शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
3
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
4
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
5
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
8
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
9
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
10
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
11
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
12
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

अवनी वाघिनीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 18:05 IST

देशातील वाघांचे प्रमाण टिकविण्यासाठी ‘वाघ वाचवा’ मोहीम राबविणारे शासन आणि लोकांचा जीव वाचविण्यासाठी वाघालाच मारणारे शासन... दोन्हीवेळी धारेवर धरले गेले ते शासनालाच. अवनी वाघिणीच्या मृत्यूनंतरही गदारोळ सुरूच आहे...

ठळक मुद्देअवनी वाघिणीला ठार करण्यात आले. ही खबर गावकऱ्यांसाठी जीवनदायी; पण वन्यजीवप्रेमींसाठी हळहळ व्यक्त करणारी ठरली.

अविनाश साबापुरे‘जवरिक आमचे नातलग मरून राह्यले होते, तवरिक आमच्या बोंबलन्याले कोणी कवडीचा भाव नाई देल्ला. अन् आता थे वाघीण मारली तं एवढं चिल्लावाले काय झालं राजेहो...’ नरभक्षक वाघिणीच्या शिकारीनंतरची चर्चा ऐकून चिडलेल्या गावकऱ्यांच्या मनातली ही सणक आहे. मृत्यू हा वाईटच असतो, तो माणसाचा असो नाहीतर प्राण्याचा. ज्याच्या मरणाची चर्चा व्यापक प्रमाणात होते, त्याच्या जगण्याचे संदर्भ लक्षात घ्यावे लागतात. त्याचे जगणे इतिहास बनतो. इतिहास भलाही असतो अन् बुराही असतो. राळेगाव, पांढरकवडा आणि कळंब या तीन तालुक्यांतील खेडूत गावकऱ्यांसाठी अवनी वाघिण दु:खद इतिहास बनला आहे. तो जेवढा उगाळला जाईल, तेवढीच गावकऱ्यांची ठणक वाढणार आहे.यवतमाळ जिल्ह्यात दोन वर्षांपासून वाघिणीने धुमाकूळ घातला होता. ‘अवनी’चे नामाभिधान मिळालेल्या या वाघिणीमुळे २५-३० गावांचे शिवार अक्षरश: रक्ताळले होते. १३पेक्षा जादा माणसे त्याहून दुप्पट गायीढोरं वाघिणीचे शिकार झाले. त्यांचे ओरबाडलेले देह पाहणाऱ्या गावकऱ्यांना वाघिणीच्या पाऊलखुणाही भयावह वाटू लागल्या होत्या.झोटिंगधरा गावात वाघिणीने माणूस मारल्यावर भयग्रस्त गावकऱ्यांनी एसडीओंचे शासकीय वाहन पेटवून आपल्या संतापाला वाट करून दिली. त्यानंतर प्रशासन आणि शासन हलले. २००पेक्षा जादा कर्मचारी जंगलात फिरवून ‘मिशन टी-१’ गतिमान करण्यात आले. तेव्हापासून जंगलात दडलेली वाघीण देशभरातील माध्यमांमधून वारंवार झळकू लागली.‘मिशन टी-१’मधील ताफ्यावर चोहोबाजूंनी ‘प्रेशर’ होते. वाघाला पकडण्याचे, बेशुद्ध करण्याचे, ठार मारण्याचे नियम पाळत पुढे आलेल्या वाघिणीला कसे ‘फेस’ करावे हा प्रश्न होता. वन्यजीवप्रेमींची नजर, गावकऱ्यांची आस अन् माध्यमांचा कटाक्ष ही सगळी कसरत पेलत असतानाच शुक्रवारी रात्री वाघिणीला ठार करण्यात आले. ही खबर गावकऱ्यांसाठी जीवनदायी; पण वन्यजीवप्रेमींसाठी हळहळ व्यक्त करणारी ठरली.पांढरकवडा, कळंब आणि राळेगाव या वाघग्रस्त तालुक्यातील खेड्यापाड्यांमध्ये अक्षरश: पेढे वाटण्यात आले. त्याचवेळी वन्यजीवप्रेमींनी सोशल मीडियातून वनविभागाला संशयाच्या शिखरावर उभे केले. वाघिणीला बेशुद्ध करून पकडणे शक्य असतानाही तिला मारण्यातच आले, हा आक्षेप घेण्यात आला. केंद्रीय मंत्री आणि नामवंत वन्यजीवप्रेमी मनेका गांधी यांनीही संताप व्यक्त केला. देशातील वाघांचे प्रमाण टिकविण्यासाठी ‘वाघ वाचवा’ ही मोहीम राबविणारे शासन आणि लोकांचा जीव वाचविण्यासाठी वाघालाच मारणारे शासन... अशा दुहेरी संरक्षकाच्या भूमिकेतल्या शासनाला आता वन्यजीवप्रेमींच्या आरोपांमुळे बचावात्मक पवित्र्यात यावे लागले आहे.पर्यावरण जपण्यासाठी सर्वच प्राण्यांप्रमाणे वाघांनाही जगविणे आवश्यक आहे. पण एखादा वाघ हजारो माणसांच्या जगण्याचा दुश्मन झाला असेल तर? वनविभागालाही अशावेळी वाघ की माणूस, यापैकी एकाला निवडणे आवश्यक होणारच. साहजिकच माणसांना प्राधान्य देण्यात आले. शिवाय वाघ आज आढळला आणि लगेच दुसºया दिवशी ठार मारला, असेही नाही. दोन वर्ष धुमाकूळ घालणाऱ्या वाघिणीला केवळ पकडण्यासाठीच ७०-८० दिवस मोहीम राबविण्यात आली. त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा चुराडाही झाला.सारे उपाय हरल्यावरच वाघिणीला संपविण्यात आले. पण वन्यजीवप्रेमींचा आक्षेप कायम आहे. हे आक्षेप ऐकल्यावर वाघग्रस्त गावकऱ्यांचे म्हणणे एवढेच आहे, की वाघांची चिंता वाटणाऱ्यांनी तीन दिवस आमच्या गावात येऊन मुक्कामी राहावे. आताही या भागात वाघिणीचे दोन बछडे आणि एक वाघ फिरत असल्याची गावकऱ्यांना भीती आहे. त्या भीतीवर वन्यजीवप्रेमींनी काहीतरी उपाय सांगावा, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.शहरात एखादवेळी चार वानरांची टोळी अंगणातले वाळवण उधळून लावते, दोरीवरचे कपडे उचलून नेते, तेव्हा शहरी माणसं अक्षरश: पिसाळून जातात. माकडांचा बंदोबस्त करा, म्हणून पेपरात बातम्या येतात. मग ३० खेड्यांमध्ये जर वाघ थेट माणसं मारत असेल, तर त्या गावकऱ्यांनी ओरडूही नये? वाघ मेला, डोक्यावरची मृत्यूची टांगती तलवार हटली म्हणून त्यांनी आनंद साजरा केला तर चुकले कुठे? चोर येऊ नये म्हणून दाराशी कुत्रा पाळणाऱ्यांना खेड्यातल्या माणसांपेक्षा वाघ महत्त्वाचा वाटत असेल, तर त्यांनी एकदा जरूर अशा खेड्यांमध्ये परिवारासह मुक्कामाला यावे, मृत्यूची भीती काय असते, ते एकदा अनुभवावे आणि माणसे की माणसाला मारणारे एक श्वापद, दोघांपैकी कोणाला मरू द्यावे याचा निर्णय घ्यावा, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे..(लेखक लोकमतच्या नागपूर आवृत्तीतउपसंपादक आहेत.)

manthan@lokmat.com