चक्रावून टाकणार्‍या सत्तानाट्यातला ईक्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2019 06:00 AM2019-12-01T06:00:05+5:302019-12-01T06:05:02+5:30

राजकारण भावनाशून्य असते असे म्हणतात. पण महाराष्ट्रातल्या ताज्या सत्तानाट्यात खरे उद्रेक घडवले ते अनावर भावनांनीच ! उद्धव ठाकरेंची चीड, अजित पवारांचा राग, प्रतिभाकाकींच्या मायेचे बंध आणि स्वर्गवासी पित्याला दिलेल्या वचनाची ताकद यानेच तर सत्तेच्या रसायनातून एक नवे  राजकीय गणित आकाराला आले आहे !!!

Emotional Quotient in the newly formed Maharashtra Government.. | चक्रावून टाकणार्‍या सत्तानाट्यातला ईक्यू 

चक्रावून टाकणार्‍या सत्तानाट्यातला ईक्यू 

Next
ठळक मुद्देराजकारणात भावनेला स्थान नसते. अशक्याला शक्य करून दाखवण्याचा भावनाशून्य खेळ म्हणजे राजकारण, असे म्हणतात ! पण महाराष्ट्रात गेल्या महिन्याभरात अशक्याचे जे शक्य केले गेले, त्याला पडद्यामागे एक भावनिक किनार होती.

