शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

‘केवळ शब्दांनी रुग्णांना बरे करणारा धन्वंतरी‘!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 06:05 IST

डॉ. ह. वि. सरदेसाई. आधाराच्या केवळ शब्दांनीच रुग्णाला बरे वाटायला लावणारे डॉक्टर अशी त्यांची ख्याती होती. डॉक्टरी क्षेत्रात त्यांनी अनेक मैलाचे दगड आखून दिले. ‘डॉक्टर’ आणि ‘रुग्ण’ कसा असावा, हे त्यांनी स्वत:च्या उदाहरणातून दाखवून दिले. त्यांच्या पहिल्या स्मृती दिनानिमित्त..

ठळक मुद्देचांगला डाॅक्टर हा उत्तम ऐकणारा असतो. सहसा उत्तम बोलणाऱ्यांमधे या गुणाचा अपवाद असतो. कदाचित स्वत:च्या आवाजाच्या प्रेमात पडल्यामुळं असं घडत असावं. सरदेसाईसर मात्र याला अपवाद होते.

- डाॅ. चंद्रशेखर फणसळकर

डॉ. ह. वि. सरदेसाई.  सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील व्यक्तींसाठी आधारवड असा लौकिक असणारे, आधाराच्या केवळ दोन शब्दांनी रुग्णाला दिलासा देणारे आणि सतत हसतमुख असणारे निष्णात वैद्यकीय तज्ज्ञ. त्यांच्याशी फक्त बोलून आणि भेटूनच आमचे आजार बरे होतात, असेही असंख्य रुग्णांचे अनुभव आहेत.सरांना जाऊन आता एक वर्ष झालं.

हे पूर्ण वर्षच आपल्या सर्वांना एका विलक्षण, अभूतपूर्व अशा अवस्थेत जगावं लागलं. निसर्गाने माणसाला मारलेल्या जोरकस थपडेनं त्याच्या कारभाराबरोबर त्याचा अहंकारही पार विस्कटून टाकला.‘सर्वशक्तिमान’ ‘सर्वश्रेष्ठ’ असा माणूस एका य:कश्चित विषाणूच्या अकस्मात हल्ल्यानं गांगरुन भेदरून गेला. त्याच्या पायाखालची जमीनच नव्हे तर त्याचं संपूर्ण आयुष्यच या धक्क्यानं अस्थिर झालं.

ही आपत्ती थेट माणसाच्या आरोग्याशी निगडित असल्यानं साहजिकच सर्वात मोठं आव्हान तिनं वैद्यक शास्त्राच्या पुढ्यात फेकलं. जगभरच्या डाॅक्टर जमातीचा कस पाहणारी परिस्थिती निर्माण झाली. या काळात मला स्वत:ला सरांची प्रकर्षांनं आठवण होत राहिली; त्यांचं नसणं खुपत,डाचत राहिलं. ते जर या काळात असते तर खूप उपयोग झाला असता असं वाटत राहिलं.

आयुष्याचा पाया डगमगायला लागावा, कशाचीच संगती न लागावी अशी अनिश्चितता निर्माण करणाऱ्या कुठल्याही काळात एखाद्या आधारवडासारखं विशाल आणि आश्वासक व्यक्तिमत्त्व असणाऱ्या सरांसारख्या व्यक्तीची उणीव सर्वांनाच भासते. मला तर त्यांचा जवळून सहवास लाभलेला. त्यांच्याकडून कितीतरी शिकायला मिळालेलं. अर्थातच त्यांच्या आठवणी या कठीण काळात पावलोपावली येत राहिल्या...

...‘डाॅक्टरला भेटूनच अर्धा बरा झालो!’ हे वाक्य आजकालचे डाॅक्टर-रूग्ण संबंध पाहता काहीसं अतिशयोक्तीपूर्ण वाटू लागलं आहे. दवाखान्यात जायचं म्हटलं की सहसा माणसाच्या अंगावर काटा येतो. डाॅक्टरच्या रूममधे प्रवेश करताना आपण वाघाच्या पिंजऱ्यात जात आहोत अशीच भावना पेशंटच्या मनात येत असते.

