शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
3
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
4
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
5
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
6
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
7
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
8
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
9
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
10
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
11
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
12
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
13
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
14
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
15
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
16
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
17
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
18
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
19
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
20
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  

हळदीची पेवं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2022 06:05 IST

जमिनीच्या पोटात चाळीस लाख पोती हळद साठवणारं सांगलीचं गुपित

ठळक मुद्देपेव कसं खोदतात? त्यात हळद कशी भरतात?

- श्रीनिवास नागे

मराठीत ‘पेव फुटणं’ हा वाक्यप्रचार कसा आला माहितेय? तर जमिनीखाली असलेली हळदीची पेवं फोडल्यावर त्यातून पिवळीधम्मक, घमघमाट सुटणारी हळकुंडं बाहेर पडायची. त्यावरूनच हा वाक्यप्रचार आला ! पण हे पेव म्हणजे काय..? तर पावसाळ्यात हळद साठविण्यासाठी जमिनीत कोठारं खणण्याची सुपीक कल्पना !

जमिनीखालचं हे कोठार किंवा पोकळी म्हणजेच ‘पेव’. त्यात वाळवलेली हळकुंडं भरून ठेवली जातात. अनुभव आणि निरीक्षणातून हे तंत्र शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वी शेतकऱ्यांनीच शोधलेलं.

हळकुंड स्वरूपातली हळद साठवण्याची ही पारंपरिक आणि किफायतशीर पद्धत. पेवांमध्ये हळद सुरक्षित राहते आणि फुगल्यामुळं तिचं वजनही काहीसं वाढतं. हळद तशी कीडनाशक, पण हळदीचं पीक अत्यंत नाजूक. हळकुंडं उघड्यावर ठेवल्यास पावसाळ्यात किडीची (डंख) लागण ठरलेली. हळकुंडाला ओलसरपणा लागला, तर ती आतून काळपट-लाल पडतात, त्यांचा दर्जा खालावतो. त्यामुळं ती जमिनीखालच्या उबदार पेवांत भरून ठेवली जातात.

सांगली शहराला खेटून असलेल्या हरिपूर, सांगलीवाडी परिसरात पहिल्यांदा हळकुंडं साठविण्यासाठी पेवं खोदली गेली. इथल्या जमिनीत पाच-सहा फुटांपर्यंत काळ्या मातीचा थर लागतो. त्याखाली ३० ते ७० फुटापर्यंत लाल किंवा चिकण किंवा माण माती. ती नदीतल्या गाळासारखी घट्ट. त्याखाली वाळू आणि काळा दगड. हरिपूर हे कृष्णा-वारणा नद्यांच्या संगमावरचं गाव. गावात नदीकाठालाच ही वैशिष्ट्यपूर्ण जमीन दिसते. या वैशिष्ट्यपूर्ण मातीमुळं हरिपूरला पेवांचं पेव फुटलं !

एका पेवात १५ ते २५ टन हळद बसते. मातीच्या टणकपणामुळं वरून गाड्या फिरल्या तरी ढासळत नाही.

ही पेवं भाड्यानं दिली जातात. खुणेसाठी पेवाचं तोंड बंद करताना मालकाच्या नावाची पाटी लावली जाते. पाटीवर पेवाचा क्रमांक, पेवाच्या आणि हळदीच्या मालकाचं नाव, हळकुंडांचं प्रमाण आणि त्यावर कर्ज काढलं असल्यास बँकेचं नाव लिहिलेलं. पाटीवरची माहिती तीन चिठ्ठ्यांवरही लिहिलेली. एक चिठ्ठी पेवाच्या झाकणाच्या आत, दुसरी हळदीच्या मालकाकडं, तर तिसरी बँकेकडं. कर्जतारण म्हणून पेव !

सत्तरच्या दशकापर्यंत हरिपुरात आठशेवर पेवं होती. नंतर ती दोन हजारांवर गेली. २००४ पर्यंत साडेचार-पाच हजार पेवं झाली. त्यात चाळीस लाख पोती हळद मावायची. पण कृष्णा नदीला २००५ मध्ये आलेल्या महापुरानं पेवांना दणका बसला. त्या महापुरात पेवांच्या तोंडातून पाणी आत गेलं आणि ती आतून ढासळली. कायमची खराब झाली. मालकांनी ती बुजवली. कशीबशी दीडेक हजार शिल्लक राहिली. हळद साठवण्याच्या पारंपरिक व्यवस्थेला खीळ बसली. हळूहळू पेवांचा वापर कमी झाला.

२०१९ मधल्या महापुरानंतर तर पेवं संपुष्टातच आली. ती बुजवून त्यावर घरं बांधली गेली.

----------------------------

पेव कसं खोदतात? त्यात हळद कशी भरतात?

1. पेव खोदताना काळ्या मातीच्या थरापर्यंत विटा रचून घेतात.

2. पेवाचं तोंड सुरू होतं लाल मातीच्या थरापासून. तिथं सुरुवातीला आढी असते. त्यावर फाकण म्हणून फरशी बसवायची सोय.

3. लाल मातीच्या थरात २५ ते ३० फुटांपर्यंत खोल आणि पंधरा फूट रुंदीचा लंबगोलाकार आकाराचा खड्डा खोदला जातो. या मातीच्या टणक-घट्टपणामुळं पेवात पाणी व हवा यांचा शिरकाव अशक्य.

4. पेवात हळद हवाबंद राहायची सोय. पेव तळाच्या भागात रुंद, तर तोंडाकडं निमुळतं म्हणजे चंबूसारखं असतं. तोंड तीन फूट व्यासाचं.

5. आतली बाजू शेणानं सारवलेली. कडेला उसाचा पाला, गवताच्या पेंड्या, तर तळाला शेणाच्या सुक्या गोवऱ्या लावायच्या. त्यामुळं आत एकदम उबदार.

6. पेवात सुटी हळकुंडं ओतली जातात. ते भरलं की, गवताच्या पेंड्या टाकून तोंडवर फरशी बसवून ते मातीने लिंपायचं.

7. वरच्या चार-पाच फुटांपर्यंतच्या खड्ड्यात काळी माती भरायची. हा थर सच्छिद्र. वरून जमीन तापल्यानं पेवातली हवा हळूहळू गरम होऊन बाहेर पडते. मग काही तासांनी पेव हवाबंद करायचं.

8. आत ऑक्सिजन नसल्यामुळं कीडामुंगी तयार होत नाही. त्यातली हळद पाच-दहा वर्षांपर्यंत सुरक्षित राहते. कोरडेपणा आणि ऊब यामुळं हळदीला हवा तसा रंग मिळतो.

9. पेवातून हळद काढताना वा भरताना एक-दोन दिवस तोंड उघडून ठेवायचं. त्यामुळं आत साठलेली हळदीची दूषित हवा निघून जाते.

10. ती हवा गेली की नाही हे पाहण्यासाठी आत कंदील सोडायचा. कंदील पेटता राहिला तर आलबेल ! मग त्यात हमालांना उतरवायचं.

(वृत्तसंपादक, लोकमत, सांगली)

(छायाचित्रे : नंदकिशोर वाघमारे)