लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा मान मिळालेल्या सुजाता सौनिक या जून महिन्याच्या अखेरीस सेवानिवृत्त होत असल्याने मंत्रालय प्रशासनाला नव्या मुख्य सचिवांच्या नियुक्तीचे वेध लागले आहेत. संभाव्य नवे मुख्य सचिव म्हणून राजेशकुमार, आय. एस. चहल, भूषण गगराणी या ज्येष्ठ अधिकाऱ्यांच्या नावांची चर्चा सुरू आहे.
गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर म्हणजे ३० जून २०२४ रोजी सुजाता सौनिक यांनी मुख्य सचिव पदाची सूत्रे स्वीकारली. त्यांच्या नियुक्तीच्या निमित्ताने राज्याच्या प्रशासनाला पहिल्या महिला मुख्य सचिव लाभल्या. सौनिक या नियत वयोमानानुसार येत्या ३० जून रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे मंत्रालयात नव्या मुख्य सचिवांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.
मुंबई पोलिस आयुक्त निवडीवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सेवाज्येष्ठतेचा निकष बाजूला ठेवला होता. त्यामुळे मुख्य सचिव पदासाठसुद्धा मुख्यमंत्री वेगळा निर्णय घेऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
कुणाला मिळणार संधी?
- सेवाज्येष्ठतेनुसार महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेशकुमार यांचे नाव मुख्य सचिवपदासाठी आघाडीवर आहे. १९८८च्या बॅचचे सनदी अधिकारी असलेले राजेशकुमार हे ऑगस्ट २०२५ मध्ये सेवानिवृत्त होत आहेत.
- गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आय. एस. चहल हेही मुख्य सचिवपदाच्या स्पर्धेत आहेत. चहल हे १९८९च्या बॅचचे अधिकारी असून ते पुढील वर्षी जानेवारी २०२६मध्ये सेवानिवृत्त होणार आहेत.
- याशिवाय १९९०च्या तुकडीचे भूषण गगराणी यांचेही नाव चर्चेत आहे. सध्या मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदावर कार्यरत असलेले गगराणी हे मार्च २०२६मध्ये सेवानिवृत्त होणार आहेत.