याचं कारण बहुतेक वेळा पेशंटशी संवाद न साधणारे डाॅक्टर्स हे असतं. यातील अनेकांकडे ज्ञान विपुल असलं तरी आस्था-जिव्हाळ्याच्या ओलाव्याअभावी ही डाॅक्टर मंडळी विशाल पात्राच्या कोरड्या नद्यांसारखी भासतात. रूग्णांना आजारापेक्षाही अधिक भीती अशा डाॅक्टरांची वाटते.

‘रुग्णाशी आस्थापूर्वक संवाद’ हा विषय वैद्यकशास्त्राच्या कुठल्याही ‘सिलॅबस’मधे नाही! पेशंटमध्ये विश्वास निर्माण करणारं आश्वासक व्यक्तिमत्त्व घडणं हे एका डाॅक्टरसाठी वैद्यक-ज्ञान संपादन करण्याइतकंच आवश्यक असलं तरी ते वैद्यकीय विद्यालयांच्या वर्गांतून, तेथील क्रमिक पुस्तकातून कधीच घडत नाही. त्यासाठी एका सुयोग्य गुरूचा सहवास लाभणं गरजेचं असतं. सरदेसाई सरांच्या रूपानं त्यांचे अनेक विद्यार्थी आणि नंतर कमी-अधिक काळ त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळालेल्या सर्व डाॅक्टर्सना तो लाभला. मीही त्यातलाच एक. पुस्तकांनी मला पदवी दिली, ‘डाॅक्टर’ मात्र मी सरांच्या छायेत,त्यांच्याकडे शिकून झालो.

चांगला डाॅक्टर होण्यासाठी वैद्यकीय विषयांच्या ज्ञानाखेरीज इतर अनेक गोष्टी शिकणं आवश्यक असतं. त्यातली एक अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे येणाऱ्या रुग्णाची प्रतिष्ठा आणि आत्मसन्मान जपणं. आपल्याकडे येणाऱ्या रूग्णाला कधीही लाचारी वाटू नये, स्वत:च्या आजाराची लाज वाटू नये; त्याच्या आजाराच्या वेदनेत अपराधीपणाच्या पीडेची भर पडू नये याची काळजी एका डाॅक्टरनं सतत घेतली पाहिजे.

सर अशा प्रकारचे डाॅक्टर होते. पेशंटच्या मनात डाॅक्टरविषयी प्रेमयुक्त आदर आणि विश्वास निर्माण करत उपचार केल्यास त्याचे केवळ शरीरच बरे होत नाही तर मनही तरतरीत होते हे सरांच्या पेशंटसकडे पाहून लगेच कळायचं. त्यांना भेटायला येणारी मंडळी दवाखान्यात आली नसून एखाद्या देवळात आली आहेत असं वाटायचं. डाॅक्टर सरदेसाईंना भेटायला मिळणार याबद्दलची उत्कंठा आणि आनंद त्यांच्या (आजारी) चेहऱ्यावर सुद्धा ओसंडत असायचा!

चांगला डाॅक्टर हा उत्तम ऐकणारा असतो. सहसा उत्तम बोलणाऱ्यांमधे या गुणाचा अपवाद असतो. कदाचित स्वत:च्या आवाजाच्या प्रेमात पडल्यामुळं असं घडत असावं. सर मात्र याला अपवाद होते. पेशंट बोलत असताना अत्यंत एकाग्रतेनं व संयमानं ते त्याचा शब्द न् शब्द कानांनी टिपून घेत असत. त्यांना मी कधीही रागावलेलं, चिडलेलं, संतापलेलं पाहिलं नाही. अगदी वेडगळ आणि निरर्थक वाटतील असे प्रश्न जरी समोरचा पेशंट विचारत असेल तरी चेहऱ्यावर स्मित ठेवून त्याच्या प्रत्येक प्रश्नाचं सर उत्तर देत असत. पेशंटबद्दलच्या छोट्या छोट्या गोष्टीही त्यांच्या लक्षात राहात याचं मला आश्चर्य वाटायचं. पण या स्मरणशक्तीचं मूळ हे बारकाईनं व संयमानं ऐकण्यात आहे हे त्यांच्याबरोबर काम करत राहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं.

