...आता लढाई सर्वसमावेशकतेची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 11:51 PM2019-09-14T23:51:26+5:302019-09-14T23:53:02+5:30

समलैंगिक संबंधांना गुन्हा ठरवणारं ३७७ कलम सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्याला एक वर्ष पूर्ण झालं. दोन गे पुरुष, दोन लेस्बियन स्त्रिया एकमेकांसोबत खुलेपणाने राहू शकतात, शरीरसंबंध ठेवू शकतात याचा आनंद व्यक्त करणारे अनेक प्राईड मार्च देशात निघाले, आनंदोत्सव साजरे झाले. गे, ट्रान्सजेंडर, लेस्बियन आणि थर्ड जेंडर वर्गातले अन्य नागरिक यांना पुढे काय हवं आहे, याचा विचार करण्यासाठी नागपुरात सारथी व हमसफर या संस्थांच्या वतीने अलीकडेच एक मोठा परिसंवाद घेण्यात आला.

... now the battle is consensus | ...आता लढाई सर्वसमावेशकतेची

...आता लढाई सर्वसमावेशकतेची

googlenewsNext

आपल्याला हव्या त्या पार्टनरसोबत शरीरसंबंध ठेवण्याचा, त्याच्यासोबत राहण्याचा कायदेशीर मुलभूत अधिकार मिळाल्यानंतर, एलजीबीटीक्यू (लेस्बियन, गे, बायोसेक्शुअल, ट्रान्सजेंडर आणि क्वीर) या गटातील नागरिकांसमोरची यापुढची लढाई सर्वसमावेशकतेची राहणार आहे. आतापर्यंत आपल्याच गटासोबत राहण्याच्या त्यांच्या वहिवाटीला तोडून, समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्याचे, सर्व नागरिकांसोबत एक नागरिक म्हणून जगता येण्याचे स्वातंत्र्य त्यांना मिळवावे लागणार आहे. त्यांच्या आधीच्या लढाईपेक्षा ही लढाई बरीचशी वेगळी, विस्तृत आणि गुंतागुंतीची राहणार आहे. यात बरेच प्रश्न आहेत, अडथळेही आहेत. त्यातले काही समाजाने उभे केलेले तर काही खुद्द एलजीबीटीक्यू या गटाने राखलेले आहेत.
तृतीयपंथी समाजाकडे कुचेष्टेने पाहण्याची समाजाची नजर अद्याप तशीच घट्ट आहे. शहरांमध्ये ती वेगाने बदलत असली तरी, गावपातळीवर ती कैक वर्षे मागे आहे. समाजाच्या या कुचेष्टित नजरेपासून स्वत:ला सुरक्षित राखण्यासाठी एलजीबीटी समुदायाने स्वत:भोवती वेढून घेतलेली काहिशी हटकेपणाची ढाल थोडी शिथील करण्याची वेळ आली आहे.
बाहेरचा पिंजरा तुटला आहे पण मनातले पिंजरे अद्यापी उघडायचे आहेत. हे मनातले पिंजरे जसे समाजमनात आहेत तसे ते एलजीबीटीक्यू गटातील नागरिकांच्या मनातही आहेत. अरेरावी करणारा, गुंड प्रवृत्तीचा पुरुष समाजात स्वीकारला जातो. पण स्त्रैण भाव असलेला पुरुष पाहण्याची या समाजाच्या नजरेला सवय नाही. तसे स्त्रैण असणे हे निसर्गदत्त नसून, जणू त्या व्यक्तीचाच दोष असल्यासारखे पाहणे आजही रुढ आहे.
या सर्व अडथळ्यांना पार करत एक स्वतंत्र नागरिक म्हणून स्थान कमावणे यासाठी समाजाने काय केले पाहिजे आणि एलजीबीटीक्यू या समूहाने काय केले पाहिजे यावर नागपुरात बरेच मंथन झाले.
या चर्चेत एड्सच्या क्षेत्रात दीर्घकाळ काम केलेले डॉ. मिलींद भृशुंडी, सारथीचे सीईओ निकुंज जोशी, समन्वयक आनंद चंद्राणी, इंडिया पीस सेंटरचे दीप कास्टा, एनसीसीआयचे विजयन सर, टीसीएस कंपनीच्या मृदुल चक्रवर्ती, पर्सिस्टंटच्या आदिती बैतुले, हॉटेल इंडस्ट्रीतील अधिकारी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार यांच्यासह अमरावती, वर्धा व चंद्रपूरहून आलेले गे समुदायाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
समाजाने आम्हाला स्वीकारावे ही एकमुखी मागणी एलजीबीटीक्यूच्या प्रतिनिधींनी प्रातनिधीक स्वरुपात मांडली. समाजाचा स्वीकार हा सहजासहजी होणार नाही, त्यासाठी एलजीबीटी समुदायालाही पुढे यावे लागेल असे मत विविध प्रतिनिधींनी मांडले. एलजीबीटी समुदायाने शिक्षण, कलाकौशल्य, तंत्रज्ञान या क्षेत्रात प्रावीण्य मिळविण्याची गरज असल्याचे मत अनेक वक्त्यांनी मांडले. शिक्षणानेच प्रगतीची दारे खुली होत असतात याचे उदाहरण असलेली मायरा गुप्ता ही भारतातील पहिली ट्रान्सवूमन नर्स या वेळेस उपस्थित होती. शिक्षणानेच आपण एका मोठ्या हॉस्पीटलमध्ये आॅपरेशन थिएटर टेक्निशियन या पदावर काम करू शकलो असल्याचे तिने सांगितले.
