माजी मंत्र्यांना बंगला सोडवेना : ‘रामटेक’साठी मंत्र्यांची संगीत खुर्चीसंदीप प्रधान, मुंबई‘रामटेक’च्या परसरात रुंजी घालणारा अथांग सागर माजी मंत्री छगन भुजबळ यांना मोहिनी घालत आहे. ‘देवगिरी’चा उंबरठा ओलांडण्याच्या कल्पनेनं माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कंठ दाटून येत आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना ‘पर्णकुटी’ सोडताना जणू कुडीतून प्राण काढून घेतल्यासारख्या वेदना होत आहेत. त्यामुळे या सर्वच मंडळींनी आपल्याला शासकीय बंगल्यांचा वापर करण्यास मुदतवाढ देण्याची पत्रे लिहिली आहेत. तर त्याचवेळी एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांच्यात ‘रामटेक’करिता संगीत खुर्चीचा खेळ रंगला आहे, तर सुधीर मुनगंटीवार यांनी ‘देवगिरी’चा ध्यास घेतला आहे. त्यामुळे आता बंगल्यात ठाण मांडून बसलेल्या १९ मंत्र्यांना घराबाहेर काढण्याची मोहीम सरकारला हाती घ्यावी लागणार आहे.मंत्र्यांच्या निवासस्थानाची व्यवस्था करण्याबाबतची फाईल सध्या नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पोहोचली आहे. मात्र भाजपाप्रणीत सरकारमधील मातब्बर मंत्री एकनाथ खडसे, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, पंकजा मुंडे यांना रामटेक, देवगिरी, पर्णकुटी,चित्रकुट असे काही मोजकेच बंगले खुणावत आहेत. कारण या बंगल्यांत वास्तव्य करणाऱ्या भुजबळ, पवार, हर्षवर्धन अशा मातब्बरांनी या बंगल्यांवर गेल्या काही वर्षांत वारेमाप खर्च केला आहे. त्यामुळेच की काय भुजबळ, पवार यांच्यासह १९ मंत्र्यांनी आपल्याकडील बंगले सोडण्यास मुदतवाढ मिळावी, अशी मागणी केली आहे.‘रामटेक’ बंगला भुजबळ यांनी मंत्रीपदावर नसतानाही आपल्याकडे राखला होता. या बंगल्याच्या मागील समुद्रकिनाऱ्याचा आनंद घेता येईल अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे. याच पद्धतीने देवगिरी व पर्णकुटीत अंतर्गत सजावट केलेली आहे. गृहमंत्रीपदाने हुलकावणी दिली तर निदान गृहमंत्र्यांचे वास्तव्य राहिलेला ‘चित्रकुट’ बंगला मिळावा, अशी विनोद तावडे यांची अपेक्षा असल्याचे कळते. ‘रामटेक’मध्ये एकेकाळी गोपीनाथ मुंडे यांचे वास्तव्य राहिल्याने पंकजा मुंडे यांना हा बंगला हवा आहे तर ज्येष्ठतेनुसार हा बंगला आपल्याला मिळावा, असे एकनाथ खडसे यांना वाटते. ‘रामटेक’चा तिढा सुटण्यापूर्वी चंबुगबाळ घेऊन ‘देवगिरी’वर दाखल होण्याची घाई मुनगंटीवार यांना झाली आहे.राष्ट्रवादी प्रचंड आशावादी !> गेली १५ वर्षे सरकारी बंगल्यांत वास्तव्य असलेले सुनील तटकरे, जयंत पाटील, राजेश टोपे, जयदत्त क्षीरसागर अशा राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना बंगले सोडवेनात. कदाचित भाजपाप्रणीत सरकारला बाहेरून दिलेल्या पाठिंब्यांच्या बदल्यात आपल्या डोक्यावरील लाडक्या बंगल्यांचे छप्पर तूर्त हिरावून घेतले जाणार नाही, अशी प्रचंड आशा हे मंत्री बाळगून असावेत.> नवीन सरकार सत्तारूढ झाल्याने आता या बंगल्यांत नवे बिऱ्हाड वास्तव्याला येईल. मात्र घर सोडताना जड पावलाने बाहेर पडणारे ‘माजी’ आणि घरावर नवे तोरण बांधून आत शिरणारे ‘आजी’ यांच्यात ‘ये घर बहोत हसीन हैं’ यावर एकमत असेल.
ये तेरा घर, ये मेरा घर... ये घर बहोत हसीन हैं!
By admin | Updated: November 4, 2014 09:24 IST