सरांच्या स्वत:च्या आयुष्यातही, विशेषत: शेवटी शेवटी, प्रकृतीवर मोठी गंडांतरं येत राहिली. गंभीर,वैद्यकशास्त्रास आजच्या मितीलाही पूर्णत: न उमगलेले आजार त्यांच्या वाट्याला आले. अशा परिस्थितीत कुठल्याही व्यक्तीनं धीर सोडला असता, पण या काळात सरांना मी एक क्षणही खचलेलं पाहिलं नाही. उलट याही काळात त्यांची मनस्थिती एरवी असायची तितकी व तशीच प्रसन्न असायची. स्वत:च्या आजाराविषयी ते अशाप्रकारे बोलत की वाटावं हे दुसऱ्याबद्दलच बोलतायत! या काळात त्यांच्याविषयी आणखी एक ठळकपणे जाणवलेली गोष्ट म्हणजे उपचार करणाऱ्या डाॅक्टरांवर त्यांनी टाकलेला संपूर्ण विश्वास. स्वत: ज्ञानानं आणि अनुभवानं ज्येष्ठ असूनही त्यांनी एकदाही या डाॅक्टरांचे उपचार,सल्ले व निर्णय यांत ढवळाढवळ केली नाही वा त्यांना विरोध केला नाही.’डाॅक्टर कसा असावा?’ असं विचारलं गेल्यास सरांच्या दिशेनं अनेक बोटं उचलली जातील यात नवल नाही. पण ‘रूग्ण कसा असावा?’ असं मला कुणी विचारलं तर मी क्षणाचाही विचार न करता सरांकडं बोट दाखवेन. सरांची स्वत:च्या व्याधींबरोबरची झुंजदेखील अनेक रुग्णांना त्यांच्या स्वत:च्या आजाराशी लढायला स्फूर्तिदायक होईल अशी होती.

 

‘संवाद घडण्यामधे सर्वात मोठी अडचण असते ती तो घडलेलाच आहे असा नेहमी होणारा भ्रम’ असं जाॅर्ज बर्नाड शाॅ म्हणाला होता. आधुनिक तंत्रज्ञान माणसाला पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधून काढण्यास समर्थ आहे असं मानणाऱ्यांच्या या युगात शाॅच्या या शब्दांतील सत्यता मला प्रखरपणे जाणवते. विशेषत: सध्याच्या वैद्यक-व्यवसायाची स्थिती पाहून अधिकच. तंत्रज्ञानाच्या अतिरेकी मागे लागून रुग्णाशी संवाद साधायला विसरण्याची चूक आम्हा डाॅक्टरांकडून अनेकदा होते. त्यामुळे शीड फाटलेल्या बोटीसारखे आम्ही या व्यवसायात भरकटतो. अशा वेळी योग्य दिशा दाखवणाऱ्या दीपस्तंभासारखे सरदेसाई सरांसारखे गुरू भेटणं हे दैवात असलं तर किनाऱ्यापर्यंत सुखरूप पोहोचता येतं हे नक्की.

 

मला त्यांचा सहवास मिळाला आणि ‘नोबल’ मानल्या गेलेल्या या पेशातील खऱ्याखुऱ्या ‘नोबल’ तत्वाचा स्पर्श होऊन गेल्यासारखं वाटलं. त्या स्पर्शाने कायम प्रेरित राहून काम करता येणं हीच त्यांना गुरूदक्षिणा होईल.