. त्यांना बळ देणारं साहित्य निर्माण व्हायला पाहिजे. तरुणांनी आजच्या काळाची भाषा समजून घ्यायला हवी. नसता काळाचे हे सगळे प्रश्न अनुत्तरितच राहतील. नव्या पिढीनं नुसतं शिकून काही होणार नाही, वास्तवाकडे पाहण्याची नजर कमवायला पाहिजे. आदिवासी पट्ट्यात वाहरू सोनवणेसारखे काही आश्वासक लोक आहेत. ज्यांनी भोगलं नाही असेही अनेक बिगर आदिवासी लोक आदिवासींच्या प्रश्नावर लिहू पाहतात. ते बेगडी ठरतं. धुळे, नंदुरबार पट्ट्यात अजून खूप माणसं लिहिती होणं गरजेचं आहे. नसता त्यांचं दु:ख असं चेहरा नसलेलंच उरेल. घराघरातल्या स्त्रियांनी लिहितं व्हावं असं मला खूप वाटतं. प्रत्येकीची एक कहाणी दिसते मला.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, त्याच्या अध्यक्ष निवडीची प्रक्रि या याबाबत काय वाटतं?मराठी साहित्य हे आजही ब्राह्मणी साहित्य आहे. त्याचा तोंडवळा बहुतांश मनोरंजनप्रधान दिसतो. मानवी दु:ख-वेदनेला तिथं फारसं स्थान नाही. शोषणाचे सूक्ष्म पदर उलगडले जात नाहीत. संमेलनातही साहजिकच याचे प्रतिबिंब पडलेले दिसते. अध्यक्ष निवडीची प्रक्रि या मला पटत नाही. शासनाची मदत घेऊन तुम्ही कसा व्यवस्थाविरोध करणार? दलित, ग्रामीण, मुस्लीम, महिला साहित्याचे प्रवाह थंडावलेत. पूर्वी साहित्यिकांच्या एका फळीने विद्रोह केला. पण नंतर अनेकजण प्रस्थापितांच्या वळचणीला जाऊन बसले. हे असं का झालं? अनेकांच्या कहाण्या आहेत; पण त्या पुढे आणायला ते धजत नाहीत. कारण प्रतिष्ठितांनी एक वर्तुळ आखून ठेवलंय. मुख्य साहित्यिक प्रवाहात कंपूशाही आहेच.

आज पुरोगामी चळवळीपुढची आव्हानं काय आहेत? चळवळीला बळ देण्यासाठी काय करायला पाहिजे?

एकेकाळी सशक्त असलेल्या चळवळी आज क्षीण झाल्यात. पक्ष-संघटना ब्राह्मणी छावणीखाली गेल्यात. बहुजनांचे प्रश्न नीटसे समजून घेतले जात नाहीत. मी कार्यरत आहे त्या सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाने जात-वर्ग-स्त्रीदास्यअंताची भूमिका घेतली. अनेक पुरोगामी पक्षांनी मात्र जातीबाबत आपली भूमिका अजूनही स्पष्ट केली नाही. जात दिवसेंदिवस उग्र होते आहे. जातिअंताचा समान कार्यक्रम घेऊन सगळे मतभेद बाजूला ठेवत आता एकत्र यावं.

आजघडीला विद्रोह म्हणजे नेमकं काय?

माणसानं जात-वर्ग-स्त्रीदास्यअंताची भूमिका घेतली तरच तो विद्रोह होणार. सामाजिक परिवर्तनाकडे साहित्य जाणार असेल तरच ते खरं विद्रोही साहित्य. सामाजिक, सांस्कृतिक विषमतेवर नेमकं बोट ठेवता आलं पाहिजे. अर्थात, त्याची किंमत मोजण्याचीही तयारी पाहिजे. संमेलनात माझं भाषण उत्स्फूर्त असेल. मात्र विद्रोह आणि आजघडीला त्याचा आविष्कार यावर मी आवर्जून बोलणार आहे.

आधुनिक म्हणवणाऱ्या समाजात जात-धर्माच्या अस्मिता तीव्र होताहेत. तंत्रज्ञानाचा वापर हिंसेला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी केला जातोय. या सगळ्याकडे तुम्ही कसं पाहता?

मानवी स्वभाव सत्ताप्रिय आहे. आज जग आधुनिक होत असलं तरी माणूस दिवसेंदिवस असुरक्षित होतोय. हिंसा करून तो सत्ता गाजवण्याचं क्षणिक सुख मिळवू पाहतो. आपल्याच आत दबा धरून बसलेल्या अमानवीपणाशी आता डोळा भिडवला पाहिजे.