कोल्हापूर : जातीविरहित, धर्मनिरपेक्ष महाराष्ट्राचे स्वप्न साकारण्यासह जनतेला जागरुक करण्यासाठी लोकशाहीवादी युवा महासंघ राज्य कमिटीतर्फे युवा संघर्ष संदेश जथ्थ्याचे आयोजन केले आहे. रविवारी (दि. ४) अॅड. गोविंद पानसरे यांच्या निवासस्थानापासून जथ्था निघेल, अशी माहिती युवा महासंघ राज्य कमिटीचे सदस्य शिवाजी मगदूम यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, समाजातील अंधश्रद्धेचा अंधकार दूर करण्यासाठी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी काम केले; तर कामगार, कष्टकऱ्यांच्या कल्याणासाठी अॅड. पानसरे लढत राहिले. या दोन विचारवंतांच्या हत्या करण्यात आल्या. लोकांना जागृत करण्यासाठी पुणे येथे डॉ. दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडलेल्या ठिकाणापासून, तर कोल्हापुरातील अॅड. पानसरे यांच्या घरापासून जथ्था निघणार आहे. रविवारी सकाळी साडेदहा वाजता कसबा बावड्यातील शाहू जन्मस्थळाला जथ्था भेट देणार आहे. त्यानंतर गंगाराम कांबळे स्मृतिस्तंभास अभिवादन व शिवाजी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येईल. शिवाजी पुतळा, जुना राजवाडा, बिंदू चौक, उमा टॉकीज, गोखले कॉलेज, यादवनगर, शास्त्रीनगर या मार्गावरून जथ्था निघून हुतात्मा स्मारक येथे दुपारी साडेबारा वाजता अभिवादनाचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर दुपारी एक वाजता शाहू स्मारक भवन येथे उद्घाटन होईल.पत्रकार परिषदेस उदय नारकर, सुरेश शिपूरकर, धनाजी गुरव, चंद्रकांत यादव, दीपक पवार, रघुनाथ कांबळे, एस. बी. पाटील, सुभाष वाणी उपस्थित होते.(प्रतिनिधी) जथ्थ्याचा प्रवासकोल्हापूरसह पुणे, रायगड, ठाणे, मुंबई, पालघर, नाशिक, जळगाव, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, बीड या जिल्ह्यांमध्ये जथ्था फिरून नऊ आॅक्टोबरला औरंगाबाद येथे होणाऱ्या अधिवेशनात कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.
पानसरेंच्या घरापासून रविवारी निघणार युवा संघर्ष संदेश जथ्था
By admin | Updated: October 1, 2015 23:30 IST