- रेवणसिध्द जवळेकर, सोलापूर
आई देवाघरी गेलेली... दुसरे लग्न केलेल्या पित्याने नाशिकमध्ये वास्तव्य केले... तीन मुलींपैकी एकीच्या मृत्यूनंतर दुसरीनेही साथ सोडत मुंबई गाठली. घरात एकट्याच राहणाऱ्या तिसऱ्या बहिणीला अनेक दिवसांपासून अन्न न मिळाल्याने ती भूकबळीची शिकार ठरली. सोलापुरच्या होटगी रोडवर ही हृदयद्रावक घटना घडली.वैशाली अनिल भगत (२४) असे तिचे नाव आहे. अनिल भगत हे आपली पत्नी आणि तीन मुलींसमवेत औद्योगिक वसाहतीत राहत होते. पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर त्यांनी दुसरे लग्न केले आणि नाशिकमध्ये दुसऱ्या पत्नीबरोबर राहायला गेले. तिन्ही मुली मात्र त्यांच्याबरोबर न जाता औद्योगिक वसाहतीतील लहान खोलीतच राहू लागल्या. काही महिन्यांपूर्वी त्यापैकी बहिणीचा मृत्यू झाला.तर दुसरी बहीण आरती ही वैशालीला सोडून मुंबईत स्थायिक झाली. एकाकी पडलेली वैशाली ही विमनस्क अवस्थेत जगत होती. त्यातूनच तिची उपासमार झाली. अधून-मधून ती औद्योगिक पोलीस चौकीत जाऊन ‘त्याला अटक करा, याला अटक करा’ अशी बडबड करायची. पोलीस तिला पैसे देत असत, मात्र ते ती घेत नसे. त्यामुळेच तिची उपासमार झाली.वैशालीवर उपासमारीची वेळ आल्याची माहिती आसरा चौकातील खालिद सालार, मुन्नाभाई शेख आणि त्यांच्या सहकाऱ्यांना लागली. त्यांनी दोन महिने तिला दोन वेळचा डबा पोहोचवला. नंतर ते इतर कामांमध्ये गुंतल्याने वैशालीची पुन्हा उपासमार सुरू झाली.तिच्या मृत्यूची वार्ता अशी समजलीमुंबईत राहणारी बहीण आरतीने शनिवारी दुपारी सोलापुरातील मित्र अब्दुल रब डोका यास भ्रमणध्वनी करून वैशालीकडे जाऊन विचारपूस करण्याबरोबर तिला २०० रुपये देण्याची विनंती केली. त्यानुसार डोका वैशालीच्या घराजवळ येताच त्याला बंद घरातून सडलेल्या प्रेताची दुर्गंधी आली. घराचा दरवाजा तोडला असता वैशाली मृतावस्थेत पडली होती. त्यानंतर त्याने पोलिसांना घटनेची माहिती दिली.