शहरं
Join us  
Trending Stories
1
Prajwal Revanna: माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा अत्याचार प्रकरणात दोषी, उद्या शिक्षेची घोषणा
2
Dahi Handi 2025: गोविंदा आला रे...! सरकार संरक्षण देणार; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार...
3
मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका, नेमकं प्रकरण काय?
4
'हल्ली मुली नग्न होऊन पैसे कमावत आहेत'; साध्वी ऋतंभरा यांच्या विधानाने नवा वाद
5
फक्त ३,००० रुपये भरा आणि वर्षभर टोल फ्री प्रवास करा, १५ ऑगस्टपासून नवा नियम! फक्त 'या' वाहनांना लागू
6
Mahabharat: एखादी गोष्ट बायकांच्या पोटात राहत नाही, त्याला कारणीभूतआहे महाभारतातली 'ही' कथा!
7
IND vs ENG : एक धाव वाचवण्याच्या नादात 'मॅच विनर' खेळाडू कसोटीतून OUT; टीम इंडिया याचा फायदा उठवणार?
8
PM Kisan योजनेच्या २० व्या हप्त्यासाठी फक्त एक दिवस शिल्लक; लाभार्थींच्या यादीत नाव आहे का चेक करा
9
कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
10
चीनमुळे अनेक उद्योगांवर संकट, सामना करण्यासाठी आता भारताचा 'मास्टर प्लान', सरकार उचलणार पाऊल?
11
महाराष्ट्र बदलतोय : पैठणी ते कोल्हापुरी चप्पल, MSME उद्योगांची डिजिटल झेप!
12
२ पिढ्या पण ध्येय एकच! माय-लेकीच्या जोडीची दमदार कामगिरी, एकत्र पास केली NEET
13
दमदार इंजिन, शानदार मायलेज..; Honda ने लॉन्च केली स्वस्त स्पोर्ट्स बाईक, किंमत...
14
Powerful Air Forces : जगातील सगळ्यात ताकदवान हवाई दलं; भारत 'टॉप ५'मध्ये कितव्या स्थानावर?
15
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
16
रमीला ऑलिम्पिक दर्जा मिळणार, कोकाटेंना क्रीडा मंत्रालय देऊन सन्मानच; काँग्रेसचा महायुतीला चिमटा
17
Monsoon Recipe: तुम्ही कधी पंजाबी शिरा 'प्यायलात' का? ट्राय करा, पावसाळी आजारांवरचा चविष्ट उपाय!
18
ओव्हल कसोटीत टीम इंडियाकडून झाली मोठी चूक, ठरू शकते पराभवाचं कारण  
19
UPI New Rule: आजपासून लागू झाले यूपीआयचे नवे नियम; सारखं सारखं करता येणार नाही 'हे' काम
20
दीड वर्षांचा लेक, महिन्याभरापूर्वी प्रमोशन; लेफ्टनंट कर्नल भानू प्रताप शहीद, दगड पडले अन्...

मरुस्थळात मराठीचे ओअ‍ॅसिस..! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2019 07:00 IST

मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी इस्राईलमध्ये गेली चार दशके कार्यरत असणारे नोहा मस्सील यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा यंदाचा ‘डॉ. भीमराव कुलकर्णी’ पुरस्कार जाहीर झाला आहे. भारताबाहेरच्या व्यक्तीला पहिल्यांदाच हा पुरस्कार प्रदान होतोय. यानिमित्ताने...

