राज्यातील राजकारण आता महापुरुषांच्या सन्मानावरून कमालीचे तापले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना टिपू सुलतानाशी केल्याने भाजपने रणशिंग फुंकले आहे. भाजप नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या विधानाचा अत्यंत कडक शब्दांत निषेध करत, हा प्रकार म्हणजे महाराष्ट्राच्या अस्मितेवर झालेला हल्ला आणि 'इतिहासद्रोह' असल्याचे म्हटले आहे. या विधानावरून बावनकुळे यांनी केवळ काँग्रेसलाच नाही, तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनाही धारेवर धरले आहे.
काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?
"काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानाची तुलना छत्रपती श्री. शिवाजी महाराज यांच्याशी करणे हा प्रकार अत्यंत संतापजनक व महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाला घालणारा आहे. हा छत्रपती शिवरायांचा अपमान व इतिहासद्रोहच आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारले ते न्याय, स्त्रीसन्मान आणि लोककल्याण यांच्या भक्कम तत्त्वांवर! इतिहासात टिपू सुलतानाच्या कारकिर्दीबाबत अनेक ठिकाणी धार्मिक अत्याचार, जबरदस्ती धर्मांतर आणि क्रूर दडपशाहीचे उल्लेख आढळतात. याला केवळ आपल्या लांगुलचालनाच्या स्वार्थी राजकारणासाठी स्वराज्यसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष म्हणणे, याहून नीचपणाचे अधिक काय असेल?
काँग्रेसचे लांगूलचालनाचे राजकारण आणखी किती नीच पातळी गाठणार? मतांसाठी आणि तुष्टीकरणासाठी इतिहासाचे विकृतीकरण करणे हा अत्यंत घृणास्पद प्रकार आहे. छत्रपती शिवराय हे प्रत्येक भारतीयाच्या श्रद्धेचे स्थान आहे, असंख्य शिवप्रेमींचे आराध्य दैवत आहे. त्यांच्या तेजस्वी कार्याशी तुलना टिपू सुलतानाशी करणे हा छत्रपती शिवरायांचा, महाराष्ट्राचा आणि जगभरातील प्रत्येक शिवप्रेमीचा घोर अपमान आहे.राष्ट्रभक्त भारतीयांचा सुद्धा तो अपमान आहे.
महाराष्ट्र सवाल करतोय, काँग्रेस आपल्या टिपूभक्त प्रदेशाध्यक्षाला बडतर्फ करणार का? उद्धव ठाकरे काही भूमिका घेणार की पुन्हा मुग गिळून गप्प राहणार? पवार साहेब, छत्रपती शिवरायांचा हा अपमान सहन करणार का? भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता, या राज्यातील प्रत्येक मराठी माणूस आणि जगातील प्रत्येक शिवप्रेमी या वक्तव्याचा जाहीर निषेध करत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाक घासून माफी मागा!!!"
हर्षवर्धन सपकाळ काय म्हणाले होते?
"छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य ज्या पद्धतीचं आहे आणि त्यांनी स्वराज्य नावाचा एक विचार ज्या पद्धतीने दिला आहे, अगदी त्यांच्याच मांदियाळीमध्ये, त्यांच्यानंतर.. त्यांचा बराच कालावधी लोटल्यानंतर, त्यांचा आदर्श घेऊन टिपू सुलतान यांनी इंग्रजांच्या विरोधात लढा पुकारला होता आणि त्या अर्थाने टिपू सुलतान हे शौर्य गाजवणारे एक योद्धे होऊन गेले, भारताचे भूमिपुत्र होऊन गेले. त्यांनी कधीही कुठल्याही विषारी, विखारी विचारांना जवळ केलं नाही. तर एक शौर्याचे लक्षण म्हणून आपण टिपू सुलतान यांना शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितलं पाहिजे," अशा शब्दांत हर्षवर्धन सपकाळ यांनी आपले मत व्यक्त केले होते.
Web Summary : Bawankule slams Sapkal's Shivaji-Tipu comparison, calling it an insult to Maharashtra. He questions Congress, Thackeray, and Pawar's silence, demanding Sapkal's apology. Sapkal praised Tipu Sultan's fight against the British, equating him to Shivaji Maharaj in bravery.
Web Summary : बावनकुले ने सपकाल की शिवाजी-टीपू तुलना की निंदा की, इसे महाराष्ट्र का अपमान बताया। उन्होंने कांग्रेस, ठाकरे और पवार की चुप्पी पर सवाल उठाए, सपकाल से माफी की मांग की। सपकाल ने टीपू सुल्तान के अंग्रेजों के खिलाफ लड़ाई की प्रशंसा की, उन्हें शिवाजी महाराज के बराबर बताया।