- अतुल कुलकर्णी

मायक्रोसॉफ्ट या बलाढय़ कंपनीत काम करणार्‍या ज्येष्ठ अधिकार्‍यांचे स्वत:चे सवतेसुभे तयार झाले होते. त्यातून कंपनी हितापेक्षा स्वहीत वाढीस लागले होते. मायक्रोसॉफ्टच्या तत्कालीन अवस्थेचे वर्णन करताना कंपनीच्या वरिष्ठ लोकांनी एकमेकांच्या विरोधात बंदुका रोखल्याचे एक काटरूनही प्रसिद्ध झाले होते. ते पाहून या बलाढय़ कंपनीचे सीईओ झालेले भारतीय वंशाचे सत्या नाडेला यांनी हे सगळे सुभे मोडीत कसे काढले, ज्येष्ठांचा मान ठेवत नव्यांना संधीची दारे कशी उघडली गेली याची अप्रतिम कथा ‘हिट रिफ्रेश’ या पुस्तकात लिहिली आहे. पुस्तकाच्या प्रस्तावनेत बिल गेट्स यांनी या नावाचा अर्थ वेगळ्या पद्धतीने मांडला आहे. कॉम्प्युटरवर जेव्हा आपण रिफ्रेशचे बटन दाबतो तेव्हा मागचे काहीही न पुसता आपण नवीन काही करायला घेतो, असा उल्लेख त्या प्रस्तावनेत गेट्स यांनी केला आहे. या पुस्तकात सत्या नाडेला यांनी ‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स’च्या दिशेने वेगवान प्रगती करताना एकूण वर्तन-व्यवहाराचा मानवी चेहरा, भावभावना वगळून किंवा त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, हे भावनिक अंग वगळले तर प्रगतीलाच अर्थ उरणार नाही’ - अशी भूमिका घेतली आहे. हे सगळे आज आठवण्याचे कारण म्हणजे महाराष्ट्रातील ताजे राजकारण.
शरद पवार यांनी स्वपक्षात एकमेकांविरुद्ध उभे राहिलेल्यांसाठी रिफ्रेशचे बटन दाबले. त्यासाठीच्या राजकीय खेळीकरता पवारांनी जे आर्टिफिशियल इंटिलिजन्स वापरले, त्याला मानवी चेहरा देताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वत:ला खोटे ठरवले गेल्याच्या रागातून बळकटी मिळालेल्या ‘इमोशनल कोशंट’चा (भावनांक) पुरेपूर वापर केला. या नाट्याची सुरुवात आणि शेवट हा सगळा प्रवास आयक्यू (बुद्धय़ांक) आणि ईक्यू (भावनांक) या दोन्हींची सांगड घालत झाला आणि राज्यात नवे समीकरण जन्माला आले.
राजकारणात भावनेला स्थान नसते. अशक्याला शक्य करून दाखवण्याचा भावनाशून्य खेळ म्हणजे राजकारण, असे म्हणतात ! पण महाराष्ट्रात गेल्या महिन्याभरात अशक्याचे जे शक्य केले गेले, त्याला पडद्यामागे एक भावनिक किनार होती.
शरद पवार यांना ईडीची नोटीस पाठवली जाणे, त्या नोटिशीला त्यांनी थेट तोंड देणे, त्यातून अचानक वारे पवारांच्या बाजूने फिरणे या सगळ्यातून उठलेल्या भावनिक उद्रेकाचा कळस गाठला तो पवारांच्या भरपावसातल्या भाषणाने ! पुढे उद्धव ठाकरे यांनी खोटे ठरवले जात असल्याची चीड व्यक्त केलीच; वरून ‘राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवून दाखवेन’, असा आपण बाळासाहेबांना शब्द दिला होता याचीही (भावनिक) आठवण करून दिली.. आणि सुरू झाला अशक्य ते शक्य करून दाखवण्याचा नवा खेळ !
या खेळाची सगळी सूत्रे शरद पवार यांनी हाती घेतली होती. पवारांनी आजपर्यंत कधीही भावनेचे राजकारण केलेले नाही. पण त्यांच्या जोडीला आलेला शिवसेना हा तर भावनेच्या हिंदोळ्यावरच झुलणारा पक्ष. या दोघांच्या एकत्र येण्याने अनेक गोष्टी सुरू झाल्या. कौटुंबिक बंधांच्या जुन्या आठवणी निघाल्या. सुप्रिया सुळे पहिल्यांदा निवडणुकीस उभ्या होत्या तेव्हा बाळासाहेबांनी स्वत: शरद पवार यांना फोन केला, आपली मुलगी निवडणूक लढवत आहे तर तिच्या विरोधात मी उमेदवार देणार नाही, अशी भूमिका त्यांनी जाहीर केली. त्यामुळे सुप्रिया बिनविरोध निवडून आल्या होत्या - ही आठवण स्वत: उद्धव ठाकरे यांनी तिन्ही पक्षांच्या बैठकीत सांगितली.. मग शरद पवारांनीही जुने मैत्र जागवले. ‘बाळासाहेब आणि मी एकमेकांविरुद्ध बोलताना सगळे शब्द वापरायचो; पण सायंकाळी मातोर्शीवर गेलो की मीनाताई मला माझ्या आवडीचे पदार्थ करून खायला द्यायच्या’, असे सांगत पवारांनी आपल्या मनाचे कप्पे उघडले.. ‘तीस वर्षे ज्यांच्यासोबत मैत्री केली त्यांनी माझ्यावर खोटेपणाचा आरोप केला तेव्हा माझ्या मनाला असंख्य इंगळ्या डसल्या; पण तीस वर्षे ज्यांच्याविरुद्ध लढलो त्यांनी मात्र माझ्या नेतृत्वावर विश्वास टाकला’, या शब्दात उद्धव ठाकरेंनीही मन मोकळे केले.
भावभावनांचा हा खेळ चालू असतानाच्या काळात अजित पवार यांचे बंडही घडले होते. अजितदादा एक वेगळेच भावनिक रसायन आहे. (स्वतंत्र चौकट पाहा) त्या बंडानंतर सुप्रिया सुळे यांच्या डोळ्यात पाणी येणे, ‘काहीही कर; पण दादा परत ये’ असे सांगणे, ‘राजकारण होत राहील; पण घर तुटू देऊ नकोस’, असे भावनिक आवाहन करणे.. हे सारे घडले. शेवटी सदानंद सुळे आणि अजितदादांना आईच्या मायेने वाढवणार्‍या प्रतिभाकाकी स्वत: दादांच्या भेटीला गेल्या.. अजित पवार यांना नात्यांच्या बंधनांनी खेचून परत आणले. तेथून ते तडक मुख्यमंत्र्यांकडे गेले आणि उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन परत स्वगृही आले.
- ही भावनिक लढाई जिंकली गेल्यावर राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला. अधिवेशन बोलावले गेले. तेथे सुप्रिया सुळे स्वघरचे लग्न कार्य असल्यासारख्या दारात सगळ्यांच्या स्वागताला उभ्या राहिल्या. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन झाल्यावर शिवाजी पार्कात जमलेल्या हजारोंपुढे नतमस्तक होऊन दंडवत घालत उद्धव ठाकरे यांनी या भावना-नाट्यावर कळस चढवला. छगन भुजबळ यांची मागची तीन वर्षे जवळपास आर्थर रोड जेलमध्ये गेलेली. त्यांना थेट मंत्रिपद दिल्यानंतर त्यांच्या मनाची अवस्थासुद्धा भावनेचा परमोच्च बिंदूवर होती. 
.. अर्थात, अशा भावभावनांच्या हिंदोळ्यावर हेलकावे खात जरी हे सरकार अधिकारावर आले असले तरी भावनेचा भर ओसरल्यावर जेव्हा हे सरकार व्यवहार्य निर्णय घ्यायला लागेल तेव्हा त्याचा खरा कस लागेल. 
या सगळ्या चित्रात असूनही जवळ जवळ नसलेल्या कॉँग्रेसची अवस्था ना धड विचाराने बळकट, ना भावनांच्या बंधांनी घट्ट अशी वार्‍यावरची आहे ! ध्यानीमनी नसताना या पक्षाच्या वाट्याला सत्ता आली. विशेष कसलेही प्रयत्न न करता, स्वत:ला राज्याचे नेते समजणारे सगळे नेते आपापल्या मतदारसंघात अडकलेले असताना, दिल्लीतून कोणी बडे नेते न फिरकता, फारशी आर्थिक मदत न मिळता राज्यात काँग्रेसचे 44 आमदार निवडून आले !  (अर्थात या 44 मध्ये शरद पवारांचा रोल किती हा मतदारसंघनिहाय वेगळ्या विश्लेषणाचा विषय) देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी आणि संघ मुख्यालय असलेल्या नागपूर जिल्ह्यात भाजपला काँग्रेसने धक्के दिले. याचा अर्थ लोकांच्या मनात आजही काँग्रेस कायम आहे, असाच होतो! पण या पक्षाच्या नेत्यांच्या मनातली काँग्रेस संपून त्याची जागा किती टोकाच्या मीपणाने घेतली आहे, हे महाआघाडीच्या सत्तास्थापनेतून समोर आले. मंत्रिपदासाठी भांडणे, लॉबिंग आणि एक-दुसर्‍यावरचा टोकाचा अविश्वास ही जणू या पक्षाला मिळालेली विरासत असावी असे सगळे वागताना दिसत होते. त्यात हा पक्ष येत्या काळात कोणत्या एका नेत्यावर विश्वास ठेवून काम करेल, असे चित्र नाही. सगळेच नेते झालेले, त्यामुळे काँग्रेसकडे तरुण वर्ग येण्यास तयार नाही. पक्षात केडर तयार करण्याची वृत्ती संपून गेली.. सेवादल, एनएसयूआय अशा फळ्या मोडकळीस आल्या; तरीही वरिष्ठ नेते छोट्या छोट्या निर्णयासाठी अजूनही दिल्लीकडे बोट दाखवतात. एकमेकांशी ओलावा नाही, परस्परांमध्ये भावनिक बंध उरलेले दिसत नाहीत, सगळे मिळून काही तरी नवे घडवू या, असे म्हणणारा एकही नेता या पक्षाकडे राज्यात उरलेला नाही. राष्ट्रवादीसोबत फरफटत गेलेल्या काँग्रेस पक्षाची भावनिक ताकद कधीची क्षीण होऊन गेलेली आहे.
ज्येष्ठांचे सवतेसुभे मोडीत काढून तरुणांना बळ-हिंमत-प्रेरणा देणारा आणि जुना कंटाळवाणा तवंग निपटून ‘हीट रिफ्रेश’चा धक्का देणारा कुणी एक सत्या नाडेला जर फार तातडीने कुणाला हवा असेल, तर तो कॉँग्रेस पक्षाला हवाय.!
- बाकी तिघांचे भावनिक नाट्य आता पुढले अंक कोणते दाखवते, ते पाहायचे!