- सुकृत करंदीकर-   

साठ-सत्तरच्या दशकात इस्राईलमध्ये स्थलांतरित झालेल्या मराठी ज्यूंची तिसरी पिढी आता इस्राईलमध्ये वाढते आहे. खासकरून कोकण किनारपट्टीवरच्या मुंबई, अलिबाग, पेण, पनवेल, नौगाव, मुरूड, झिराड, तळा, श्रीवर्धन, आवास आणि पुणे आदी गावांमधून ही सगळी मंडळी इस्राईलला गेली. जेरुसलेम, तेल-अविव, अशदोद, हायफा, रामले, पेताह तकवा, लूद, नेत्याना, किर्यात गात, बेरशबा आदी इस्रायली शहरांमध्ये स्थिरावली. इस्राईलला जेव्हा-जेव्हा गेलो, तेव्हा प्रत्येक वेळी तिथल्या मराठी ज्यू कुटुंबांशी संवाद साधण्याचा प्रयत्न मी आवर्जून केला. दोनदा तर मराठी ज्यू कुटुंबातच राहिलो. पहिल्या खेपेपासून एक नाव सातत्यानं ऐकायला मिळायचं ते ‘नोहा मस्सील’ हे. हा मराठी ज्यू माणूस गेली चार दशकं इस्राईलमध्ये चक्क मराठी मासिक चालवतोय. ‘मायबोली’ त्याचं नाव. पहिल्या दोन्ही दौऱ्यांत नोहा यांची भेट घेणं जमलं नव्हतं. तिसऱ्या दौऱ्यात हा योग जुळून आला. जेरुसलेमपासून ३६ मैलांवर असताना मी नोहाचा फोन नंबर फिरवला. पलीकडून अगदी शुद्ध आणि स्पष्ट मराठी उच्चार ऐकायला मिळाले. मराठी भाषा इतकी उत्कृष्ट, सफाईदार की क्षणभर वाटून गेलं, पुण्यात तर फोन लागला नाही ना? पत्ता घेतला, भेटीची वेळ निश्चित केली. ठरल्याप्रमाणं जेरुसलेममधल्या सुंदर टेकडीवरचं त्यांचं टुमदार घर शोधून काढलं. पुढचे तीन-चार तास जणू जेरुसलेममध्ये नव्हतोच मी. हसणं-बोलणं-खाणं-पिणं-पाहुणचार....सगळं काही अस्सल मऱ्हाटमोळं. मग पुढेही भेटी होत राहिल्या. प्रत्येक वेळी तोच प्रत्यय येत राहिला.नोहा यांच्या इस्राईलगमनाची कथा मराठी ज्यूंच्या स्थलांतराबाबत प्रातिनिधिक ठरावी अशीच आहे. रायगड जिल्ह्यातल्या तळा येथे जन्मलेला नोहा सात भावंडांमध्ये सगळ्यांत धाकटा. दीड वर्षाचा असताना त्याची आई वारली. दहावीपर्यंतचं शिक्षण तळ्याला झाल्यानंतर पोटानं त्याला मुंबईत आणलं. छोट्या-मोठ्या नोकºया चालू झाल्या. इलेक्ट्रिकल सुपरवायझरचा कोर्स करून झाला. हे सगळं साठच्या दशकातलं. महाराष्ट्र राज्य नुकतचं जन्माला आलेलं. मराठी भाषा, मराठी संस्कृती याबद्दलचं वारं जोरात वाहण्याचे ते दिवस. नोहाला स्वत:लाही मराठी भाषेबद्दल कमालीची आत्मीयता. मराठी ऐकणं, मराठी वाचणं, मराठी लिहिणं हे सगळं तो आवडीनं करत होता. मुंबई परिसरातल्या ज्यूंसाठी निघणाऱ्या ‘मक्काबी’ या मराठी मासिकात तो लिहिता झाला. मासिक फक्त ज्यूंसाठीचं; पण तरी ते मराठीतून निघत होतं. (तेव्हाची मुंबई ‘मराठी’ होती, हे यावरून लक्षात यावं.) जेरुसलेममध्ये गप्पा मारत असताना नोहानं मला सांगितलं होतं, ‘‘मुंबईत असताना मी शिवसेनेचा सभासद झालो होतो. बाळासाहेबांच्या भन्नाट सभा ऐकायला मला खूप आवडायंच.’’