शिक्षण घेण्याची मुलभूत गरज पूर्ण करणे एलजीबीटी समुदायातील व्यक्तींना किती अवघड जाते, याची कल्पना देणारी अनेक उदाहरणे काही प्रतिनिधींनी दिली. शाळेत विद्याथी व शिक्षकांकडून दिली जाणारी वागणूक हे शिक्षण सोडण्यामागचे प्रमुख कारण ठरते. याबाबत अवेअरनेस आणण्यासाठी सारथी ट्रस्टने नागपुरातील काही महाविद्यालयात प्रबोधनपर वर्ग घेतले आहेत. ज्यातून नव्या पिढीला एलजीबीटी समुदायाविषयी नेमकी व योग्य माहिती मिळेल व त्या पिढीला या समुदायाविषयी आपुलकी निर्माण होईल.
समाजाच्या मुख्य प्रवाहात स्वतंत्र भारताचे स्वतंत्र नागरिक या नात्याने जगता यावे यासाठी एलजीबीटी समुदायानेही पुढे येण्याची गरज अनेक वक्त्यांनी अधोरेखित केली. एकीकडे समाजात यायचे आहे मात्र दुसरीकडे आपली स्वतंत्र ओळखही हवी आहे, अशा दुविधेत हा समुदाय असल्याचे मत काहींनी मांडले.
वृत्तपत्रांतून येणाऱ्या बातम्यांमध्ये, एलजीबीटी समुदायाला दिले जाणारे ओळखपर शब्द हे अपमानास्पद असतात असे मत एका प्रतिनिधीने व्यक्त केले. त्यावर वृत्तपत्रात काम करणारी माणसे ही याच समाजातून आलेली असतात. त्यांनाही एलजीबीटीविषयी नीट माहिती नसते, त्यांचेही प्रबोधन करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन वृत्तपत्र प्रतिनिधींनी केले.
एलजीबीटी समूहाची लैंगिक जीवनपद्धत व अन्य स्त्री पुरुषांची जीवनपद्धत यात असलेले अंतर हा यातला पहिला मुद्दा आहे. तो अत्यंत व्यक्तिगत असला तरी, त्याचे सामाजिक पडसाद फार मोठे आहेत. लैंगिकसुखाच्या जीवनपद्धतीतील भिन्नता हा मुद्दा खरंतर कुठेच आडकाठी म्हणून यायला नको. मात्र तोच आजवरचा मोठा अडथळा बनलेला दिसतो. विरुद्ध लिंगी व्यक्तीविषयीची ओढ या सर्वसामान्यपणे रुढ असलेल्या धारणेसोबत समलिंगी व्यक्तीविषयीही शारीरिक ओढ वाटू शकते याचा सहजगत्या स्वीकार करण्यासाठी, त्यात काही गैर नाही, अनैसर्गिक नाही हे पटवणे अत्यंत गरजेचे आहे. ते समाजाच्या गळी कसे उतरवायचे, यात कोणाची जबाबदारी अधिक आहे, त्याचा कृती आराखडा कसा रहावा यावर अधिक सखोल विचार होणे आवश्यक आहे.
आजवरचे उत्पन्नाचे पारंपारिक मार्ग सोडून, शिक्षण वा प्रशिक्षण घेऊन व्यवसाय किंवा नोकरी करणे हा मुख्य प्रवाहात सामील होण्यातला दुसरा टप्पा आहे. यासाठी एलजीबीटी समुदायाला बरीच मेहनत घ्यावी लागणार आहे व धैर्य बाळगावे लागणार आहे.
या प्रवासात सरकारची भूमिकाही महत्त्वाची राहणार आहे. छत्तीसगड वा मध्यप्रदेशसारख्या राज्यांच्या सरकारांनी एलजीबीटी समुदायासाठी अनेक योजना व उपक्रम राबविले आहेत. त्याचा फायदा होऊन तेथील समुदाय प्रगतीच्या दिशेने वाटचाल करू लागला आहे. महाराष्ट्रात अद्याप तसे बदल घडलेले दिसत नाहीत. आपले राजकीय नेतृत्वही एलजीबीटीच्या गरजा वा मुद्यांकडे फारसे गांभीर्याने पाहताना दिसत नाही. त्यामुळे उद्या राजकीय क्षेत्रातही या समुदायातील मंडळीनी येणे आवश्यक आहे. जेणेकरून त्यांना आपल्या समुदायाचे म्हणणे राजकीय व्यासपीठावर मांडता येणे शक्य होईल. सर्वसमावेशकता या शब्दाची व्याप्ती विशद करायची झाली तर, उद्या आपल्या घराच्या शेजारी एखादे गे जोडपे रहायला आले किंवा तृतीयपंथी समाजातील स्त्री रहायला आली तर ते सहजतेने घेता येणे इथपासून, आपले शिक्षक, डॉक्टर्स, वकील, न्यायाधीश, राज्यकर्ते, समाजसुधारक या सगळ्यांमध्ये एलजीबीटी समुदायातील व्यक्ती असणे इथपर्यंत करता येऊ शकते. याची किंचितशी सुरुवात झाली आहे. त्याला बळ देण्याची गरज आहे. हे बळ दोन्ही बाजूंनी देता यायला हवे. ती कुणा एकाची जबाबदारी नाहीच. जितकी ती समाजाची आहे तितकीच ती एलजीबीटी समुदायाचीही आहे. ही जबाबदारी पेलण्यासाठीचे मोकळेपण, धैर्य, समज, स्थैर्य, तारतम्य यावे व समाजाचा हा उपेक्षित घटक समाजात समन्वयाने, आदराने विलीन व्हावा हीच वाटचाल यापुढची राहणार आहे.

  • वर्षा बाशू

Web Title: ... now the battle is consensus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.