आयक्यू आणि थोरले पवार
या भावना नाट्यात अपवाद आहे तो एकच : शरद पवार ! त्यांनी कधीही भावनेचे प्रदर्शन करत राजकारण केलेले नाही. याहीवेळी त्यांनी सगळी स्टोरी स्वत: लिहिली, दिग्दर्शितही केली. महाराष्ट्रात भाजपला वगळून सरकार बनू शकते हे त्यांनी दाखवून दिले. देशभरात भाजपेतर पक्षांना एकत्र आणण्याचा पक्का मनसुबाही त्यामागे असल्याचे स्पष्ट केले.
राज्यात तीन दिशांच्या तीन पक्षांना एकत्र बांधण्याचे काम केले ते पवारांनी ! पण उद्या जर हे बंध सुटले, तिघांमध्ये खटके उडू लागले तर हे सरकार कोसळू शकते. त्यावेळी हेच शरद पवार म्हणू शकतील की, ‘मी सरकार बनवण्यासाठी प्रामाणिक प्रय} केले होते. तरीही हे सरकार चालू शकले नाही. यांच्या पोरकट राजकारणामुळे महाराष्ट्राचे नुकसान होत असेल आणि राज्याला स्थिर सरकार मिळणार नसेल तर माझ्याजवळ भाजपसोबत जाण्याशिवाय पर्याय नाही !’
- ही भूमिका शरद पवारांनी किंवा राष्ट्रवादी काँग्रेसने भविष्यात घेतली तर कोणालाही आश्चर्य वाटू नये. कारण या सगळ्या प्रवासात देवेंद्र फडणवीस यांनी कुठेही राष्ट्रवादी किंवा अजित पवार यांच्या विरोधात एकही शब्द काढलेला नाही.