सन १९६७मध्ये इस्राईल आणि अरब राष्ट्रांमध्ये ‘सिक्स डे वॉर’ होऊन गेलं होतं. या युद्धानं जगभरच्या ज्यू मंडळींच्या धार्मिक अस्मिता फुलून आल्या. त्याचीच परिणती म्हणून २४ वर्षांच्या नोहानं १९७०मध्ये इस्राईल गाठलं. गाडी रुळाला लागल्यावर नोहाचा मूळचा सांस्कृतिक पिंड उफाळून आला. सन १९८१मध्ये नोहाची संपादकीय कारकीर्द सुरू झाली ती इस्राईलमधल्या ‘बातमी’ नावाच्या पहिल्या मराठी मासिकाच्या माध्यमातून. पहिल्याच संपादकीयात नोहाने लिहिले- ‘‘प्रत्येक सुशिक्षित माणसाला देशी-विदेशी घडामोडींबद्दल माहिती असणं आवश्यकं वाटतं. चारचौघात बसल्यावर अपुऱ्या माहितीअभावी माघार घ्यावी लागते. आपल्या व्यक्तिमत्त्वाची छाप न पाडता आल्यानं आपण मागासलेले गणले जातो. यावर उपाय म्हणजे हिब्रू भाषा शिकणं. पण, ते सर्वांनाच शक्य नाही. मराठी भाषेत बातम्या पुरविणारं एकही साधन नसल्यानं आम्ही कान असून बहिरे आणि डोळे असून आंधळे. कारण रेडिओ, टीव्हीवरील बातम्या ऐकूनही कळत नाहीत. पेपर (हिब्रू) समोर असून वाचू शकत नाही. त्यामुळे पेपरातल्या ठळक बातम्यांचे मराठीत भाषांतर करून ते प्रसिद्ध करणार आहोत.’’ महाराष्ट्रातून मोठ्या संख्येनं इस्राईलमध्ये स्थलांतरित होणाऱ्या प्रौढ-वृद्ध ज्यूंना हिब्रू भाषा येत नव्हती, त्यांची कोंडी दूर करण्याचा प्रयत्न ‘बातमी’नं केला. ‘हिब्रू मास्तर’ या सदरातून मराठीला पर्यायी हिब्रू शब्द दिले जाऊ लागले. साहजिकपणे इस्राईलमध्ये नव्याने रुजू पाहणाºया मराठी ज्यूंना ‘बातमी’ने मोठा भावनिक आधार दिला. 

पुढे असं झालं, की नुसत्या भाषांतरित बातम्यांनी इस्रायली मराठी ज्यूंची वैचारिक भूक भागेना. त्यांना स्वत:च्या कथा, कविता, अनुभव मराठीतून व्यक्त करायचे होते. त्या वेळी मुंबईतल्या कॉलेजात प्राचार्य म्हणून हयात घालवलेल्या फ्लोरा सॅम्युएल यांच्या पुढाकारानं समस्त ज्यू मंडळींनी नव्या मराठी मासिकाची मुहूर्तमेढ रोवली. त्याचं नाव ‘मायबोली’ ठरलं. हे नाव नोहानं सुचवलेलं होतं. वयानं, ज्ञानानं ज्येष्ठ म्हणून ‘मायबोली’चं संपादकपद फ्लोरा मॅडम यांच्याकडे सुपूर्त करण्यात आलं. पहिल्या वर्षाचा अपवाद वगळता ‘मायबोली’च्या संपादकपदाची धुरा सलगपणे नोहानं एकट्यानं आनंदानं सांभाळली आहे. नातवंडं-पतवंडं झाल्यानंतरही सासुरवाशिणीच्या मनात माहेराबद्दलचा हळवा कोपरा जपलेला असतो. इस्राईलमधल्या मराठी ज्यूंसाठी ‘मायबोली’ हा असाच हळवा कोपरा आहे. इस्राईलमधल्या मराठी भाषकांना गुंफून ठेवणारा धागा ‘मायबोली’ आहे. या मासिकानं इस्रायली मराठी ज्युना मराठी व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आहे. इस्राईलमध्ये १ मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा होतो. यानिमित्तानं नाटकं, एकपात्री प्रयोग, संगीत मैफल, व्याख्यान अशा भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन होतं. या दिवशी सगळ्यात मोठं आकर्षण कशाचं असतं, तर मराठमोळ्या शाकाहरी भोजनाचं. इस्राईलमध्ये स्थायिक झाले असले तरी तिथल्या मराठी ज्यूंना आजही पुण्या-मुंबईची ओढ कायम आहे. महाराष्ट्रात राहत असतानाच इथल्या मराठी कुटुंबांचा शेजार, जिव्हाळा याची याद त्यांना येते. दादर-गिरगावच्या चौपाटीवरच्या भेळ-पाणीपुरीच्या नुसत्या आठवणीनं त्यांच्या तोंडाला पाणी सुटतं. अळूची भाजी, बटाटेवडे, उकडीचे मोदक इथपासून ते कोंबडीवडे, मटण रस्सा, कोकणातली ताजी मासोळी अशा असंख्य मराठी चवी त्यांना आजही भुरळ पाडतात. प्रभादेवीचा सिद्धिविनायक आणि पंढरीचा विठोबा यांच्यावरची त्यांची श्रद्धा तसूभरही ढळलेली नाही. मराठी चित्रपट, नाटकं, कोळीगीतं, भावगीतांच्या सीडी, मराठी पुस्तकं त्यांच्या दिवाणखान्यांमध्ये आणि विशेष म्हणजे त्यांच्यावर धूळ चढलेली नसते. साठ-सत्तरच्या दशकात धर्माच्या ओढीनं, आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी शेकडो ज्यू कुटुंबं महाराष्ट्रातून इस्राईलला स्थलांतरित झाली. त्यांच्या मनात महाराष्ट्राबद्दलची आस्था आणि मराठी भाषा-संस्कृतीबद्दलचं प्रेम नैसर्गिक आहे; पण इस्राईलमध्येच लहानाची मोठी झालेली त्यांची मुलं, नातवंड मात्र आता हिब्रू-इंग्रजीमध्ये वावरतात. आई-वडिलांची किंवा आजी-आजोबांची घरातली मराठी त्यांना सवयीनं समजते. तोडकीमोडकी बोलताही येते; पण स्वाभाविकपणे घराबाहेर पाऊल पडलं, की मराठीचा संबंध संपतो. त्यामुळे इस्राईलमध्ये स्थायिक झालेल्या ज्यू मराठी घरांमधल्या पुढच्या पिढ्यांसाठी मराठी तितकी जवळची उरलेली नाही. या मराठी घरांमधल्या मुला-मुलींचे आयुष्याचे जोडीदारही फक्त मराठी नाहीत. कोणी पोलंडमधून आलेल्या ज्यू घरातील पोर कोणाची सून आहे, रशियातून आलेल्या ज्यू मुलगा कोणाचा जावई आहे. सगळी सरमिसळ झालेली आहे. वेगवेगळ्या देशांमधून इस्राईलमध्ये आलेल्यांशी झालेल्या सोयरिकीमुळे मिश्र संस्कृती जन्माला आलीय. या पद्धतीच्या सांस्कृतिक कोलाहालात मराठीशी नाळ टिकवून ठेवण्याची धडपड ‘मायबोली’च्या माध्यमातून नोहा आणि त्याचे सहकारी करत आहेत. पण, नव्या पिढीला मराठीबद्दलचे आकर्षण, अप्रूप असेलच असे नाही. आतापर्यंत मनापासून जपलेली मराठी भाषा आणि संस्कृती येत्या दोन-तीन दशकांत इस्राईलमध्ये नांदत असेल का? नोहा आणि त्याच्या वयाच्या अल्याड-पल्याडचे सगळेच साठी-सत्तरीच्या घरातले किंवा पुढचे सगळेच या प्रश्नावर मौनात जातात. नोहाच कशाला... पुण्या-मुंबईच्या, नाशिक-नगरच्या, सोलापूर-कोल्हापूरच्या आजी-आजोबांना तरी सांगता येईल का ‘मायबोली’चं भवितव्य? (लेखक पुणे आवृत्तीत सहायक संपादक आहेत.)

टॅग्स :PuneपुणेMaharashtra Sahitya Parishadमहाराष्ट्र साहित्य परिषदmarathiमराठीIsraelइस्रायल