भावनांचे उद्रेक आणि धाकले पवार
अजित पवार यांचे हे काही पहिले बंड नव्हते. भावनेच्या भरात त्यांनी अनेकदा असे निर्णय घेतले. एका क्षणात ते सगळं काही सोडून निघून गेल्याच्या अनेक घटना आहेत. मनाविरुद्ध घडले की अदृश्य होणे, मौनात जाणे, असे प्रकार त्यांनी अनेकदा केले. त्याचा पक्षाला, पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांना आणि अजित पवार यांनादेखील त्रासच झाला आहे. 
1) छगन भुजबळ यांना उपमुख्यमंत्री करण्याच्या निर्णयाविरोधात अजित दादांनी बंड केले होते. दोन दिवस नाराज होऊन बाहेर निघून गेले. पक्षात सह्यांची मोहीम झाल्यावर अखेर परत आले.
2) उपमुख्यमंत्री असताना त्यांनी सगळ्या आमदारांना एकत्र करून मी पक्षाचा नेता, अशी भूमिका घेतली. शरद पवार दिल्लीत होते. त्यांनी तातडीने मुंबई गाठून ते बंड शांत केले होते.
3) सिंचन घोटाळ्याच्या वेळी तडकाफडकी, कोणालाही न कळू देता राजीनामा दिला. चौकशी झाल्याशिवाय परत येणार नाही असे सांगून निघून गेले. नंतर श्वेतपत्रिका आली आणि त्यांनी पुन्हा उपमुख्यमंत्री म्हणून काम पहायला सुरुवात केली.
4) उपमुख्यमंत्री असताना धरणातल्या पाण्याबाबत अजित पवारांच्या वादग्रस्त विधानावरून जनक्षोभ उसळला. नंतर पापक्षालनासाठी त्यांनी प्रीतीसंगम गाठले. त्या विधानाबद्दल त्यांना सतत पश्चाताप होत असल्याचे दिसले.
5) ईडीच्या नोटिशीला जबाब देण्यासाठी आपण स्वत: ईडीच्या कार्यालयात जाणार असे जाहीर करताच शरद पवारांची लोकप्रियता शिगेला पोहोचली; नेमका तोच मुहूर्त साधून अजित पवार आमदारकीचा राजीनामा देऊन अज्ञातवासात गेले. परत आले तेव्हा एकूणच राजकारणाबद्दल त्यांना आलेला कमालीचा उद्वेग आणि वैषम्य अवघ्या महाराष्ट्राने पाहिले. 
6) महाविकास आघाडीचे सरकार बनवण्याच्या हालचाली सुरू असताना अचानक बैठक सोडून रागातच घराबाहेर पडले. मीटिंग रद्द झाली, मी बारामतीला चाललो असे म्हणत ते निघाले. पुन्हा पडद्याआड हालचाली झाल्या आणि ते आघाडीच्या बैठकीसाठी परतले.
7) आघाडीची बैठक अंतिम टप्प्यात आलेली असताना ते पुन्हा बंड करून भाजपकडे गेले. त्यांना भाजपच्या तंबूतून परत आणण्यासाठी मोठे कौटुंबिक नाट्य घडले.
.. या सगळ्या घटना घडल्यानंतर जणू काही घडलेच नाही, अशा पद्धतीने वावरणारे अजित पवार पुन्हा सगळ्यात मिसळत गेले, तेवढेच प्रेम, राग आणि आपुलकी पक्षातल्या नेत्यांविषयी, पत्रकारांविषयी दाखवत राहिले !
atul.kulkarni@lokmat.com
 (लेखक  ‘लोकमत’चे वरिष्ठ सहायक संपादक  आहेत)

Web Title: Emotional Quotient in the newly formed Maharashtra Government..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.